चांगले कर्म करा हीच महायोगाची शिकवण -प.पू. भैय्याजी
बीड (प्रतिनिधी)
कर्मा पेक्षा कोणी मोठा नाही. मानवालाच नव्हे तर देवाला देखील कर्माचे फळ भोगावेच लागते. शापाच्या आधीन राहूनच देवाला देखील आपल्या कर्माचे फळ भोगावे लागले. श्रीकृष्ण आणि श्रीरामांच्या उदाहरणाद्वारे हे दिसून येते. त्यामुळे चांगले कर्म केले पाहिजे,महायोग हिच शिकवण देणारा मार्ग आहे,त्या मार्गावरच चालले तर जीवनाचे कल्याण आहे,असे प्रतिपादन प.पू.श्री सुरेश भैय्याजी यांनी केले आहे.
गुरुश्री प.पू. कल्कीजी प्रणित अखिल भारतीय महायोग परिवाराचे 30वे वार्षिक सेमिनार नुकतेच बीड येथे संपन्न झाले. त्यावेळी केलेल्या प्रवचनात ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की मानव हा कर्म आणि प्रारब्धाच्या पराधीन आहे. चांगले कर्म आपले प्रारब्ध बदलू शकते. मानवाने आपल्यातील गुण व अवगुणांना समजून घेतले पाहिजे. काम,क्रोध,मच्छर यांना जीवनात दूर ठेवले पाहिजे.काम,क्रोधाचे ढग निघून गेले की सत्या असत्याची जाणीव होते.मानवी जीवनात परिस्थिती ही एक संधी असते. दुःखकारक परिस्थिती ही विरक्तीची जाणीव करून देते तर सुखकारक परिस्थिती ही एक संधी असते.सुखकारक परिस्थितीत आपल्या विवेकानुसार,योग्यतेनुसार धर्म, कर्तव्य,संसार यातील दु:खी यांना मदत केली पाहिजे.एकंदर आपली सुखकारक परिस्थिती दुसऱ्यासाठी ही सुखकारक बनविण्यारी असली पाहिजे.मनुष्य जसा जसा मोठा होतो तसे त्याचे व्यक्तिमत्व बदलत जाते.प्रत्येक मानवाला आपल्या व्यक्तिमत्त्वाचा मोह असतो तो सोडायला हवा.
सिद्धगुरूच्या आश्रयानेच भगवंत प्राप्ती शक्य आहे. भगवंताच्या दर्शनात येणारा अडथळा सिद्धगुरु दूर सारतात त्यासाठी आपण नम्र भक्त बनले पाहिजे.
माणसाच्या कर्माचे मोजमाप माणसाकडे नाही मात्र ईश्वराकडे त्याचे नोंद असते. त्यामुळे चांगले कर्म करा. त्यामुळे गुरुच्या आश्रयाने चाला, जे मिळाले, जी साधना मिळाली ती प्रसाद बुद्धीने ग्रहण करा. गुरुश्री कल्कीजींनी दिलेल्या महामार्गावर अंतकरण पूर्वक चाला,आपले कर्म त्यांना अर्पण करा, हाच महायोगाचा संदेश आहे. तरच जीवनात महायोग गठीत होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमास देशभरातून महायोगी बंधू भगिनी उपस्थित होते. त्यांनतर सर्व महायोगी बंधू भगिनी तीर्थ क्षेत्र तुळजापूर कडे तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी रवाना झाले.


stay connected