दुर्दैव कि जीवनमृत्युतील काळाचा अंतरपाट

 दुर्दैव कि जीवनमृत्युतील काळाचा अंतरपाट




       अहमदाबाद विमान दुर्घटनेनं देशभरात हळहळ व्यक्त केली जात असून मृत्युमुखी पडलेल्या २४१ प्रवाशांसह नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. या दुर्घटनेत आप्तेष्ट गमावलेल्या नातेवाईकांचा आक्रोश पाहून "देवा! अशी वेळ कुणाच्याही वाटेला येऊ देऊ नको रे बाबा..." अशी आर्त हाक अनेकांच्या ह्रदयातून येत आहे. तर, या दुर्घटनेनंतर काही जणांकडून आपणासोबत घडलेल्या विमान प्रसंगातील अशाच आठवणी जागवल्या जात आहेत. 

       गुजरातच्या अहमदाबाद येथील विमानतळावर विमान अपघाताची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेमध्ये अपघातग्रस्त विमानातील एक प्रवासी नशिब बलवत्तर म्हणून बचावला, इतर सर्वच्या सर्व प्रवाशांचा जीव गेला. एअर इंडियाच्या बोईंग विमानातील तब्बल २४१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याने देश शोक सागरात बुडाला असून अनेकांनी यापूर्वीच्या विमान दुर्घटनांच्या आठवणी जागवल्या आहेत. या अपघातामागील अनेक कारणांचा मागोवा घेतल्या जात असला तरी नेमकं कारण येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.

     यातील एक प्रवासी प्रतीक जोशी गेल्या सहा वर्षांपासून लंडनमध्ये राहत होते. एक सॉफ्टवेअर प्रोफेशनल, त्यांनी आपल्या पत्नी आणि भारतात राहणा-या त्यांच्या तीन लहान मुलांसाठी परदेशात उज्ज्वल भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहिले होते. वर्षानुवर्षे नियोजन, कागदपत्रे आणि संयमाने ते स्वप्न अखेरीस साकार होत होते. फक्त दोन दिवसांपूर्वी, त्यांची पत्नी डॉ.कोमी व्यास एक वैद्यकीय व्यावसायिक यांनी भारतातील नोकरीचा राजीनामा दिला. बॅगा पॅक झाल्या, निरोप घेतले गेले आणि भविष्य वाट पाहत होते.

       सकाळी, सर्व पाच जण आशा, उत्साह आणि योजनांनी भरलेले लंडनला जाण्यासाठी एअर इंडिया फ्लाईट १७१ मध्ये चढले. सेल्फी काढला नि नातेवाईकांना पाठवला. नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी एकतर्फी प्रवास. पण ते स्वप्नांच्या नगरीत पोहोचलेच नाहीत. विमान कोसळले आणि कुणीही वाचले नाही. काही क्षणात, आयुष्यभराची स्वप्ने धुळीला मिळाली. आई, वडील आणि त्यांच्या ३ मुलांची विमानात बसल्याच्या आनंदाच्या भरात घेतलेली शेवटची सेल्फी... हा आनंद त्यांच्या ५ जणांच्या सुखी परिवारावर कधी दुःखाचा डोंगर घेऊन आला त्यांनाही समजले नाही.

       विमान धावपट्टीवर सरकत होतं… खिडकीबाहेरचं शहर हळूहळू लहान होत चाललं होतं आणि आत बसलेले कुणी पहिल्यांदाच विमान प्रवास करत होतं, कुणी रोजचं… पण प्रत्येकाच्या मनात एक समान भावना होती. "पोहोचल्यावर फोन करतो… वाट पाहू नकोस." कुणी आईला टेक्स्ट केला, कुणी पत्नीला शेवटचा फोटो पाठवला, कुणी ऑफिसच्या ग्रुपवर “टेक ऑफ” असा मॅसेज टाकला आणि कुणीतरी मनातल्या मनात एक प्रार्थना केली, "सगळं नीट होऊ दे रे देवा."

       पण त्याच क्षणात काळाने आपली योजना आखली होती. एक मोठा आवाज, आगीचे ज्वाळा आणि एका क्षणात सगळं संपलं. पिशव्या, पासपोर्ट, मोबाईल, घड्याळ असं सारं काही जागेवर होतं. फक्त माणसं नव्हती. उरली फक्त धूर, राख आणि त्यांच्या मागे पडलेली माणसांची वाट पाहणारी नजर… फोनवरचे शेवटचे मॅसेज अजूनही वाचले गेले नाहीत. "कॉल मी व्हेन यु लँड...", "मिस यु..." आणि "टेक केअर..." 

       यातच कुठे रडणारी आई होती, कुठे गोंधळलेली मुलं, तर  कुठे फोन कट झाल्यावर अजूनही “हॅलो...हॅलो?” म्हणणारं कुणी तरी. कुणीच ठरवत नाही की, शेवटचा टेक्स्ट कोणता असेल, शेवटची मिठी कोणती असेल आणि शेवटचा शब्द कोणता असेल… आज जे गेले, त्यांच्या हसण्याच्या प्रतिध्वनी अजूनही कुणाच्या आठवणीत जिवंत आहेत. त्यांनी मागे ठेवलेली स्वप्नं, आवाज, माणुसकी हे सगळं आपल्याला एकच गोष्ट सांगते, "आयुष्य क्षणभंगुर आहे… त्यामुळे प्रत्येक क्षण प्रेमाने जगा आणि अगदी मनापासून माफ करा." मृत्यू अटळ आहे… पण तो येईपर्यंत ‘मृत्युशिवाय’ जगणं, हेच खरं आयुष्य आहे.

     विमान दुर्घटनेत अचानक काळाच्या प्रवाहात हरवलेल्या त्या सर्व निष्पाप आत्म्यांना नम्र श्रध्दांजली!


  

   शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
     कमळवेल्ली,यवतमाळ
भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.