क्रिकेट विजयी सोहळ्याचा उन्मादी उत्सव

 " क्रिकेट विजयी सोहळ्याचा उन्मादी उत्सव "



------------------------------------------------

 खरं तर कामधाम सोडून असल्या क्रिकेट विजयी सोहळ्यांत सामील होऊन स्वतःला धन्य समजणारी आजच्या पिढीची ही एक नवीन संस्कृती होत चालली आहे.खासगी मालकीच्या क्रिकेटपटूंचे कौतुक जनतेच्या पैशावर करू पाहणारे लोकप्रतिनिधी आणि ऐहिक स्वतः वैयक्तिक यशापासून दूर राहावे लागल्याने बुद्धिभ्रष्ट झालेला समाज हे आजचे वास्तव आहे.

बेंगळूरुतील क्रिकेट विजयी रॅली तील चेंगराचेंगरीत बळी पडलेल्यांच्या आप्तेष्टांविषयी सहवेदना व्यक्त करून अशा उन्मादी उत्सवांमागील वास्तवाची आज दखल घेणे आवश्यक आहे.

स्वतःच्या दैनंदिन कामकाजातून वेळ काढणारा समाज कसा बेभान होतो आणि हाती लागलेले दुसऱ्याचे यश साजरे करण्याच्या उन्मादात किती वाहत जातो याचे आणखी एक उत्तम, परंतु दुर्दैवी उदाहरण म्हणजे बेंगळूरुतील चेंगराचेंगरी. जे काही झाले त्याचा समाचार घेण्याआधी हे असे का होते याचे समाजशास्त्रीय विश्लेषण होणे गरजेचे आहे. व्यक्तीच्या जगण्याच्या प्रेरणेसाठी मिरवता येईल असे ऐहिक यश प्रत्येक क्षेत्रात असणे गरजेचे असते. देशाची अर्थव्यवस्था, त्यातील आपली होणारी सर्वांगीण प्रगती, त्यातून मिळणाऱ्या सुखसोयी हे ऐहिक यशाचे काही उदाहरणं सांगता येईल.पण काही सामाजिक वा कुठल्याही क्षेत्रात यशाची कमतरता होत असेल तर ती मान्य करण्याचा समंजसपणा व्यक्ती वा समाज यांच्या ठायी असतोच असे नाही. त्यातही परत आपल्यासारख्या समाजात अपयश मान्य करण्याची संस्कृती नाही. त्यामुळे आपले कसे सर्व काही उत्तमच सुरू आहे असे दाखवण्याकडेच सर्वांचा कल असतो. हे उत्तम चाललेले आहे ते इतरांना कळल्या खेरीज आपल्याला तरी चैन कशी पडेल म्हणून मग तलवारीने भर चौकात केक कापून साजरे होणारे वाढदिवस आणि ऋण काढून ‘दणक्या’त साजरे होणारे उत्सव वा लग्न सोहळे!  मग असल्या तात्कालिक कारणांचा सोहळा करावयाचा आणि वास्तवाचा विसर पडेल इतक्या उन्मादात तो साजरा करायचा. या समाजाचे पुढारीही अशा समाजाचेच प्रतिनिधित्व करणारे आहेत तेही या असल्या  यशोत्सवात सामील होतात आणि आयत्याच मिळालेल्या गर्दीत प्रसिद्धीचा झोत आपल्यावर पाडून घेतात. एरवी अभिमानाने मिरवावे, पुढील पिढीस सांगावे अशा कोणत्या कर्तृत्वाची नोंद या पुढाऱ्यांच्या खात्यावर असते का? ज्यांच्यात असते ते या उन्मादात सामील होत नाहीत आणि ज्यांच्यात नसते त्यांचे पान ही या अशा उन्मादांशिवाय हलू शकत नाही म्हणूनच बेंगळूरुत  ११ जणांनी हकनाक प्राण गमावले आहेत.

त्या शहरातील ‘रॉयल चॅलेंजर्स’ संघाने टिनपाट ‘आयपीएल’ स्पर्धा जिंकली हे केवळ त्याचे निमित्त ठरले. त्याऐवजी ही स्पर्धा अन्य कोणत्या संघाने जिंकली असती तर हा उत्सव तेथे साजरा झाला असता. गेल्या वर्षी अशीच अनियंत्रित गर्दी टीट्वेंटी विश्वचषकाच्या विजयानंतरच्या मिरवणुकीसाठी मुंबईत जमली होती. जीवघेणी चेंगराचेंगरी त्या वेळी झाली नाही. वास्तविक बुधवार हा आठवड्याचा कामाचा दिवस त्या दिवशी लाखो जण हातातील कामधाम सोडून या असल्या थिल्लरतम कारणासाठी जमा होत असतील तर आपल्या कार्यसंस्कृतीविषयी त्यातून काय अर्थ निघतो? गतसाली मुंबईतही कामाच्या दिवशी असेच घडले तेव्हाही ती स्पर्धा जिंकणाऱ्यांचा पाहुणचार विधानसभेने केला आणि आताही बेंगळूरुत तेच झाले. यातून सर्वच राजकीय पक्षांची बौद्धिक दिवाळखोरी तेवढी दिसते. या स्पर्धेचे मोल काय? मुळात ही स्पर्धा तरी आहे काय? क्रीडानैपुण्यास आवश्यक सर्व घटक वजा करून हाती जे काही उरेल त्यास आयपीएल म्हणतात. पूर्वी आपल्याकडे राजे, महाराजे आपल्या पदरी कोंबड्या, बकरे इत्यादी प्राणी पाळत आणि मनोरंजनार्थ त्यांच्या झुंजी लावत. ते पाहण्यास गाव लोटत असे. अलीकडे राजकीय राजेमहाराजे नसतील पण अमाप पैसे असलेले बिझनेस महाराजे, महाराण्या आहेत आणि त्यांची वृत्तीही तीच आहे. ते आता क्रीडापटू पदरी बाळगतात आणि दरवर्षी त्यांच्या झुंजी लावतात आयपीएल ही त्यातीलच एकस्पर्धा आहे. या स्पर्धा म्हणजे काही प्रत्येक चार वर्षांनी येणारे, वैयक्तिक कौशल्याचा कस पाहणारे ऑलिम्पिक नाही की दर चार वर्षांनी होणारी फुटबॉल विश्वचषक स्पर्धा नाही. या दोहोंतील विजयास काही एक अर्थ असतो आणि एक उंचीही असते. कारण हे यश आपल्या नावे नोंदवण्याची संधी दर चार वर्षांनी येते. त्यामुळे त्यातील यशाचे उत्सवी साजरीकरण तर समर्थनीयही ठरते.

या तुलनेत ‘आयपीएल’ या बाजारू जत्रेची औकात काय? नेमेचि येणाऱ्या पावसाळ्याप्रमाणे ही स्पर्धा  भरते आणि एखाद्या व्यवसयिक मालकाचा संघ ती स्पर्धा जिंकते. कधी हा तर कधी तो संघ जिंकतो. ते खेळाडू अमाप पैसे कमावतात, मालकांची जाहिरातीद्वारे चांदी होते आणिआपल्या सारखे सर्वसामान्य फक्त त्यांचा खेळ पाहूनच अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात. या टीम मालकांची आपल्या पदरी राखलेल्या क्रिकेटपटूंशी वागणूक पाहिली तरी अशा कोणाच्या पदरी राहावे लागणे किती कमीपणाचे आहे हे लक्षात येते. विकसित देशांतील फुटबॉल लीगच्या धर्तीवर हे आपले ‘आयपीएल’ प्रारूप बेतले गेले  म्हणजे याही बाबत पाश्चात्त्यांचे अनुकरण केले. मग ते करताना पाश्चात्त्यांची व्यावसायिकता, पारदर्शकता आणि काही एक किमान सभ्यता आदी गुण तरी घ्यायचे. पाश्चात्त्य देशांतील अशा स्पर्धा आयोजकांस त्या त्या देशाचे आर्थिक नियम लागू होतात आणि त्यांना आपले स्पर्धांचे आर्थिक ताळेबंदही जाहीर करावे लागतात. आपली ‘आयपीएल’ स्पर्धा खासगी  मालकांच्या दौलतीवर चालते. असे असताना त्यावर अधिकाधिक कर लावून सरकारने अधिकाधिक उत्पन्न आपल्या तिजोरीत कसे जमा होईल हे पाहायला हवे. पण आपले इथं सगळेच उलटे चालते आपल्या राज्यकर्त्यांत स्पर्धा लागते ती ‘आयपीएल’वर सवलतींचा वर्षाव तुमच्या काळात जास्त झाला की आमच्या,अशा वेळी या स्पर्धा विजेत्यांस विधानसभेत निमंत्रण देण्याचे कारणच काय? असे कोणते दिवे या क्रिकेटपटूंनी लावले की ज्यांचा सत्कार, गौरव, कौतुक जनतेच्या पैशावर जनतेच्या लोकप्रतिनिधींनी करावे?  या चेंगराचेंगरीत बळी पडलेल्यांच्या आप्तेष्टांविषयी सहवेदना व्यक्त करून, मृतांस श्रद्धांजली वाहून त्यामागील वास्तव नोंदवणे आवश्यक वाटले कारण ज्यांच्या घरातला माणूस या चेंगरा चेंगरीत गेला ते कुटुंब आज उघड्यावर पडले आहेत त्यामुळेच जे या वर्षी बेंगळूरुत झाले तेच उद्या अन्य शहरांत होऊ शकते याची दखल सरकार व समाजानेही घेणे आवश्यक आहे.                                                                                      

   लेखक -.                                  

  प्रा. महेश कुंडलिकराव चौरे,.          

 आष्टी.                                      

 मो. 9423471324




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.