रमजानुल मुबारक -२२
*कयामत येणार पण कधी?*
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
पवित्र रमजान महिन्याचे आता फक्त आठ दिवस बाकी आहेत.तरावीहच्या नमाजमध्ये शेवटच्या दहा दिवसांमध्ये अल्विदाई तस्बीह म्हटली जाते. काल एकविसाव्या रात्री ती पहिल्यांदा म्हटली गेली. त्यातील निरोपाचे शब्द ऐकून नमाज पठण करणाऱ्या भक्तांचे डोळे पाणावले.अत्यंत भावविवश होऊन सर्वजण अल्लाहची माफी मागत होते. रमजान महिन्याचे पालन जसे केले पाहिजे तसे आपण करू शकलेलो नाही.ही भावना व्यक्त करताना अल्लाहकडे माफी मागितली जात होती.सध्या सुरू असलेला रमजानचा कालखंड हा माफीचा असल्यामुळे प्रत्येकाने दररोज अतिशय नम्रतेने दीन,हीन चेहऱ्याने, शक्य असल्यास डोळ्यात अश्रू आणून अल्लाहची माफी मागून दुआ मागितली पाहिजे. कारण अशा लोकांची माफी अल्लाह लवकर कुबूल करतो.
इस्लामी प्रमुख श्रद्धा म्हणजे कयामत होय. कुरआन व हदीस मधून सुद्धा हे सांगितले गेले आहे कि, अल्लाहने जशी ही सृष्टी निर्माण केली,तशी ती एक दिवस नेस्तनाबूद सुद्धा केली जाणार आहे.यालाच कयामत म्हणतात. कयामत नंतर सर्व लोक अल्लाह समोर पेश केले जातील. तेथे प्रत्येकाचा हिशोब होईल.त्यानंतर प्रत्येकाने केलेल्या कार्यानुसार जन्नत किंवा जहन्नम याचा निर्णय होईल.परंतु कयामत कधी येणार याची खरी माहिती फक्त अल्लाहला आहे.कारण कयामत कधी येईल हे अल्लाहने कुणाला ही सांगितलेले नाही.परंतु कयामत येण्यापूर्वीची लक्षणे सांगितली गेली आहेत. ती दोन प्रकारची आहेत. एक छोटी लक्षणे जी प्रेषित हजरत पैगंबराच्या काळापासून आजपर्यंत अस्तित्वात आली आहेत.यांना अलामाते सगीरा म्हणजे छोटी लक्षणे म्हणतात. ही लक्षणे जवळपास शंभरपेक्षा जास्त आहेत आणि ही जवळपास सर्व आतापर्यंत सिद्ध झाली आहेत. दुसरे मोठी लक्षणे जी कयामतच्या अगदी आधी जाहीर होतील,आणि ती जाहीर होताच कयामत येईल. त्यांना अलामाते कबीरा म्हणजे मोठी लक्षणे म्हटले जाते.ती सुमारे दहा किंवा त्यापेक्षा जास्त आहेत.या सर्वांचा धावता आढावा आपण घेणार आहोत.
कयामतच्या छोट्या लक्षणांमध्ये हजरत पैगंबरांनी जगाचा निरोप घेणे,त्यांच्यानंतर प्रेषित्वाचे खोटे दावेदार निर्माण होणे,चंद्राचे दोन भाग होणे (हे लक्षण तर पैगंबरांच्या हयातीतच सिद्ध झाले होते). लोकांची अनामत स्वतःची समजणे आणि ती हडप करणे,जकात आदा करण्यामध्ये सुद्धा कुचराई करणे,धोका देणे म्हणजे खर्याला खोटे सिद्ध करणे. शिकली सवरलेली माणसं जास्त असतील,परंतु त्यांच्यात समजूतदारपणा नसेल .(हे आपण सध्या सर्वत्र पाहतच आहोत).हज यात्रा करून आलेली माणसं सुद्धा खोटं बोलतील.जगासमोर स्वतःला फार धार्मिक आणि सज्जन म्हणून सादर करतील प्रत्यक्षात मनात मात्र खूप काळंबेरं राहील.लावालावी करून मने कलुषित करणाऱ्यांची संख्या वाढेल.कोणत्याही बाबीची शहानिशा न करता अफवा पसरवल्या जातील.सज्जनतेचा आव आणणाऱ्यांमध्ये दुर्जन लपलेले असतील. खऱ्या खोट्याची शहानिशा न करता खोटे आरोप लावले जातील.
दुराचाऱ्याना सदाचारी समजले जाईल.
मातापित्याकडे दुर्लक्ष करून त्यांची ना फरमानी केली जाईल. मित्रांना जवळ केले जाईल ,घरच्यांना दूर केले जाईल,पत्नीचे ऐकून आईला दूर सारले जाईल,मशिदीमध्ये उंच आवाजात बोलले जाईल,मशिदी बनवताना त्याच्यामध्ये आरास व सजावट केली जाईल. चांगल्या आकर्षक मशीदी बांधून किती चांगली मशीद बांधली याबाबत गर्व केला जाईल.मशीदी समोरून जातील पण नमाज पठण करणार नाहीत. पावसानंतर सुद्धा उष्णता कायम राहील.अवकाळी पाऊस पडेल.अशी अनेक लक्षणे कयामतची सांगितली गेली आहेत. तो सर्व काळ खूप जवळ आलेला आहे.त्यासाठी प्रत्येकाने सदाचरण करण्याचा प्रयत्न करावा.(क्रमशः)
-----------------------------------

stay connected