संग्रामभैय्या, अजूनही वेळ गेलेली नाही… अरुणकाकांनी जपलेल्या माणुसकीच्या नात्यासाठी मुस्लिम समाजाशी एकदा मनमोकळा संवाद करा! Sangram Jagtap NEWS

संग्रामभैय्या, अजूनही वेळ गेलेली नाही… अरुणकाकांनी जपलेल्या माणुसकीच्या नात्यासाठी मुस्लिम समाजाशी एकदा मनमोकळा संवाद करा!




संग्रामभैय्या,



आज हे पत्र लिहिताना मनात राग नाही, राजकीय द्वेष नाही आणि कोणताही वैयक्तिक स्वार्थही नाही. मनात आहे ती केवळ जुन्या आठवणींची गर्दी, अरुणकाकांनी आयुष्यभर जपलेल्या सर्वधर्मीय नात्याची ओढ आणि आपल्या अहिल्यानगर शहराच्या सामाजिक सलोख्याची चिंता!

आज १५ ऑगस्ट—भारताचा स्वातंत्र्यदिन! हा पवित्र दिवस निवडून मी तुम्हाला हे पत्र पाठवीत आहे. कारण देशाला मिळालेले स्वातंत्र्य कोणत्याही एका जातीचे, धर्माचे अथवा राजकीय विचारांचे नाही. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारशी, आदिवासी, दलित आणि बहुजन अशा सर्व समाजांतील असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी मातृभूमीसाठी संघर्ष केला, कारावास भोगला आणि आपल्या प्राणांचे बलिदान दिले.

त्यांच्या त्यागातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ परस्परांचा द्वेष करणे नव्हे, तर सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांनी बंधुभावाने, समानतेने आणि सन्मानाने एकत्र राहणे हा आहे. म्हणूनच स्वातंत्र्यदिनी हे पत्र लिहिताना माझ्या मनात एकच प्रामाणिक अपेक्षा आहे—अरुणकाकांनी जपलेला सामाजिक सलोखा पुन्हा निर्माण व्हावा आणि अहिल्यानगर शहरात जाती-धर्मांच्या नावावर वाढत चाललेली दरी संवादातून कमी व्हावी.

भैय्या, आपल्या अलीकडील काही भूमिका आणि आपल्याकडून घडणाऱ्या घटनांमुळे माझ्यासारखे आपले अनेक जुने मित्रही आज आपले वैचारिक टीकाकार झाले आहेत. हे पत्र लिहिण्यापूर्वी आपल्या काही भूमिकांबाबत मी शासन आणि संबंधित यंत्रणांकडे आक्षेपही नोंदविले आहेत. कारण मैत्रीचा अर्थ चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे नसतो. खरा मित्र तोच असतो, जो योग्य वेळी सत्य सांगण्याचे धाडस करतो.

मात्र, आपल्यावर टीका केली म्हणजे आपल्याविषयीचा जुना स्नेह संपला, असे अजिबात नाही. गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ या शहरातील सामाजिक चळवळीत काम करणारा मी एक साधा कार्यकर्ता आहे. एकेकाळी स्वर्गीय अरुणकाकांचा तरुण मित्र म्हणून त्यांच्या सहवासात राहिलो आणि नंतर आपलाही मित्र म्हणून काही काळ आपल्यासोबत चाललो. म्हणूनच आज निर्माण झालेल्या परिस्थितीत गप्प राहणे माझ्या मनाला मान्य झाले नाही.

हे पत्र केवळ मुस्लिम समाजाच्या वतीने अथवा राजकीय भूमिकेतून लिहिलेले नाही. या शहराच्या हितासाठी, येथे पिढ्यान्‌पिढ्या एकत्र राहणाऱ्या अठरापगड जाती-धर्मांतील प्रत्येक नागरिकाच्या भविष्यासाठी आणि अहिल्यानगरचे सामाजिक ऐक्य अबाधित राहावे, या प्रामाणिक भावनेतून मी हे पत्र आपल्याला पाठवीत आहे.

अरुणकाकांमागे चालणारी ती ऐतिहासिक मिरवणूक…

भैय्या, तुमचे वडील स्वर्गीय अरुणकाका जगताप यांनी नगर शहर विधानसभा मतदारसंघातून जनता दलाच्या वतीने अनिलभैय्या राठोड यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती, तो काळ आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

त्यावेळी नगर शहरातून निघालेल्या अरुणकाकांच्या भव्य मिरवणुकीत जवळपास ऐंशी टक्के मुस्लिम समाज सहभागी झाला होता. त्या मिरवणुकीत मी स्वतः उपस्थित होतो. मिरवणुकीत जनता दलाचे हिरवे झेंडे मोठ्या प्रमाणात दिसत होते.

त्यावरून राजकीय विरोधकांनी अरुणकाकांवर प्रचंड टीका केली. त्यांच्या नावाची मोडतोड करून त्यांची हेटाळणी करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, अरुणकाकांनी त्या टीकेची कधीही पर्वा केली नाही. कारण त्यांच्यासाठी झेंड्याचा रंग महत्त्वाचा नव्हता; त्यांच्या पाठीशी विश्वासाने उभा राहिलेला माणूस महत्त्वाचा होता!

नगर शहरातील मुस्लिम समाजाने अरुणकाकांवर मनापासून प्रेम केले. त्यांच्या प्रत्येक राजकीय संघर्षात हा समाज त्यांच्यासोबत राहिला. काही प्रसंगी त्यांचा स्वतःचा समाज राजकीयदृष्ट्या त्यांच्यापासून दूर गेला असेल; परंतु मुस्लिम समाजाने त्यांची साथ सहजपणे सोडली नाही. कारण अरुणकाकांशी असलेले नाते मतांचे नव्हते—ते विश्वासाचे, मैत्रीचे आणि संकटात धावून जाणाऱ्या माणुसकीचे होते.

त्रास सहन केला; पण अरुणकाकांविषयी एक शब्दही बोलला नाही…

अरुणकाकांच्या विरोधात एक गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात माझा मित्र अमानभैय्या यालाही आरोपी करण्यात आले होते. पोलिसांकडून त्याचा प्रचंड छळ झाला. त्याने पोलिसांचा मार सहन करणे पसंत केले; परंतु अरुणकाकांविषयी एकही विपरीत शब्द बोलला नाही.

अरुणकाकांवर जीवापाड प्रेम करणारे, संकटातही निष्ठा न सोडणारे आणि परिणामांची पर्वा न करता त्यांच्या पाठीशी उभे राहणारे असे अनेक कार्यकर्ते मुस्लिम समाजामध्ये होते.

जुन्या महानगरपालिकेजवळील एका मशिदीचा ताबा मिळावा, अशी मुस्लिम समाजाची मागणी असताना अरुणकाकांनी त्या प्रश्नातही सहकार्य केले. त्यांच्या हयातीत एखाद्या मुस्लिम कुटुंबावर संकट आले, एखाद्या तरुणावर अन्याय झाला किंवा कोणाचे प्रशासकीय काम अडले, तर त्याला एक हक्काचे दार दिसायचे—ते म्हणजे अरुणकाकांचे दार!

त्यांच्या दारात आलेल्या माणसाला त्यांनी कधी त्याचा धर्म विचारला नाही. त्याचे दुःख विचारले, त्याची अडचण समजून घेतली आणि शक्य तेवढी मदत केली. म्हणूनच मुस्लिम समाज त्यांना केवळ राजकीय नेता नव्हे, तर आपल्या कुटुंबातील आधारवड मानत होता.

सावलीसारखा सोबत राहणारा अफजल पैलवानही आज दूर गेला…

शेख अफजल ऊर्फ अफजल पैलवान हा तुमचा अत्यंत जवळचा मित्र होता. अनेक वर्षे तो सावलीसारखा तुमच्यासोबत राहिला. नांगरे पाटील पोलीस अधीक्षक असताना तुमच्या दोघांविरुद्ध एक गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात तुम्हाला आणि अफजल पैलवानला एक-दोन दिवस उपकारागृहात राहावे लागले होते. त्या कठीण काळातही त्याने तुमची साथ सोडली नाही.

मुस्लिम समाजाशी संबंधित कोणताही प्रश्न निर्माण झाला, कोणावर अन्याय झाला किंवा एखाद्या कुटुंबाला मदतीची गरज भासली, तर अफजल पैलवान तुमच्या वतीने तत्काळ धावून यायचा. तुमच्या आणि मुस्लिम समाजाच्या दरम्यान संवादाचा एक विश्वासू दुवा म्हणून तो काम करीत होता.

अफजल पैलवानचा रस्तेबांधणीचा मोठा व्यवसाय आहे. व्यवसायासाठी कोणतीही नवीन यंत्रसामग्री आणली की तिचे उद्घाटन तुमच्या अथवा स्वर्गीय अरुणकाकांच्या हस्ते व्हावे, अशी त्याची मनापासून इच्छा असायची. हा केवळ राजकीय संबंध नव्हता; त्यामागे तुमच्या कुटुंबाविषयी असलेला जिव्हाळा, आपलेपणा आणि विश्वास होता.

मात्र, आज एकेकाळी तुमचा लाडका आणि सावलीसारखा सोबत राहणारा अफजल पैलवानही तुमच्यापासून दूर गेला आहे. त्यालाही त्याच्या म्हणण्यानुसार खोट्या प्रकरणांचा आणि कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. कधीकाळी तुमच्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे उभा राहणारा जवळचा मित्र आज तुमच्यापासून दूर का गेला, याचाही तुम्ही एकदा शांतपणे आणि अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे.

अफजल पैलवानचे दूर जाणे ही केवळ दोन मित्रांमधील दरी नाही. तुमच्याशी मनापासून जोडले गेलेले अनेक जुने मुस्लिम मित्र आणि कार्यकर्ते आज कोणत्या वेदनेतून जात आहेत, त्याचे ते एक बोलके उदाहरण आहे.

हैदर पेंटर यांनी रेखाटलेले ते भव्य चित्र…

अरुणकाका विधानसभा निवडणुकीच्या मैदानात असताना मुस्लिम समाजातील प्रसिद्ध चित्रकार हैदर पेंटर यांनी आशा टॉकीज चौकात अरुणकाकांचे जवळपास दहा मीटर उंचीचे भव्य चित्र हाताने रंगविले होते.

ते केवळ निवडणुकीच्या प्रचारासाठी रंगविलेले चित्र नव्हते. एका मुस्लिम कलाकाराने आपल्या लाडक्या नेत्याविषयी व्यक्त केलेले ते निःस्वार्थ प्रेम होते. त्या चित्रामध्ये रंग होते; परंतु त्या प्रत्येक रंगामागे मुस्लिम समाजाचा अरुणकाकांवरील दृढ विश्वासही होता.

काळ पुढे सरकला आणि अरुणकाकांचा राजकीय व सामाजिक वारसा तुमच्याकडे आला. सुरुवातीच्या काळात मुस्लिम समाजाने तुमच्यावरही तेवढेच प्रेम केले. तुमच्यामध्ये लोकांना अरुणकाकांची प्रतिमा दिसत होती. तुमच्या यशात आपलाही वाटा आहे, अशी भावना मुस्लिम कार्यकर्त्यांच्या मनात होती.

मुकुंदनगरनेही कायम तुमची साथ दिली…

मुकुंदनगर हा मुस्लिमबहुल परिसर असूनही तेथील नागरिकांना वर्षानुवर्षे मूलभूत नागरी सुविधांसाठी संघर्ष करावा लागला. मात्र, तुम्ही अजितदादांच्या माध्यमातून विविध योजनांमधून मोठ्या प्रमाणावर निधी आणला आणि अनेक विकासकामे मार्गी लावली.

रस्ते, गटारे, पथदिवे आणि कब्रस्तानांच्या विकासासाठी झालेली कामे आजही प्रत्यक्ष दिसतात. मागील निवडणुकीपूर्वी अल्पसंख्याक विकास निधीतून शहरातील विविध मुस्लिम कब्रस्तानांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून आणण्यातही तुमचा पुढाकार होता.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सत्यजित तांबे तुमच्या विरोधात उमेदवार असतानाही मुकुंदनगरसह अनेक मुस्लिमबहुल भागांतील बहुसंख्य मतदार तुमच्या पाठीशी उभे राहिले.

नंतरच्या निवडणुकीत राज चेंबर चौकात मुस्लिम तरुणांनी मोठ्या यंत्राच्या साहाय्याने तुमच्यावर केलेली पुष्पवृष्टी हा केवळ प्रचाराचा क्षण नव्हता. तो तुमच्याविषयी असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि आपुलकीचा सार्वजनिक आविष्कार होता.

मोहरम असो, ईद-ए-मिलादुन्नबी असो अथवा एखाद्या दर्ग्याचा उरूस—भंडाऱ्याचा शुभारंभ संग्रामभैय्यांच्या हस्ते व्हावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असायची. कारण तुम्ही त्या कार्यक्रमांत पाहुणे म्हणून नव्हे, तर आपल्या कुटुंबातील व्यक्ती म्हणून सहभागी व्हायचात.

कापड बाजारातील हातगाडीधारक आणि फेरीवाल्यांच्या विरोधात नितेश राणे आणि काही संघटनांनी आंदोलन केले, तेव्हा तुम्ही त्या गरीब कष्टकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात. तुमच्या भूमिकेवर टीका झाली, तरी तुम्ही मागे हटला नाहीत.

उपजीविकेसाठी रस्त्यावर संघर्ष करणाऱ्या सामान्य माणसाच्या बाजूने उभे राहणारा लोकप्रतिनिधी म्हणून मुस्लिम समाजासह संपूर्ण शहराने तुमच्याकडे पाहिले.

तुम्ही मंत्री व्हावे म्हणून मुस्लिम समाज बारामतीपर्यंत गेला…

२०१९ मध्ये माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना तुम्हाला मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी नगर शहरातील मुस्लिम समाजाची मनापासून इच्छा होती.

त्यासाठी शहरातील अनेक मुस्लिम कार्यकर्ते आणि नागरिक बारामती येथे गेले. त्यांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन, “संग्रामभैय्यांना मंत्रिपदाची संधी द्यावी,” अशी आग्रहाची मागणी केली.

एका नेत्यासाठी समाजाने बारामतीपर्यंत जाऊन पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे मंत्रिपदाची मागणी करणे ही सामान्य बाब नव्हती. तुम्ही मंत्री झालात तर नगर शहराचा अधिक वेगाने विकास होईल, उपेक्षित भागांचे प्रश्न सुटतील आणि सर्व समाजघटकांना न्याय मिळेल, असा विश्वास मुस्लिम समाजाच्या मनात होता.

तुमची राजकीय उंची वाढावी, तुम्हाला राज्याच्या नेतृत्वात स्थान मिळावे आणि अरुणकाकांचे नाव आणखी मोठे व्हावे, अशी प्रामाणिक इच्छा बाळगणारा हाच मुस्लिम समाज होता.

मग अचानक असे काय घडले, भैय्या?

मागील विधानसभा निवडणुकीच्या काळात आणि त्यानंतर नेमके काय घडले, हे आजही मुस्लिम समाजाला समजलेले नाही. तुमची भाषा, भूमिका आणि मुस्लिम समाजाकडे पाहण्याची पद्धत अचानक बदलल्याची भावना समाजात निर्माण झाली.

आज दुर्दैवाने अशी एक नवी प्रतिमा तयार होत आहे की, मुस्लिम समाज तुमचा शत्रू आहे आणि तुम्ही मुस्लिम समाजाचे शत्रू आहात. ही प्रतिमा तुमच्यासाठी, मुस्लिम समाजासाठी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अहिल्यानगर शहराच्या भविष्यासाठी अजिबात योग्य नाही.

भैय्या, आपल्याकडून घडणाऱ्या काही घटना आणि व्यक्त होणाऱ्या भूमिकांमुळे आपल्यावर मनापासून प्रेम करणारे माझ्यासारखे जुने मित्रही आज वैचारिकदृष्ट्या आपले टीकाकार झाले आहेत. अनेकांनी आपल्या भूमिकांबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली. मी स्वतःदेखील शासनाकडे आक्षेप नोंदविला आहे.

परंतु ही टीका तुमचे नुकसान व्हावे म्हणून नाही. तुमच्या आणि मुस्लिम समाजाच्या मनातील अंतर आणखी वाढू नये, अहिल्यानगरचे सामाजिक वातावरण बिघडू नये आणि अरुणकाकांनी आयुष्यभर जपलेला विश्वासाचा वारसा नष्ट होऊ नये, यासाठी ती टीका आहे.

तुमच्यावर प्रेम केलेल्या माणसाने उपस्थित केलेला प्रश्न हा शत्रूचा वार नसतो; तो एका जुन्या मित्राने दाखविलेला आरसा असतो!

एखाद्या व्यक्तीच्या गुन्ह्याची शिक्षा संपूर्ण समाजाला देता येणार नाही

भैय्या, संपूर्ण समाज कधीच दोषी असू शकत नाही. एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला असेल, तर त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे. कोणत्याही गुन्हेगाराला धर्माच्या नावाखाली संरक्षण मिळता कामा नये.

परंतु एखाद्या व्यक्तीच्या अपराधाची शिक्षा संपूर्ण समाजाला देता येणार नाही. गुन्हेगाराची ओळख त्याच्या गुन्ह्याने झाली पाहिजे—त्याच्या धर्माने नव्हे!

प्रत्येक समाजामध्ये चांगल्या आणि वाईट प्रवृत्तीचे लोक असतात. काही व्यक्तींच्या वर्तनामुळे संपूर्ण धर्माकडे संशयाने अथवा शत्रुत्वाच्या नजरेने पाहणे हे अरुणकाकांच्या सर्वसमावेशक विचारांच्या विरुद्ध ठरेल.

तुमच्यावर आजही प्रेम करणारे अनेक मुस्लिम कार्यकर्ते आहेत. त्यांनी तुमच्यासोबत सुख-दुःख पाहिले, निवडणुकांमध्ये काम केले, तुमच्यावरील टीका सहन केली आणि तुमच्या विजयात आपला आनंद मानला. आज तेच कार्यकर्ते अस्वस्थ मनाने विचारत आहेत—

“आपले भैय्या असे का वागू लागले?”

“आमच्याकडून नेमके काय चुकले?”

“ज्यांना आम्ही आपला नेता मानले, ते आमच्याशी संवाद साधायलाही तयार का नाहीत?”

या प्रश्नांची उत्तरे आरोप-प्रत्यारोपांतून किंवा व्यासपीठावरील भाषणांतून मिळणार नाहीत. ती एका प्रामाणिक, मनमोकळ्या आणि प्रत्यक्ष संवादातूनच मिळू शकतात.

तुमच्या भोवतीचे अंतर वाढविणारे लोक ओळखा

आज काही लोक स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तुमच्या आणि मुस्लिम समाजाच्या मधील गैरसमजांचे अंतर वाढवत आहेत. तुमच्या नावाचा आणि प्रभावाचा वापर करून सामाजिक तणावातून स्वतःचा फायदा करून घेत आहेत.

मात्र, संघर्ष भडकविणारे लोक प्रसंग संपला की निघून जातील. कायम येथे राहणार आहोत ते तुम्ही, आम्ही आणि अहिल्यानगरचे सर्वसामान्य नागरिक!

राजकीय मतभेद मिटू शकतात. निवडणुका येतात आणि जातात. सत्ता आज असते, उद्या नसते. परंतु समाजाच्या मनात निर्माण झालेली जखम भरून येण्यासाठी अनेक वर्षे आणि कधी कधी पिढ्याही जाव्या लागतात. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही.

भैय्या, एकदा मुस्लिम समाजातील धर्मगुरू, व्यापारी, डॉक्टर, वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, महिला, तरुण आणि तुमचे जुने निष्ठावान कार्यकर्ते यांना समोर बसवा. त्यांचे म्हणणे शांतपणे ऐका. तुमच्या मनात काही वेदना, नाराजी किंवा गैरसमज असतील, तर तेही स्पष्टपणे मांडा.

संवादामध्ये प्रश्न विचारले जातील, काही कडू आठवणीही समोर येतील; परंतु त्यातूनच सत्य समोर येईल, गैरसमज दूर होतील आणि तुटत चाललेली मने पुन्हा एकत्र येतील.

अरुणकाकांनी उभारलेला विश्वासाचा पूल तुटू देऊ नका

अरुणकाकांनी उभा केलेला वारसा केवळ राजकीय नव्हता. तो सर्व जाती-धर्मांच्या लोकांना जोडणारा विश्वासाचा पूल होता. तो पूल एका दिवसात उभा राहिला नव्हता. त्यासाठी अरुणकाकांनी आपले आयुष्य खर्च केले, टीका सहन केली आणि संकटातही माणसांची साथ सोडली नाही.

आज तो पूल कमकुवत होताना दिसत असेल, तर त्याची दुरुस्ती करण्याची सर्वांत मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे.

मी अरुणकाकांचा एकेकाळचा तरुण मित्र होतो. आपलाही मित्र म्हणून काही काळ सोबत राहिलो. आज मी तुमच्यावर वैचारिक टीका करीत असेन, तुमच्या भूमिकांविषयी शासनाकडे आक्षेप नोंदवित असेन; तरीही तुमच्या आणि समाजाच्या नात्यामधील दरी वाढत असताना शांत राहणे मला शक्य नाही.

मैत्री केवळ सोबत उभे राहण्यात नसते; मित्र चुकीच्या दिशेने जात असल्याचे वाटल्यास त्याला थांबविण्याचे धाडस करण्यातही मैत्री असते.

गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ सामाजिक चळवळीत काम करताना मी अनेक संघर्ष पाहिले, सत्ता बदलताना पाहिली आणि नेते उदयाला येताना व काळाच्या पडद्याआड जाताना पाहिले. परंतु या शहराच्या मातीमध्ये असलेली हिंदू-मुस्लिम ऐक्याची वीण कधीही पूर्णपणे तुटू नये, हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे.

भैय्या, एक पाऊल तुम्ही टाका…

मुस्लिम समाजाने अरुणकाकांवर केलेले प्रेम खोटे नव्हते. तुमच्यावर उधळलेली फुले खोटी नव्हती. मुकुंदनगरमधील तुमच्या विजयासाठी केलेली मेहनत खोटी नव्हती. मोहरम, ईद-ए-मिलादुन्नबी आणि उरूसाच्या कार्यक्रमांत तुमचे केलेले स्वागत खोटे नव्हते.

तुम्ही मंत्री व्हावे म्हणून बारामतीपर्यंत जाऊन आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांकडे केलेली मागणी खोटी नव्हती. संकटात तुमच्या कुटुंबासोबत उभे राहिलेले अमानभैय्या, अफजल पैलवान आणि असंख्य कार्यकर्त्यांची निष्ठाही खोटी नव्हती.

मग आजचे हे अंतर कायमचे का मानायचे?

अरुणकाका आज आपल्यात नाहीत; पण त्यांनी जपलेली माणसे, त्यांनी निर्माण केलेली नाती आणि त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा समाज आजही याच शहरात आहे. त्या जुन्या नात्यांना पुन्हा एकदा हाक द्या.

कदाचित अनेक डोळ्यांत साचलेले अश्रू बाहेर येतील. अनेक गैरसमज दूर होतील. तुटत चाललेली मने पुन्हा जोडली जातील आणि अरुणकाकांनी लावलेले माणुसकीचे रोपटे पुन्हा एकदा बहरू लागेल.

भैय्या, मुस्लिम समाज तुमच्याशी संघर्ष करू इच्छित नाही; तो संवाद करू इच्छितो. त्याला राजकीय आश्वासनांपेक्षा विश्वासाचा एक शब्द हवा आहे. त्याला विशेष वागणूक नको—न्याय, सन्मान आणि पूर्वीच्या आपलेपणाची भावना हवी आहे.

एक पाऊल तुम्ही पुढे टाका; मुस्लिम समाजही निश्चितपणे दोन पावले पुढे येईल.

आज तुम्ही मला पूर्वीप्रमाणे मित्र समजता की नाही, हे मला माहीत नाही. कदाचित माझी वैचारिक टीका आणि मी शासनाकडे नोंदविलेले आक्षेप यामुळे तुम्ही मला विरोधकही समजत असाल. तरीही मी तुम्हाला शत्रू मानत नाही. कारण मतभेद असले तरी जुन्या मैत्रीच्या आठवणी, अरुणकाकांचा सहवास आणि या शहराबद्दलची आपली सामूहिक जबाबदारी विसरता येत नाही.

हे पत्र कोणतीही प्रसिद्धी मिळविण्यासाठी अथवा तुमच्यावर राजकीय टीका करण्यासाठी लिहिलेले नाही. आपल्या अहिल्यानगर शहराचे भले व्हावे, सामाजिक शांतता कायम राहावी, जाती-धर्मांमधील दुरावा आणि परस्परविरोध कमी व्हावा, तसेच अरुणकाकांनी जपलेले माणुसकीचे नाते पुन्हा दृढ व्हावे, या एकमेव प्रामाणिक भावनेतून मी हे पत्र लिहीत आहे.

हे पत्र कोणत्याही एका धर्मासाठी नाही; अहिल्यानगर शहरात राहणाऱ्या अठरापगड जाती-धर्मांतील प्रत्येक नागरिकाच्या शांत, सुरक्षित आणि सन्मानपूर्ण भविष्यासाठी आहे.

अहिल्यानगरला द्वेषाची नवी ओळख नको. अरुणकाकांच्या काळात जपलेली बंधुभावाची, सर्वधर्मसमभावाची आणि संकटात एकमेकांसाठी उभे राहणाऱ्या माणसांची ओळखच कायम राहावी.

संग्रामभैय्या, अजूनही वेळ गेलेली नाही… आरोपांच्या भिंती उभारण्याऐवजी संवादाचा दरवाजा उघडा. अरुणकाकांनी आयुष्यभर जपलेल्या विश्वासाच्या नात्याला तुटू देऊ नका!




आपला जुना मित्र,
शाकीर शेख
मोबाईल : ९८२२५५००२३

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर