गव्हाणे कुटुंबाने माळरानावर फुलवले नंदनवन
मेहेकरीच्या 'भोपळ्या'ला पाच राज्यात मागणी
आष्टी प्रतिनिधी - तालुक्यातील कानडी खुर्द (मेहेकरी) येथील शेतकरी नानासाहेब गव्हाणे व मंदाकिनी गव्हाणे या पती-पत्नीने उजाड माळरानावर जेथे कुसळ ही उगत नाही अशा मुरमाड, खरीप व नापीक माळरानात सेंद्रिय पद्धतीने भोपळा पीक घेऊन नंदनवन फुलवले आहे. मेहेकरीच्या भोपळ्याला पश्चिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगाना, आंध्र प्रदेश, राजस्थान या पाच राज्यात मोठी मागणी असल्याचे शेतकरी नानासाहेब गव्हाणे सांगतात.
आष्टी तालुक्यातील कानडी खुर्द (मेहकरी) येथील शेतकरी नानासाहेब गव्हाणे व मंदाकिनी गव्हाणे या पती-पत्नीने २४ वर्षापासून घरीच निंबोळी अर्क तयार करून सेंद्रिय पद्धतीने वर्षातून तीन वेळा भोपळा पीक घेतात. गव्हाणे कुटुंबीयांना एकूण १२ एकर शेती असून ते २ एकर शेतीमध्ये ८ × २ अंतरावर भोपळा लावून कमी वेळेत व कमी खर्चात
एकरी १५ ते २० टन पीक घेत आहेत. त्यामुळे वर्षातून तीन वेळा पीक घेऊन वर्षाकाठी ६ ते ७ लाख रुपये निव्वळ उत्पन्न घेत आहेत.
आज बाजारामध्ये रासायनिक फवारण्या करून पिकवलेले विविध भाजीपाला यापासून नागरिकांना विविध आजार जडत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे गव्हाणे पती-पत्नी या कुटुंबाने संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीनेच पिकवित असल्याने याचा शरीरावर कुठलाही दुष्परिणाम जाणवत नसल्याचे हे कुटुंब सांगत आहे.
या भोपळ्याचा वापर हलवा, पेठा व भाजीसाठी गिरवी तयार करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर नागरिक करत असल्याने भोपळ्याला मोठी मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
नानासाहेब गव्हाणे या शेतकऱ्याने दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी आष्टी तालुक्यातील ३५ गावातील शेतकऱ्यांचा एक भव्य मेळावा मेहेकरी येथे आयोजित करून उपस्थित शेतकऱ्यांना भोपळा पिकाविषयी बहुमोल असे मार्गदर्शन केले आहे. या मेळाव्याला ३५ गावातून ३५० शेतकरी व ७० महिला उपस्थित होते. मंदाकिनी गव्हाणे हे शाळेतील आठवण सांगतात की, मी शाळेत असताना मला काही विषयात 'भोपळा मार्क' पडायचे परंतु उजाड माळरानावर याच भोपळ्याची शेती करून मी सोनं केले असल्याचे त्या आवर्जून सांगतात आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक आपल्या शेतात न घेता आधुनिक पद्धतीने शेती करून उत्पन्न वाढवले तर शेतकऱ्यांना चांगले दिवस नक्कीच येतील व शेतकऱ्यांच्या कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या ही थांबतील असं ते ठामपणे सांगत आहे.



stay connected