वादळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, महावितरणने विज पुरवठा सुरळीत करावा :- माजी आ. भीमराव धोंडे
आष्टी ( वार्ताहर):- तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने आष्टी मतदार संघातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे फळबागा तसेच कांदा पिकाचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनाम्याबाबत कसलेही निकष न लावता तात्काळ आर्थिक मदत द्यावी, त्याचप्रमाणे वादळाने अनेक भागात विजेचे खांब पडले आहेत, तारा तुटल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना आणि व्यावसायिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वादळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना येत्या पंधरा दिवसाच्या आत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा करावी अन्यथा अशा पिडीत शेतकऱ्यांना घेऊन आष्टी तहसीलवर प्रचंड मोर्चा काढण्यात येणार असल्याचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, प्रत्येक वर्षी मे महिन्यात थोड्याफार प्रमाणात अवकाळी व वादळी पाऊस पडतो त्या पावसाने शेतकऱ्यांचे थोडेफार नुकसान होते. यंदा मात्र प्रचंड प्रमाणात वादळी पाऊस झाला. आष्टी मतदारसंघात वेगवेगळ्या फळबागाचे क्षेत्र मोठे आहे. कांदा पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शेतकरी वर्ग उन्हाळी कांदा काढून तो वाळवून भुसारा भरुन ठेवतात. परंतु मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. अक्षरशः कांदा शेतात साचलेल्या पाण्यात भिजून त्याचा चिखल झाला. निसर्गाने हातातोंडाशी आलेला घास हीराऊन घेतला. त्याच कांदा विक्रीतून शेतकरी पुढील हंगामातील बी, बियाणे, खते तसेच पाळी - पेरणी यांचे नियोजन करतो, तसेच लेकरांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्चही त्यावर अवलंबून होता. पावसाने कांद्या बरोबर फळबागांचे प्रचंड नुकसान झाले . येत्या महिन्याभरात तोडणीसाठी आलेल्या डाळिंब बागा उन्मळून पडल्या आहेत तसेच आंबा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मे महिन्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीही करता आल्या नाहीत.
काही शेतकऱ्यांचा पावसाने झोडपलेला कांदा कवडीमोल भावाने विकला गेला. तीन दिवसांपूर्वी वादळात विजेचे खांब व तारा तुटल्याने सर्वत्र विज पुरवठा खंडीत झालेला आहे. विज नसल्याने पिण्याच्या पाणी प्रश्न तसेच जनावरांचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. या भागात दुध व्यवसाय मोठा आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे गाईचे गोठे असुन त्यामध्ये जास्त संख्येने गाई आहेत त्यांना लागणारा चारा बारीक करण्यासाठी विजेची आवश्यकता आहे तसेच गाईसाठी पिण्याकरीता पाणी भरपूर लागते. तीन चार दिवसांपासून विज पुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांना तसेच व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागते आहे. विज पुरवठा बंद असल्याने स्वयंपाक घरातील पिठापासून अनेक समस्यांना निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे महावितरण कंपनीने विज पुरवठा दोन दिवसांत सुरळीत करावा. वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या घरांचे, कांदा चाळी, जनावरांचे गोठे यावरील पत्रे उडून गेले आहेत. तसेच फळबागां आणि कांदा व इतर पिकांचे झालेले नुकसान यांचे फक्त पंचनामे न करता शासनाने पंधरा दिवसांच्या आत पिडीत शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा करावी नसता आष्टी मतदारसंघातील पिडीत शेतकऱ्यांना घेऊन आष्टी तहसीलवर प्रचंड प्रमाणात मोर्चा काढला जाईल असा इशारा माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दिला आहे.
stay connected