११ एकरात ७० लाखांचे उत्पन्न राजकारण सोडून शेतीकडे वळलेल्या संत्रा उत्पादक माजी सभापती संतोष गुंड यांची यशोगाथा
मराठवाड्यातील बीड आणि पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील प्रगतशील शेतकरी तथा माजी पंचायत समिती सभापती संतोष गुंड यांनी आधुनिक शेतीच्या माध्यमातून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राजकारणातील सक्रिय वाटचाल थांबवून त्यांनी पूर्णवेळ शेतीकडे लक्ष केंद्रित केले असून अवघ्या ११ एकर क्षेत्रात संत्रा बाग विकसित करून सुमारे ७० लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळवले आहे.
संतोष गुंड यांनी शेती करताना पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. संत्रा बागेसाठी ऑटो सिस्टीमयुक्त ड्रिप सिंचन व्यवस्था बसविण्यात आली असून त्यामुळे पाण्याचा काटेकोर व नियोजनबद्ध वापर होत आहे. फिल्टर, सॅन्ड फिल्टर, व्हेंचुरी, कंट्रोल व्हॉल्व यांसारख्या आधुनिक यंत्रणांच्या सहाय्याने कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यावर भर देण्यात आला आहे. विहिरीतील पाणी साठवून ते थेट झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचवले जाते, त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे.
त्यांच्या संत्रा बागेत सध्या सुमारे २३०० झाडे असून प्रत्येक झाडापासून दर्जेदार व भरघोस उत्पादन मिळत आहे. योग्य खत व्यवस्थापन, वेळेवर कीड व रोग नियंत्रण, माती परीक्षणानुसार शेती तसेच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलेली मशागत यामुळे संत्र्याची गुणवत्ता लक्षणीयरीत्या वाढली आहे. बाजारपेठेत त्यांच्या संत्र्याला मोठी मागणी असून प्रतिकिलो ४० ते ५२ रुपये दराने विक्री होत आहे.
पूर्वी पंचायत समिती सभापती म्हणून कार्यरत असताना संतोष गुंड यांनी अनेक विकासकामांमध्ये सहभाग घेतला होता. मात्र राजकारणात अपेक्षित समाधान न मिळाल्याने त्यांनी शेती हाच आपला मुख्य व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांचा हा निर्णय योग्य ठरला असून ते इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.
संतोष गुंड हे स्वतःच्या शेतीपुरते मर्यादित न राहता परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन करीत आहेत. शेतीत नवतंत्रज्ञानाचा वापर, फळबाग लागवड, पाणी व्यवस्थापन व बाजारपेठेची माहिती ते शेतकऱ्यांशी नियमितपणे शेअर करतात. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक तरुण शेतकरी शेतीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहू लागले आहेत.
राजकारणाऐवजी शेतीतून आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक सन्मान मिळू शकतो, हे संतोष गुंड यांनी आपल्या यशातून सिद्ध केले आहे. त्यांची ही यशोगाथा केवळ संत्रा उत्पादकांसाठीच नव्हे, तर संपूर्ण शेतकरी वर्गासाठी प्रेरणादायी ठरत आहे.



stay connected