रमजानुल मुबारक -10
*रोजे आणि वैज्ञानिक फायदे*
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
*9226408082*
अल्झायमर एक असा आजार आहे,ज्यामध्ये मानवी मस्तिष्कातील शिरा या स्वतःहून मृत पावतात.पार्किन्सन या आजारात माणसाच्या हातांना व शरीराला कंप सुटतो. कित्येक वेळा आपल्या शरीरात असे काही घाव निर्माण होतात कि जे सतत पाण्यामुळे व जेवणामुळे बरे होत नाही व त्यापासून गंभीर आजार बळावण्याची भीती वाटते. परंतु ज्यावेळी रोजे धरले जातात तेव्हा काही दिवसातच हे शरीराचे घाव भरायला लागतात असे निरीक्षण वैज्ञानिकांनी नोंदवले आहे.
अमेरिकेतील दहा हजार वैज्ञानिकांनी फिजिओलॉजी जनरल मध्ये एक रिपोर्ट प्रकाशित केली आहे. त्यात दाखवले आहे कि रोजामुळे मानवी शरीरात ब्लड प्रेशर व कोलेस्ट्रॉल यांची लेव्हल नॉर्मल राखण्यास मदत होते. रोजा फक्त कोलेस्ट्रॉल नॉर्मल ठेवत नाही तर रोजामुळे हृदयाशी संबंधित सर्व रोगांवर नियंत्रण मिळविता येते. हा रिपोर्ट एक अशा फिजिओलॉजी जनरल मध्ये प्रकाशित झाला आहे,ज्याच्या सर्व दहा हजार सदस्यांकडे डॉक्टरेटची डिग्री आहे.
इस्लाममध्ये जीवन आणि मृत्यूचा संबंध हा अल्लाह अर्थात ईश्वराशी संबंधित आहे. प्रत्येक व्यक्तीला ठराविक वयानंतर किंवा ठराविक कालावधीनंतर मृत्यूला सामोरे जावेच लागते. परंतु आपल्या एखाद्या चांगल्या कर्मामुळे तो दीर्घायुषी देखील होऊ शकतो. इस्लामचे प्रत्येक कर्तव्य व कुरआनच्या प्रत्येक आयतीमध्ये यशाचे गमक लुप्त आहे. तीस रोजे यासाठीच अल्लाहने अनिवार्य केले आहे कि ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या शरीराला अनेक गंभीर आजारांपासून दूर ठेवू शकतो.
जगभरातील वैज्ञानिकांच्या मते दरवर्षी नियमित रोजे धरणाऱ्यांचे आयुष्य वाढते. जे लोक रोजे धरतात, ते इतर सामान्य लोकांपेक्षा अधिक काळ जगतात.
रमजान महिन्यात प्रत्येक मानवी शरीरात एक अशी प्रक्रिया होते,जी इतर अकरा महिन्यात होत नाही. या प्रक्रियेला ऑटोफेजी प्रोसेस म्हणतात. या प्रक्रियेत शरीरात उपलब्ध पेशी या आपल्या शरीरातील इतर कमकुवत पेशी खाऊन टाकतात व त्यांच्या जागी नवीन पेशी निर्माण होतात. जपानी वैज्ञानिक युशी नोरी यांनी आपल्या या संशोधनाने पूर्ण जगाला अचंबित केले. त्यांनी हे सिद्ध केले कि या प्रक्रियेद्वारे रोजे धरल्याने कॅन्सर सारखा गंभीर आजारही बरा होऊ शकतो. कुरआनच्या 30 पाऱ्यांमध्ये अनेक प्रकारच्या यशाचे रहस्य सामावलेले आहे. 30 रोजांमुळे शरीराला आजारापासून मुक्त करण्याचे अनेक संकेत प्राप्त होतात. आज चौदाशे वर्षानंतरही विज्ञानाने इस्लामचा हा दावा खरा म्हणून सिद्ध केला आहे. इस्लाम आणि विज्ञान यांचा निकटचा संबंध आहे. जगाच्या इतिहासात अनेक मुस्लिम वैज्ञानिकांनी विज्ञान आणि इस्लाम यांची समानता वेगवेगळ्या प्रयोगांनी सिद्ध केली आहे.(क्रमशः)
--------------------------------
रमजानुल मुबारक - ११
*संयम - रोजाचा स्थायीभाव*
*सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
*9226408082*
रमजान महिन्याचा दुसरा अशरा आता सुरु झाला आहे. दैनंदिन दिनक्रम आता स्थिर झाला आहे . उन्हाळ्याचा त्रास ही काही अंशी अंगवळणी पडला आहे.पूर्वी मंदिरे, मशिदी या कच्च्या होत्या मात्र भक्ति करणारे भक्त पक्के होते.आता खूप बदल झालाय. रात्रीच्या नमाज मध्ये स्लबमध्ये होणारी गरमीची तीव्रता कमी करण्यासाठी मशिदींमधून कुलरची व्यवस्था करण्यात येत आहे.प्रार्थना करतांनाही आरामात विना त्रास करण्याची प्रवृती वाढत आहे.आपण उन्हाळ्याची थोडीशी तीव्रता सहन करु शकत नाही,मग जे रात्रंदिवस भट्टी समोर उभे राहून कार्य करतात ते कसे सहन करीत असतील त्यांची जाणिव यानिमित्ताने सर्वांना होत असेल.
रमजान महिन्यातील रोजे म्हणजे केवळ उपाशी राहणे नव्हे . संयम(सब्र)निर्मिती हा देखील रोजाचा स्थायीभाव आहे. म्हणूनच रमजानला सब्र का महिना असे ही म्हटले जाते.रमजान मध्ये रोजे सुरू केल्यानंतर आपण स्वतःच काही बंधने लादून घेत असतो.एकदा पहाटे सहेरी खाण्याची वेळ संपल्यानंतर सूर्यास्तापर्यंत काही ही न खाण्याचा निश्चय स्वतःच करीत असतो.हीच स्वयंशिस्त आपल्यामध्ये संयम निर्माण करते. उपवास केल्याने भुकेल्याची अवस्था, तहानलेल्यांची व्याकुळता याची जाण आपल्यात निर्माण होते. ज्यांना वेळेवर खायला अन्न मिळत नाही त्यांची काय अवस्था होत असेल याची जाणिव निर्माण होते. जे तहानलेले असतात त्यांच्या प्रती सहानुभूतीची भावना निर्माण होते. आपल्याला सर्व सुखे प्राप्त आहेत परंतु या जगात जे दीन आहेत, गरीब, अनाथ आहेत ते आपले जीवन कसे जगत असतील याची जाणिव रोजामुळे निर्माण होते.एकदा रोजा धरल्यानंतर सायंकाळपर्यंत आता काहीही सेवन करायचे नाही अन्यथा ईश्वर नाराज होईल ही भिती मनात बाळगून आपण मगरीबची वेळ होण्याची आतुरतेने वाट पाहत असतो. अकरा महिने मगरीब आपली वाट पाहते पण या महिनाभर आपण मगरीबची प्रतिक्षा करीत असतो. एक मिनीट जरी इफ्तारला वेळ असेल व आपल्याला कितीही तहान लागलेली असली तरी आपण समोरच्या पाण्याच्या ग्लासला हात लावीत नाही, स्वयंशिस्तीचे यापेक्षा दुसरे उदाहरण शोधूनही सापडणार नाही.
समाजातील जे गरजू घटक आहेत त्यांच्या गरजांची जाणिव व्हावी व या गरजा पूर्ण करण्याची भावना आपल्यात निर्माण व्हावी हा रोजाचा मूळ उद्देश आहे. रोजाच्या माध्यमातून ईश्वरी आदेशांचे पालन करुन आपले वर्तन सदाचारी करण्याबरोबरच आपल्या स्वच्छंदी आचरणाला लगाम घालून स्वतःच स्वतःवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न रोजेदार हा करीत असतो.(क्रमशः)
--------------------------------
stay connected