पोखराच्या माध्यमातून वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या
योजनांचा लाभ घ्यावा :- कृषिभुषण बाबासाहेब पिसोरे
प्रभातफेरीत महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी
Ashti (प्रतिनिधी ):- दौलावडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाअंतर्गत पोखरा योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या योजनांचा पुरेपूर फायदा घ्यावा असे आवाहन कृषिरत्न कृषिभुषण महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त बाबासाहेब पिसोरे यांनी आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथे केले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक २ अंतर्गत ग्रामस्तरीय सूक्ष्म नियोजन व प्रभातफेरी जनजागृती कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बाबासाहेब पिसोरे बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्हा कृषी अधिकारी सुभाष साळवे, कृषी उपसंचालक बाळासाहेब नितनवरे, उपविभागीय कृषी अधिकारी उद्धव गर्जे, आष्टी तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, मंडळ कृषी अधिकारी प्रमोद खुटाळे, उपकृषी अधिकारी संदीप चाकणे, पाणी फौंडेशन समन्वयक संतोष शिंगारे व इतर उपस्थित होते. याप्रसंगी बैलगाडीमध्ये पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले शेतकरी पती-पत्नी तसेच अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी यंत्राच्या साह्याने शेती करणारा आधुनिक शेतकरी असे देखाव्यांचे सादरीकरण प्रभात फेरीमध्ये करण्यात आले. सहभागी भजनी मंडळासह उपस्थित मान्यवरांनी फुगड्या खेळण्याचा आनंद घेत, विठू माऊली नामाच्या गजरात, उत्साहात सहभाग नोंदविला. शाळेतील विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जगवा, पाणी आडवा पाणी जिरवा या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तसेच माजी सैनिक त्रिदल संघटना यांनी जय जवान जय किसान, जल है तो कल है या घोषणा देऊन जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी कृषी ताई सत्यशीला कोहोक, फर्जना भाभी व उपस्थित महिला भगिनी यांनी मान्यवरांचे स्वागत औक्षण करून केले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून व पोखरा योजनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. उद्घाटनपर भाषणात पुढे बोलताना बाबासाहेब पिसोरे यांनी सांगितले की, दौलावडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी आपला गाव सक्षम होण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन त्यांचे संवर्धन करावे. जिल्हा कृषी अधिकारी अधीक्षक साळवे यांनी वैयक्तिक लाभाच्या व सार्वजनिक लाभाच्या योजनांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिलेली आहे. पोखराच्या माध्यमातून गावाचा निश्चित विकास होईल. निसर्गाला जपा म्हणजे तो तुम्हाला जपेल. यातून हवामान बदलाचा सामना करण्यासाठी पोखरा योजना घटक, वृक्ष लागवड व लोकसहभाग कशी महत्त्वाची आलेलेच नानाजी देशमुख यांचा जीवन प्रवास देखील उलगडून सांगितला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना बीड जिल्हा कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी मृद व जलसंधारणाचे महत्त्व सांगितले. गावाची शेती समृद्ध करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत तसेच या योजनेत सर्वांनी सहभागी व्हावे. कृषी योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा तसेच ही लोक चळवळ व्हावी शेतकऱ्यांच्या लोकसहभागा शिवाय शासनाची कोणतीच योजना प्रकर्षाने पूर्णत्वास जाऊ शकत नाही असे सांगितले. पोखरा योजनेत शासनाच्या प्राप्त मार्गदर्शक सूचनानुसार सर्वतोपरी सहकार्य गावकऱ्यांना करण्याचे आश्वासन साळवे यांनी दिले. एक वृक्ष देऊन सरपंच भरत जाधव यांच्या संकल्पनेतून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. जाधव यांनी गावामध्ये सेल्फी विथ ट्री "ही संकल्पना मांडली व प्रति महिना लावलेल्या वृक्षासह सेल्फी स्टेटस ठेवण्याचे आवाहन उपस्थित जनसमुदायास केले. प्रास्ताविक करताना उपकृषी अधिकारी संदीप चाकणे यांनी पोखरा योजनेत गावाच्या निवडीनंतर करावयाची सार्वजनिक जलसंधारणाची कामे जसे की ज्यामध्ये कंपार्टमेंट बंडिंग, डीप सीसीटी, सिमेंट नाला बांध, नालेमीकरण इत्यादी विषयी माहिती दिली. रांगोळीने गाव नकाशा रेखाटन करून नव्याने घ्यायच्या जलसंधारणाच्या बाबींचे तांत्रिक विवेचन करण्यात
आले तर लागवड विषयी माहिती दिली. मंडळ कृषी अधिकारी प्रमोद खुटाळे यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे महत्व विषय विशद करून सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे असे सांगितले. पाणी फाउंडेशनचे संतोष शिंगारे यांनी शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून जलसंधारण चळवळीचे काम करण्याचे वचन दिले. महिला शेतकरी भगिनींचा सहभाग देखील लक्षणीय होता. यामध्ये प्रामुख्याने महिला मजूर शेतकरी आपल्या विळे, खुरपे, घमेले इत्यादी साहित्यासह तसेच महिला बचत गटाच्या शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. वयोवृद्ध शेतकऱ्यांचा फेटे बांधून यथोचित सन्मान करण्यात येऊन त्यांच्या हाती दिलेले घोषवाक्याचे फलक लक्ष वेधून घेत होते. प्रभात फेरीमध्ये अगदी ९ वर्षाच्या लहान मुले-मुली पासुन ते ९० वर्षाचे वृद्ध शेतकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती. महिला बचत गटामार्फत राबविलेल्या शेती शाळेचे महत्त्व कथन केले. प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे प्रदीप बांगर व त्यांचे विद्यार्थी यांनी कार्यक्रम झाल्यानंतर सावता मंदिर परिसर व स्मशानभूमी परिसर साफसफाई करून निसर्ग संवर्धनाचे महत्त्व कृतीतून दाखवून दिले. यावेळी नंदकुमार फसले, माजी सभापती अशोक इथापे, महादेव कोहोक, माजी सरपंच एकनाथ वाणी, महादेव थोरात, उपसरपंच विठ्ठल फसले, महिला बचत गट, शेतकरी, महिला शेतकरी, तरुण वर्ग यांची उपस्थिती होती. गावाच्या नावातच वड लाव दो लाव वड गाव "अशी फोड उपकृषी अधिकारी संदीप चाकणे यांनी केली व त्यास उपस्थितांनी दाद दिली. वृक्ष लागवड व संवर्धनाचा ठाम संकल्प ग्रामस्थांनी केला. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत ग्राम कृषी विकास समिती दौलावडगाव व कृषी विभाग यांच्या विद्यमानाने, तसेच पाणी फाउंडेशन, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अहिल्यानगर, माजी सैनिक त्रिदल संघटना, सरस्वती विद्यालय, आयडियल इंग्लिश स्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महिला बचत गट यांचे समन्वयाने सूक्ष्म नियोजन आराखडा करीताचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कोहक यांनी केले. उपस्थितांचे आभार सहाय्यक कृषी अधिकारी शिवाजी सुंबे यांनी मानले.
stay connected