शालेय विद्यार्थी - विद्यार्थीनींसाठी एसटीची '१८००२२१२५१' हि' हेल्पलाईन सुरू'
----- (परिवहन मंत्री प्रताप सरनाईक)
मुंबई : (२६ नोव्हेंबर, २०२५) शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी एसटी महामंडळाची '१८००२२१२५१' या क्रमांकाची हेल्पलाइन' सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी दिली.
राज्यभरातील लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटी महामंडळ शाळेत जाण्यासाठी व तेथून घरी येण्यासाठी बस फेऱ्या उपलब्ध करून देत असते. राज्य शासन एसटीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना घरातून शाळेला जा ये करण्यासाठी मासिक पास मध्ये ६६. ६६% सवलत दिली जाते. तसेच 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर' योजनेंतर्गत बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत मासिक पास दिला जातो.
तथापि, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला भेट दिली असता, तेथे उपस्थित असणाऱ्या शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी अनेक समस्या व तक्रारी मंत्री महोदयांसमोर मांडल्या अनेक शालेय बसेस वेळेवर न सुटणे, गर्दी असल्यामुळे थांब्यावर न थांबणे, बसेस उशिरा येणे अथवा अचानक रद्द होणे यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार त्यातील काही विद्यार्थ्यांनी केल्या तसेच संध्याकाळच्या वेळी शाळा -महाविद्यालय सुटल्यानंतर किमान एक तासात मुले आपल्या घरी जाणे अपेक्षित असते. परंतु, बसेस वेळेवर न आल्याने अथवा अचानक रद्द झाल्याने मुलांना घरी पोहोचण्यास खूप उशीर होतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या पालकाचे ओरडे खावे लागतात. अनेक ठिकाणी तर गैरसमजातून पालकांनी विद्यार्थ्यांना उशिरा येण्याबद्दल शिक्षाही दिलेल्या आहेत. याचा विपरीत परिणाम म्हणून काही विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत.
विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी '१८००२२१२५१' या क्रमांकावर एसटीची हेल्पलाईन सुरू झाली आहे.
शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना आपल्या घरातून शाळेत जात असताना अथवा शाळेतून घरी येत असताना बसेस उशिरा सुटणे, त्या अचानक रद्द होणे, तांत्रिक बिघाडामुळे बस नादूरुस्त झाल्याने घरी पोहोचण्यास अडचण निर्माण झाल्यास त्यांनी तातडीने एसटीच्या हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क करून मदत घ्यावी या हेतूने हा '१८००२२१२५९१' हेल्पलाइन क्रमांक सुरु करण्यात आला आहे. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या क्रमांकावर संपर्क साधावा, जेणेकरून त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देता येईल. असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. तसेच ३१ विभागातील सर्व विभाग नियंत्रकांचे दुरध्वनी संपर्क क्रमांक संबंधित शाळा, महाविद्यालयांना देण्यात येत आहे. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच थेट विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी देखील या विभाग नियंत्रकांना संपर्क करून आपल्या समस्या मांडू शकतात.विद्यार्थ्यांच्या शालेय नुकसानीची जबाबदारी आगार व्यवस्थापकावर
एसटी बसेस उशिरा सुटणे, अचानक रद्द होणे अथवा अन्य कारणामुळे शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींचे तास चुकतात किंवा परीक्षेला ते वेळेवर पोहोचू शकत नाहीत, काही वेळेला त्यांची महत्त्वाची परीक्षा देखील बुडते विद्यार्थ्यांच्या अशा शालेय नुकसानीला संबंधित क्षेत्रातील आगार व्यवस्थापक व त्यांचे पर्यवेक्षक यांना जबाबदार धरण्यात येईल! या पुढे सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ५-६ या वेळेत मुख्य बसस्थानक व ज्या ठिकाणी विद्यार्थी चढ-उतार जास्त होतो अशा थांब्यावर संबंधित आगाराच्या पर्यवेक्षकांनी गणवेशात थांबून वाहतुकीचे नियोजन करावे. शाळेचा शेवटचा मुलगा अथवा मुलगी बस मधून सुखरूप घरी जाईपर्यंत संबंधित पर्यवेक्षकांनी तेथून हलू नये ! अशा सक्त सूचना मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिलेल्या आहेत. तसेच शालेय बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामूळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची लेखी तक्रार संबंधित विद्यार्थी अथवा विद्यार्थिनींनी तसेच संबंधित शाळा-महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी केल्यास जितक्या दिवसाचे शालेय नुकसान होईल, तितके दिवस यास जबाबदार असणारे पर्यवेक्षक अथवा अधिकाऱ्यांना निलंबित अथवा सक्तीचे रजेवर पाठवण्यात यावे. असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या महाव्यवस्थापक (वाहतूक) यांना दिले आहेत.


stay connected