Lokabhirakshak : लोकअभिरक्षक मुळे तो झाला मुक्त
अहमदनगर प्रतिनिधी : गेल्या तीन वर्षांपासून तुरुंगात खितपत पडलेला तरुण विधी सेवा प्राधिकरणाच्या लोकअभिरक्षक विभागामुळे मुक्त झाला आहे. जिल्हा लोकअभिरक्षक अॅड. अनिल सरोदे आणि सहायक लोकअभिरक्षक अॅड. वैभव बागूल यांनी काम पाहिले.
नितीन भाऊसाहेब तांदळे (रा. कोपरगाव) या तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्रही पाठविले होते. त्यानंतर त्याने नियमित जामीन मिळण्यासाठी अर्जही केला नाही. तो सध्या नाशिक येथील कारागृहामध्ये न्यायालयीन बंदी म्हणून होता.
नाशिक कारागृह अधीक्षकांनी ही बाब अहमदनगर येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून दिली. प्राधिकरणाच्या न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी या प्रकरणात मुख्य लोकअभिरक्षक अॅड. अनिल सरोदे आणि सहायक अभिरक्षक अॅड. वैभव बागूल यांची नियुक्ती केली. त्यांनी आरोपी नितीन तांदळे याच्या वतीने कोपरगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. तांदळेविरुद्ध तीन वर्षांपासून खटला सुरू झाला नसल्याकडे लक्ष वेधले. त्यास नियमित जामीन देण्यासाठी देण्याचे म्हणणे सादर केले. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून त्यास अटी व शर्तीच्या आधारे जामीन मंजूर केला आहे.

stay connected