संत वामनभाऊंनी अंधश्रद्धा दूर करून समाजाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आष्टी | प्रतिनिधी
संत वामनभाऊंनी अंधश्रद्धा दूर करून समाजाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री यांनी केले.
आष्टी तालुक्यातील बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गावरील म्हसोबाची वाडी येथे श्री संत वामनभाऊ महाराजांनी प्रस्थापित केलेल्या पारंपरिक ९४व्या नारळी सप्ताहाची गुरुवारी उत्साहात सांगता झाली. या वेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. अखंड हरिनाम सप्ताहात गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संतांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे ही काळाची गरज आहे. संत वामनभाऊंनी समाजातील अंधश्रद्धा दूर करून लोकांना योग्य दिशेने नेण्याचे कार्य आयुष्यभर केले. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजाने प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करावी, असेही त्यांनी सांगितले.
तसेच गहिनीनाथ गडाच्या आध्यात्मिक परंपरेला पुढे नेण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह हजारो भाविकांनी उपस्थिती लावून भक्तिमय वातावरणात सहभाग नोंदवला.






stay connected