*सिध्दगड...* *हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अजरामर शौर्याचा इतिहास सांगणारी बलिदान भूमी...*

 *सिध्दगड...*
*हुतात्मा भाई कोतवाल यांच्या  अजरामर शौर्याचा इतिहास सांगणारी बलिदान भूमी...*





*"भारतीय युवकांचे प्रेरणास्थान तथा महाराष्ट्रातील तमाम नाभिक समाजाचे स्फूर्तिस्थान म्हणून परिचित असलेला किल्ला म्हणजेच मुरबाडचा सिध्दगड...."*


सिद्धगड ही पावन भूमी ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात आहे.मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्टेशन पासून माळशेज घाट रोडवर मुरबाड तालुका आहे.येथून म्हसा गाव मार्गे या गडावर जाता येते.

मुरबाड येथून दिवसा एसटी बसने म्हसा गाव व स्मारक कमानी पर्यंत जाण्याची सोय उपलब्ध आहे. 

सिद्धगड येथे खाजगी वाहनानेही जाता येते त्यासाठी कल्याण माळशेज घाट नगर मार्गाने मुरबाड अंतर ३० किमी. , मुरबाड म्हसा अंतर १२ किमी व पुढे म्हसा धसई रस्त्याने जांभूर्डे गावापासून पासून सिद्धगड कोतवाल स्मारक अंतर १२ किमी आहे.

साधारण २१ किमी अंतरावरील सिद्धगड परिसर हा भीमाशंभर अभयारण्यात येतो.नारिवली या गावापासून काही अंतरावर डोंगर पायथ्याशी सिद्धगड पाडा हे गाव आहे. तिथून पायवाट काढत अगदी जंगलाच्या मधोमध पोहचल्यावर काकड माळ लागतो, तिथे भावरी कुटुंब फार पूर्वी पासून राहत आहे, तिथून अगदी जवळच हे स्थळ आहे. गर्द झाडे व घनदाट अरण्यात विविध प्रकारचे वन्यजीव, पशु-पक्षी आढळतात. भीमाशंकर अभयारण्याच्या अंतर्गत हा संपूर्ण परिसर येत असल्याने येथील जंगलाचे चांगले संवर्धन झाले आहे. अनेक उपयुक्त वनौषधी येथे आढळतात. दक्षिण तटावर भैरवाचे स्थान आहे.

क्रांतीकारकांची भूमी म्हणून या परिसराची ख्याती आहे. 

स्वातंत्र्य लढयात ब्रिटिशांना सळो-की-पळो करून सोडणा-या आणि आपल्या प्राणांची आहुती देणा-या वीर भाई कोतवाल व हिराजी पाटील या महान क्रांतीकारकांची ही ‘बलिदानभूमी’ म्हणून प्रचलित आहे.तरुणांसाठी तर ही भूमी म्हणजे स्फूर्तीस्थान आहे.

२ जानेवारी १९४३ रोजी क्रांतिकारक हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांना सिद्धगड किल्ल्याच्या पायथ्याशी इंग्रज सैन्याशी लढताना वीरमरण आले होते. तेव्हा पासून या ठिकाणाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे.

सिध्दगड स्मारक समितीच्या वतीने या ठिकाणी प्रत्येक वर्षी २ जानेवारी हा दिवस *बलिदान दिवस* म्हणून साजरा केला जातो.

या ठिकाणी एक जानेवारी रोजी देखील समितीच्या वतीने शालेय मुलांच्या विविध स्पर्धा आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.रात्री भजन,पोवाडे या सारख्या कार्यक्रमांचा समावेश असतो.

अशा प्रकारे बलिदान दिनाच्या आदल्या दिवशी आणि रात्रभर जागर करून एक प्रकारे हुतात्म्यांना आदरांजली वाहून अभिवादन केले जाते. 

दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन जानेवारीच्या सकाळी ६.१० वाजता या ठिकाणी हुतात्म्यांच्या नातलगांच्या उपस्थितीत क्रांतिज्योत प्रज्वलित केली जाते.पोलीस दलाकडूनही हुतात्म्यांना मानवंदना दिली जाते.

अभिवादनाच्या या कार्यक्रमात राज्य सरकारचे मंत्री, स्थानिक आमदार,तहसीलदार, जिल्हाधिकारी,पोलीस अधिकारी उपस्थित असतात.

यावेळी मुरबाड तालुक्यातील स्थानिक बांधवांसह ठाणे,पालघर,रायगड जिल्ह्यातील नागरिकही हजारोच्या संख्येने उपस्थित असतात.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्ष या ठिकाणी कार्यक्रमावर निर्बंध होते,परंतु या वर्षी सिध्दगड समरक समितीने नेहमी प्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी येत्या दोन जानेवारीला बलिदान दिनाच्या दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सिध्दगड स्मारक समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार गोटीराम यांनी यावेळी केले आहे.

                             *✍️...संजय पंडित*






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.