JALNA | मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
- शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आयुष्यभर राजू शेट्टी यांनी ज्या पद्धतीने रस्त्यावर येऊन संघर्ष केला व संसदेत जाऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायला सत्ताधाऱ्यांना भाग पाडले. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आणि बहुजन समाजाच्या हितासाठी रस्त्यावरच्या लढाई बरोबर कायदेमंडळात जाऊन मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडायचे असल्यास त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवायला हवी. जालना मतदार संघातून ते लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवत असतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी मनोज जरांगे पाटील यांना केले आहे.
राजू शेट्टी यांनी कायदेमंडळात जाऊन उसाच्या एफआरपीचा विषय सरकारकडून मान्य करून घेतला, चुकीचे भूमीअधिग्रहण बिल संसदेतून उधळून लावले हे केवळ राजू शेट्टी लोकसभेत होते म्हणून शक्य झाले. म्हणून रस्त्यावरच्या संघर्षा बरोबर कायदेमंडळांमधली लढाई खूप महत्त्वाची आहे. रस्त्यावरती त्यांनी उभा केलेला मराठा आरक्षणाचा लढा हा अलौकिक आहे. परंतु या लढ्याला आजही पूर्ण यश मिळालेले नाही. कायदेमंडळात नवीन कायदा झाल्याशिवाय मराठा समाजाला कायमचे टिकणारे आणि योग्य आरक्षण मिळणे अशक्य आहे. यासाठी कायदेमंडळामध्ये मनोज जरांगे पाटलांसारखा प्रतिनिधी असायला हवा, मनोज जरांगे पाटील यांनी कुठल्याही आघाडीत न जाता स्वतंत्रपणे समाजाच्या ताकदीवर लोकसभेची निवडणूक लढवावी अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली आहे.

stay connected