*श्रद्धा सबुरीच्या पावन भूमीत रंगला.. 'तो भाव भक्तीचा भुकेला' अनोखा कथाकथन प्रयोग*
अहिल्यानगर :- 28 वे राष्ट्रसंत गाडगे महाराज मराठी साहित्य संमेलन शिर्डी येथे नुकतेच संपन्न झाले. संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक राजेंद्र फंड विराजमान होते. स्वागताध्यक्ष आचार्य डॉ. शंकर अंदाणी , प्रमुख पाहुण्या सुमन देसाई, पुरस्कार वितरण अध्यक्ष माया नवथर, आयोजक विलास पाटील कोल्हापूर हे मान्यवर होते. साहित्य संमेलनात व्याख्यान, कथाकथन, कवी संमेलन, राष्ट्रसंत गाडगे महाराज पुरस्कार, इत्यादी कार्यक्रम संपन्न झाले.
साईबाबांच्या श्रद्धा अन् सबुरीच्या पावन भूमीत, संमेलनमध्ये कथालेखक बाळासाहेब देशमुख यांनी 'तो भावभक्तीचा भुकेला' ही धार्मिक कथा सादर करण्यात आली.
संसारात प्रपंच करता,करता वसुधा आपलं गुरुमंत्र सदोदित ओठांमध्ये म्हणत राहते. परमात्मा पांडुरंगाची पंढरपूरकडे जाणारी दिंडी, आपल्या घरी येणार,याचे तिला अप्रूप होते. घरी येणाऱ्या संतांच्या, वारकऱ्यांच्या स्वागतासाठी तिने तयारी केलेली. ऐनवेळी तिने केलेला चिवडा तिच्या जाऊबाईंनी नाकारला. तेव्हा तिला सासूबाईची आठवण झाली. 18 पुराणे आणि शेकडो पोथ्या श्रवण केलेली सासू तिला म्हणत असे 'देवाला आपलेसे करण्यासाठी दोन हाताचा नमस्कार आणि दोन फुले मनोभावे वाहिली ,की ती देवाला पावतात. माणसांची श्रद्धा डोळस असायला हवी. बेगडी, नकली श्रद्धा उपयोगाची नाही. शबरीची उष्टी बोरे श्रीरामाने खाल्ली. गरीब सुदाम्याचे चिमूटभर पोहे देखील श्री कृष्णाने मोठ्या आवडीने खाल्ले. हा भाव भक्तीचा महिमा बाळासाहेब देशमुख यांनी आपल्या कथेद्वारे मांडला. त्यावेळी सर्व सभागृह कथाकथनाने मंत्रमुग्ध झालेले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक श्री रंगनाथ वाडेकर यांनी केले. महाराष्ट्राच्या विविध भागातून साहित्यिक मोठ्या संख्येने संमेलनात हजर होते.


stay connected