सात्रळ महाविद्यालयात 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' साजरा
पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
ग्रंथ प्रदर्शन, वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य व पुस्तक परिचय लेखन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
सात्रळ, दि. २१: पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त म्हणजेच 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिनानिमित्त' २० ऑगस्ट २०२६ रोजी सात्रळ महाविद्यालयात युवक-युवतींच्या विचाराला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राहाता शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. नवनाथ अंगद शिंदे यांनी दिली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच श्रेया पब्लिकेशन व नवनाथ ग्रामीण समाजसेवी बहुउद्देशीय संस्था, कोल्हार आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सात्रळ, मराठी विभाग आणि युवा प्रबोधन विभाग सात्रळ पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अहिल्यानगर जिल्ह्याचे अध्यक्ष मा. श्री. अरुण कडू पाटील, कार्याध्यक्ष मा. प्राचार्य मधुकर अनाप यांनी सुचित केल्यानुसार कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाऐवजी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शुभहस्ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रकाशित केलेल्या पुस्तकांचे प्रतीकात्मक पुस्तक प्रदर्शन भरवून करण्यात आले.
निबंधलेखन स्पर्धेत अक्षदा चांगदेव घोरपडे, कार्तिक बाबुराव तांबे, आदिती बापूसाहेब मुसमाडे तसेच घोषवाक्य लेखन स्पर्धेत आरती बाबासाहेब शिंदे, माऊली कैलास घोरपडे, प्रवीण दादासाहेब साबळे यांनी तर वक्तृत्व स्पर्धेत पूजा बाबासाहेब शिंदे, अनुजा महेश पन्हाळे, ओम सुधाकर सरोदे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.
द्वितीय सत्रात प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी 'विज्ञान आणि लोकसंस्कृती' या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी डॉ. शिंदे म्हणाले, विज्ञान आणि लोकसंस्कृती यांचा संबंध मानवी जीवन अधिक सुसंवादी बनवण्याशी आहे. लोकसंस्कृतीतल्या अनेक परंपरा, सण आणि घरगुती उपचार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे निसर्गविज्ञान व आरोग्याशी जोडलेले असतात. मात्र, संस्कृतीचे पालन करताना वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे आणि अंधश्रद्धा टाळणे समाजाच्या प्रगतीसाठी गरजेचे ठरते.' त्यांनी लोकविश्वास, लोकश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सोदाहरण चर्चा केली.
ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ भेट उपक्रम विद्यार्थ्यांना आवडला. स्पर्धेत पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना ग्रंथ व वृक्ष भेट देण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देण्यात आली त्यांनी येत्या पंधरा दिवसात सदर पुस्तकाबद्दलचे 'पुस्तक परिचय लेखन स्पर्धा' विषयक संहिता लिहून जमा करण्याचे सूचित करण्यात आले.
विद्यार्थ्यांकडून पाच वैज्ञानिक संकल्प करून घोषवाक्यांचा जागर करत कार्यक्रमाचा शेवट झाला. सूत्रसंचालन दिपाली अरुण पोंदे यांनी केले. आभार प्रा. डॉ. गंगाराम वडीतके यांनी मानले. गौरव नितीन मुसमाडे, कृष्णा शरद कोहकडे, सजन भाग्यश्री राजेंद्र, कोमल सुरेश बलमे, श्रावणी अर्जुन हारदे, साक्षी विजय वाघचौरे, वैशाली सिताराम बर्डे, खुशबू रहेमान सय्यद यांनी परिश्रम घेतले.






stay connected