बीड जिल्ह्यात उष्णतेचे थैमान; शेतकरी-मजूर सामान्य जनता हैराण

 बीड जिल्ह्यात उष्णतेचे थैमान; शेतकरी-मजूर सामान्य जनता हैराण



बीड (राजू गायकवाड ) – बीड जिल्हा येथे सध्या उन्हाचा कडाका प्रचंड वाढला असून तापमानाने 42 अंश सेल्सिअसच्या पुढे झेप घेतली आहे. वाढत्या उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी आणि मजूर वर्ग सर्वाधिक त्रस्त झाला आहे.


दिवसभर कडक उन्हामुळे शेतातील कामे करणे कठीण झाले आहे. शेतकरी सकाळी लवकर आणि सायंकाळी उशिरा काम करण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, मजुरांना कामाच्या वेळेत बदल करणे शक्य नसल्याने त्यांना उन्हाचा फटका सहन करावा लागत आहे.


पाण्याची टंचाईही गंभीर बनली आहे. अनेक गावांमध्ये विहिरी आणि बोअरवेल कोरड्या पडू लागल्या असून जनावरांसाठीही पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शेती पिकांवर विपरीत परिणाम होत आहे.


आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच भरपूर पाणी पिणे, डोक्यावर टोपी किंवा ओढणी वापरणे आणि शक्यतो सावलीत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


दरम्यान, प्रशासनाकडून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू असून काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तरीही उष्णतेचे वाढते प्रमाण पाहता नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.