महेश सह.साखर कारखाना वाचविण्यासाठी आज होणाऱ्या जिल्हाधिकारी कचेरीसमोर धरणे आंदोलनात संचालक मंडळ, ऊसउत्पादक शेतकरी,सभासदांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
- माजी आ. भीमराव धोंडे
-----------------
आष्टी ( प्रतिनिधी )
आष्टी तालुक्यातील महेश (कडा) सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी संचालक मंडळाने कर्ज रक्कम भरून कारखाना सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. कारखान्याचे यंदा धुराड पेटवण्याच्या दृष्टीने प्रगतीपथावर कामकाज सुरू झाले होते परंतु राज्य व केंद्र सरकारने परवाना रद्द केला आहे.हा रद्द केलेला परवाना पूनर्स्थापित करावा या मागणीसाठी कार्यक्षेत्रातील सभासद, ऊसउत्पादक शेतकरी व संचालक मंडळ यांचे आज शुक्रवार दि.३१ ऑक्टोबर २०२५ रोजी बीडचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन होत आहे. या लोकशाही मार्गाने होणाऱ्या धरणे आंदोलनात संचालक मंडळ,ऊसउत्पादक शेतकरी,सभासदांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शेतकऱ्यांचे नेते माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, महेश (कडा) सहकारी साखर कारखाना बीड,अहिल्यानगर,धाराशिव या तीन जिल्ह्यातील सात तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा वर्ग या कारखान्यावर अवलंबून आहे. दुष्काळी आष्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आष्टी तालुक्याला मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार होता.अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम लागले असते परंतु राज्य व केंद्र शासनाने या कारखान्याचा परवाना रद्द केला आहे.साखर कारखान्यावर असलेले बँकेचे कर्ज माजी आ.भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने निल करून कारखान्याचे धुराडे पेटवण्याच्या दृष्टीने कामकाज प्रगतीपथावर सुरू करण्यात आले होते परंतु सरकारने हा परवाना रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.साखर कारखाना कार्यरत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून इतर कारखाने हंगाम सुरू करण्याच्या तयारीत असताना देखील महेश कारखान्याचे सर्व काम ठप्प झाले आहे.यामुळे माजी आ.भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्षेत्रातील सभासद,ऊस उत्पादक शेतकरी आज ३१ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
------------------


stay connected