अहिल्यानगर येथे झालेल्या घटनेचा निषेध व कायमस्वरूपी शांततेसाठी मागणी
अहिल्यानगर येथे नुकताच घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण समाजव्यवस्था हादरून गेली आहे. शेकडो वर्षांपासून एकमेकांसोबत नांदणारे, एकत्र सण-उत्सव साजरे करणारे नागरिक आज भीतीच्या छायेत जगण्यास भाग पाडले जात आहेत. ही घटना केवळ एका समाजाची नव्हे, तर आपल्या संपूर्ण मानवतेची जखम आहे.
आपला भारत देश नेहमीच "सर्व धर्म समभाव" या विचारांवर चालत आला आहे. जाती-धर्माच्या नावाने भांडणे करणे हे आपल्या परंपरेला कलंक लावणारे आहे. धार्मिक तणाव जातीय तणाव दंगलीतून केवळ घरांचे, दुकानांचे वा जीवांचे नुकसान होत नाही, तर माणुसकीचा पाया खचतो. अहिल्यानगरातील घडामोडींनी हाच धक्का दिला आहे.
आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटात तर्फे हाशिम शेख मुस्लिम आघाडी या हिंसाचाराचा तीव्र निषेध करतो व प्रशासनाकडे खालील मागण्या करतो –
लोकांमध्ये तेढ व वैमनस्य निर्माण करणारे खऱ्या दोषींना शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.
निष्पाप व निरपराध नागरिकांवर अन्याय होऊ नये, ज्या मुलांचा रस्ता रोको आंदोलनामध्ये सहभाग नाही अशा लोकांवर कारवाई न होता यासाठी पोलिसांनी अधिक दक्षतेने व पारदर्शकतेने काम करावे.
ज्यांनी रस्त्यावर रांगोळी काढून धार्मिक भावना दुखावल्या धार्मिक तणाव निर्माण केले अशा सर्व बांडगुळांना कठोर शिक्षा व्हावी.
अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत याकरिता प्रशासनाने सर्व समाजघटकांना एकत्र आणून शांती समित्या व संवादाचे व्यासपीठ निर्माण करावे.
शाळा, महाविद्यालये व गावपातळीवर बंधुता, ऐक्य आणि शांततेचा संदेश देणारे उपक्रम नियमित राबवावेत.
शांतता राखणे ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. परंतु, जेव्हा समाजात दहशत, अविश्वास आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होते, तेव्हा प्रशासनाने ठाम भूमिका घेणे आवश्यक असते. आपले तातडीचे हस्तक्षेप व योग्य कारवाईमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होईल व पुन्हा एकदा बंधुत्वाचे वातावरण फुलून येईल. अहिल्यानगरला पुन्हा शांतता, ऐक्य आणि सुरक्षिततेचा आश्वासक श्वास मिळावा. गुन्हे गोविंदाने सर्व समाज नांदावे असे अपील करण्यात येते.
याकरिता आज रिपब्लिकन पक्ष आठवले गटातर्फे मा. ज्योती कदम उपजिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मुस्लिम आघाडी पुणे शहर अध्यक्ष हाशिम शेख, नदीम मेमन, फिरोज शेख, अमित गायकवाड, सलाउद्दीन शेख, जावेद मेमन, सोनाली घुलावडे, सोनाली धोत्रे, सोनाली जोगडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
stay connected