आष्टी बसस्थानक की डुकरांचे नंदनवन ? ८ वर्षांचा वनवास संपणार कधी?
आष्टी (प्रतिनिधी)
एकीकडे आष्टी तालुका सधन होत असून लोकांचे जीवनमान उंचावत आहे, मात्र तालुक्याचे मुख्य केंद्र असलेल्या आष्टी बसस्थानकाची अवस्था पाहता 'दिव्याखाली अंधार' असल्याची प्रचिती येत आहे. २०१८ मध्ये या बसस्थानकाच्या नवीन इमारतीची निविदा प्रसिद्ध होऊनही तब्बल ८ वर्षांनंतरही प्रवाशांच्या नशिबी घाण, दुर्गंधी आणि गैरसोयींचाच प्रवास सुरू आहे. लोकप्रतिनिधी बदलले, सत्तांतर झाले, पण बसस्थानकाचे 'भाग्य' काही बदलले नाही.
घाणीचे साम्राज्य आणि डुकरांचा वावर
आजघडीला आष्टी बसस्थानकाची अवस्था एखाद्या कचरा आगारासारखी झाली आहे. नवीन अर्धवट इमारतीत प्रवाशांऐवजी डुकरांचा मुक्त वावर पाहायला मिळतो. पिण्याच्या पाण्याची सोय नाही आणि स्वच्छतागृहांची अवस्था इतकी भीषण आहे की, प्रवाशांना उघड्यावर लघुशंकेसाठी जावे लागते. प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राजकीय श्रेयवाद की तांत्रिक दिरंगाई?
२०१८ मध्ये तत्कालीन आमदार भीमराव धोंडे यांच्या काळात या कामाची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर पाच वर्षे आमदार बाळासाहेब आजबे यांनी प्रतिनिधित्व केले आणि आता दीड वर्षांपासून आमदार सुरेश धस यांच्याकडे धुरा आहे. "काम कुणाच्या काळात सुरू झाले आणि तांत्रिक अडचणी काय होत्या," याच्याशी सर्वसामान्य प्रवाशाला देणेघेणे नाही. जनतेला फक्त सुसज्ज आणि स्वच्छ बसस्थानक हवे आहे. राज्यभरातून प्रवासी आष्टीत येतात, पण येथील बकाल अवस्था पाहून तालुक्याची अत्यंत नकारात्मक प्रतिमा घेऊन बाहेर पडत आहेत.
२०२४ नंतर कामाला गती, पण प्रतीक्षा कायम
२०२४ पूर्वी या कामाचा वेग संथ होता, मात्र अलीकडच्या काळात कामात काही प्रमाणात प्रगती दिसून येत आहे. तरीही, ८ वर्षांचा प्रदीर्घ काळ उलटून गेल्याने जनतेचा संयम आता सुटत चालला आहे. हे काम युद्धपातळीवर पूर्ण होणे गरजेचे आहे.



stay connected