" गरीब लोकांना मदत करणे; हीच खरी अल्लाची इबादत ठरेल"

 "  गरीब लोकांना मदत करणे; हीच खरी अल्लाची इबादत ठरेल"
***********************

पूर्ण जगात ख्रिश्चन धर्मानंतर लोकसंख्ये नुसार दोन नंबर वर असलेला प्राचीन असा इस्लाम धर्म आहे.याच इस्लाम धर्मातील लोकांच्यासाठी रमजान चा पवित्र महिना व त्यानंतर साजरा होणारा ईद हा सण एक पवित्र व महत्वपूर्ण उत्सव आहे,ईद चा शाब्दिक अर्थ खुशी, आनंद असा आहे.


ईद हा सण साजरा होण्याच्या 30 दिवस अगोदर उपवास,रोजे मुस्लिम समाजातील लोकांकडून धरले जातात याच 30 दिवसाच्या पर्वाला रमजान चा महिना म्हणून संबोधले जाते.

इस्लामिक किंवा हिब्रू कॅलेंडर नुसार वर्षाच्या 12 महिन्यातील क्रमाने येणाऱ्या 9 महिन्याला रमजान चा पवित्र महिना म्हणले जाते.624 इसवी मध्ये इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहमद पैगंबर साहेब यांनी बद च्या युद्धात शानदार विजय मिळवला होता,या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी त्याकाळी तेथील लोकांनी मोठा उत्सव साजरा केला,या उत्सव सोहळ्यालाच ईद चे आनंद पर्व समजले जाते.तत्कालीन परिस्थिती पाहता मोहमद पैगंबर यांना असे वाटले की हा सगळा अरब समाज गरीब व श्रीमंत या दोन भागात वाटला जात आहे,प्रत्येक जण एकमेकांपासून दूर जात आहे,या सर्वांना एकजूट केले पाहिजे,त्यांना कुठेतरी ऐका सूत्रात बांधले पाहिजे म्हणूनच त्यांनी रमजान च्या या पवित्र महिन्याचे पालन करण्याचे सूत्र निश्चित केले व त्यासाठी एका महिन्याचा 30 दिवसाचा कालावधी व त्या दिवसात पालन करण्याची नियमावली तयार केली,या 30 दिवसात दिवसभराचा उपवास रोजा ठेवून अन्न, पाणी व वाईट विचारांचा त्याग करून प्रत्येकाच्या मनात त्याग व बलिदानाची भावना जागृत होईल,एकमेकांविषयी सदभावना तयार होईल अशी काळजी घेतली.समाजातील आर्थिक,वैचारिक,मानसिक विषमता दूर व्हावी या हेतूने मोहंमद पैगंबर यांनी अल्ला कडे दुवा केली त्या दुवाच्या बदल्यात सर्व प्रकारची विषमता दूर होण्यासाठी हा पवित्र रमजान चा महिना प्रदान करण्यात आला आहे.या 30 दिवसाच्या काळातील त्यागात अल्ला ची केलेली इबादत पाहून अल्ला ईद च्या रूपाने आनंद एकोप्याने सर्वां बरोबर साजरा करण्याची संधी आपल्याला देईल हा संदेश दिला.

रोजा उपवास करणे म्हणजे सगळ्याच वाईट गोष्टीपासून दूर राहणे होय.रोजा माणसाला हिंसा,द्वेष,कुभावना या गोष्टीपासून वाचवतो,रोज्या मध्ये दुसऱ्या कोणत्याही व्यक्ती बद्दल वाईट बोलणे किंवा चिंतने हे मोठे पाप समजले जाते.इस्लाम धर्मियांच्या दृष्टीने हा महिना त्यांच्यासाठी आत्मशुद्धीचा महिना आहे,एक महिना उपवास करून अल्ला ची इबादत केल्यानंतर उरलेल्या 11 महिन्यात कसे वागायचे यासाठी केलेली ती महिनाभराची  तालीमच असते.दया,परोपकार व मानवता हाच रमजान चा दुसरा अर्थ होय.रमजान महिना पूर्ण झाल्यानंतर साजऱ्या होणाऱ्या ईद ला ईद उल फितर या नावाने संबोधले जाते,ईद म्हणजे आनंद साजरा करणे व फितर म्हणजे दान करणे होय.ईद किंवा रमजान महिन्यामध्ये फितरा किंवा जकात देने मुस्लिम चे फर्ज वा कर्तव्य आहे,आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने काहींना काही मदत गरीब लोकांना केलीच पाहिजे हे बंधनकारक आहे तरच या रमजान च्या महिन्याचे पुण्य प्राप्त होईल हेच मोहमद पैगंबरानी निक्षून सांगितले.मुस्लिम अनुयायी पाच तत्वात बांधले गेलेले आहेत त्यानुसार पाहिल तत्व इमान कलमा त्यामध्ये अल्ला एकच आहे व मोहम्मद साहेब त्याचे पैगंबर आहेत,दुसरे नमाज प्रत्येक मुस्लिमानी दिवसात ठरवून दिलेल्या पाच वेळी नमाज पठण केलेच पाहिजे,तिसरे रमजान रोजा त्यात सगळ्यांनी या पवित्र महिन्यात सांगितलेल्या धार्मिक कार्याचे पालन केलेच पाहिजे,चौथे जकात  काढणे म्हणजे प्रत्येक मुस्लिमांनी आपल्या वर्षा च्या उत्पन्नाच्या दोन टक्के हिस्सा गरिबांना दान दिलाच पाहिजे व पाचवे कर्तव्य म्हणजे हज यात्रा त्यात प्रत्येक मुस्लिमांनी आयुष्यात एकदा तरी आपल्या पवित्र उत्पन्नतुन मक्का मदिना या तीर्थक्षेत्र ची यात्रा केलीच पाहिजे.

इतर धर्माचे जर आपण थोडे अवलोकन केले तर प्रत्येक धर्मात राजा रजवाडे यांचे काहीतरी स्थान दिसून येते पण मोहम्मद पैगंबर यांनी तत्कालीन सर्व राजांना डावलून इस्लाम धर्माची स्थापना केली व या धर्मात कुठलाही भेदभाव असणाऱ्या गोष्टींना थारा दिला नाही,इतर धर्मात वेगवेगळ्या देवतांना मानणाऱ्या वेगवेगळ्या अनुयायांची संख्या वेगवेगळी असल्यामुळे त्या धर्मात एकात्मता दिसून येत नाही परंतु इस्लाम साठी अल्ला हाच एक सर्वंश्रेष्ठ आहे व त्याच्याकडे जाण्यासाठी वा त्याची भक्ती करण्यासाठी कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही हा विचार इस्लाम धर्माने सांगितला, एकाच अल्ला ची इबादत करत असल्यामुळे एकात्मता,भाईचारा मुस्लिम मध्ये प्रामुख्याने जाणवतो.अल्ला चे पाहिले नाव अव्वल असल्यामुळे अल्ला व त्याची इबादत हेच अंतिम सत्य आहे असे इस्लाम धर्म सांगतो व त्यामुळेच त्याच्या प्रार्थनेलाच प्रथम प्राधान्य दिले जाते.बिस्मिल्ला रेहमाने रहीम अल्ला आहे आपल्या सर्व सामान्य लोकांनी केलेल्या पापासाठी तो खूप दयाळू आहे,त्याची करुणा  खुपअनंत आहे त्यामुळे त्याची इबादत हाच एक मार्ग आपल्याला चुकीच्या मार्गाकडे जाण्यापासून रोखू शकतो ही इस्लाम धर्माची ची पक्की खरी धारणा आहे.

मुस्लिम धर्मियांच्यासाठी पवित्र असलेला कुराण शरीफ हा धर्मग्रंथ ही याच रमजान च्या महिन्यात अवतारीत झाला होता,हिरा नावाच्या गुहेत मोहमद पैगंबर यांना अंतरवानी झाली व मार्गदर्शक कुराण ग्रंथाची निर्मिती अल्ला च्या सल्ल्यानुसार केली 

गेली,म्हणूनच अल्ला चे पाक पुस्तक हे कुराण शरीफच आहे म्हणून याचे पठन या महिन्यात मोठ्या प्रमाणात रोजदाराकडून केले जाते व त्याप्रमाणे वर्तन करणाराच खरा मुस्लिम समजला जातो.कुराण मधील आयात या भागामध्ये रोजा उपवास ठेवणे व त्याचे काय महत्व आहे हे सविस्तरपणे सांगितले आहे.

मुस्लिम बांधवानी ईद निमित्त सर्व धर्मियांना गळाभेट घेऊन दिलेल्या शुभेच्छा व घरी बोलावून केलेले गोड आदरतिथ्य म्हणजे राष्ट्रीय एकात्मता,बंधुभाव,अखंडता व विश्वबंधुत्व याचे मोठे चांगले उदाहरण आहे.प्रत्येकामध्ये विनम्रता व कोमलता या पवित्र रमजानच्या महिन्यामध्ये प्रदान होते,रमजान संदेश देतो की पुण्याला कमवा व पापाला जाळ। 

म्हणूनच मोठ्या आत्मीयतेने व श्रद्धेने हा सण साजरा केला जातो.

या वर्षी कोरोना रूपी महामारी च्या संकटातच हा रमजान चा पवित्र महिना आला आहे ,या सगळ्या जगावर आलेल्या संकटामुळे पवित्र मक्का येथील काबा गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे, पवित्र मदिना सहित सर्व मोठ्या मशीदमध्ये सामूहिक नमाज पठन करणे बंद केलेले आहे कारण आपल्या कोणाच्याही बेफिक्रीमुळे आपल्या स्वतःला,कुटुंबाला व समाजाला काही नुकसान झाले तर इस्लाम धर्माच्या तत्वानुसार हा मोठा गुन्हा ठरेल.हजरत मोहमद पैगंबर साहेब यांनी त्याच काळी एलान केले होते की खूप पाऊस,एखादी महामारी किंवा कुठलेही नैसर्गिक संकट आले तर त्यावेळेस कोणत्याही मशिदीत कोणीही येऊन नमाज पठन करण्याची गरज नाही,फर्ज नमाज ही प्रत्येकाने आप आपल्या घरातच पठन करावयाची आहे म्हणून इस्लामी परंपरा व हादीस नुसार आपल्याला त्याचे काटेकोर पालन करायचे आहे,जमात ची फर्ज नमाज व कुराण पठन तराबी ची नमाज आपल्या घरीच पठन करुन प्रत्येक घरचं आपल्याला आता पवित्र मशिद बनवायचं आहे,तसेच प्रत्येकाने नमाज च्या वेळी दुवा करून भारतासहित संपूर्ण जगावर आलेले या कोरोना रूपी महामारी संकटापासून वाचण्यासाठी अल्ला कडे मदत मागायची आहे.

मानवता आज संकटात आहे,गरिबी भूक जनतेला परेशान करीत आहे,अल्ला ची इबादत करण्याची चांगली संधी म्हणजे मानवता किंवा लोकांची सेवा करण्यात आहे किंबहुना याशिवाय आज कोणतीच मोठी सेवा असू शकत नाही,या संकटात सापडलेल्या गरीब लोकांची मदत करणे हाच फितरा किंवा जकात आहे.या प्रेम व भाईचारा असणाऱ्या या पवित्र माहे रमजानच्या पर्वात आपण सर्वांनीच कोरोना महामारीच्या या काळात शासन व प्रशासन ने केलेल्या सर्व सुचनांचे काटेकोर पालन करून घरीच सुरक्षित राहून,गरीब लोकांची मदत करणाऱ्या या रमजान च्या महिन्याला अजून पवित्र बनवू यात,हीच खरी अल्ला ची सगळ्यात मोठी इबादत ठरेल...!!


लेखक-

प्रा.महेश कुंडलिक चौरे,

आष्टी.

मो.9423471324

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.