आष्टीचा तरुण पाच दिवस सायकलवर प्रवास करत पोहचला अंतरवलीत
आष्टी : प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवली जिल्हा जालना येथे मनोज जरांगे पाटील यांची दि.१४ ऑक्टोबर रोजी सभा होणार असून त्यासाठी आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील अशोक पोकळे हे सायकलवरून १८० किलोमीटर अंतर पार करत गुरुवारी अंतरवली सराटी येथे पोहचले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंबड जिल्ह्यातून अंतरवली सराटी येथे मागील महिन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सलग १७ दिवस उपोषण केले. हे उपोषण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्यांनी आश्वासन दिल्याने सोडवण्यात आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी 30 दिवसात मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्याने मनोज जरांगे पाटील यांनी सतराव्या दिवशी उपोषण स्थगित केले होते. त्यानंतर मनोज जारंगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करत 14 ऑक्टोबर रोजी अंतरवली येथे मराठा समाजाची मोठी सभा घेण्यासाठी सर्व समाजाला निमंत्रित केले होते. याच 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सभेसाठी आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील तरुण अशोक पोकळे हे रविवारी दुपारी आष्टी येथून अंतरवलीकडे सायकलवर निघाले होते. त्यांनी आष्टी धामणगाव पाथर्डी उमापूर गेवराई शहागड अंतरवली असा 180 किलोमीटर प्रवास सायकलवर करत सभा स्थळ गुरुवारी गाठले आहे. तेथे गेल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी या सायकलवर आलेल्या तरुणाचे कौतुक करत शाबासकी दिली. मराठा समाजासाठी सर्वत्र लोक एकत्र होत आहेत. या सभेसाठी लाखो लोकांचा जनसमुदाय जमणार आहे.




stay connected