भारतीय इतिहासातील उत्तम महिला राज्यकर्ती अहिल्यादेवी होळकर

 "भारतीय इतिहासातील उत्तम महिला राज्यकर्ती अहिल्यादेवी होळकर" 



-------------------------------------------------- 

ज्याच्या मनगटात बळ व बुद्धित चातुर्य आहे तो आपल्या स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो. ते कर्तृत्व असलेले नेतृत्व जनतेचा सार्वभौम राजा होत असताना महिला किंवा पुरुष हा भेद ही जाणत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्या,चालुक्य, चोल, बहिमनी, वाडियार किंवा इतर कोणतेही पुरुष राज्यकर्ते असलेले घराणे व त्यांची दैदीप्तमान कारकीर्द भारत देशात होऊन गेली परंतु भारतभर ज्या महिला राज्यकर्त्या होऊन गेल्या त्यात अहिल्यादेवी होळकर यांचे नाव त्यांनी केलेल्या अफाट कार्यामुळे एक नंबर वर घेतले जाते. एक महिला राज्य कारभार करत असताना पुरुष राजा पेक्षा काकंनभर सरसच ठरली असा उल्लेख ज्यांच्या कृतिशील कार्यामुळे  भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने लिहिला गेला अशा लोकमाता अहिल्याबाई होळकर होत्या. सर्वधर्मसमभाव ,सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, गोरगरीबांविषयी कळवळा, हुंडा प्रथेचे उच्चाटन, अनिष्ट चालरीती रूढी परंपरा यांचा बिमोड, मूल दत्तक वारसाहक्क, अशा कितीतरी समाजसुधारक कामे करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहिल्यानगर ज़िल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी धनगर समाजातील माणकोजी  व सुशीलाबाईं शिंदे यांच्या पोटी झाला.

माणकोजी हे  विद्वान व दूरदर्शी होते. अहिल्या मातेचे जीवन घडवण्यात  त्यांचा फार मोठा वाटा होता.अवघ्या आठ वर्षाच्या अहिल्यादेवी असताना होळकर राजे घरण्याचे संस्थापक राजर्षी मल्हारराव होळकरांचा  एकुलता एक शूरवीर मुलगा खंडेराव यांच्याशी त्यांचा विवाह २० मे १७३३ रोजी शनिवारवाडा येथे संपन्न झाला.

विवाह झाल्या नंतर अहिल्याने आपल्या चतुर  व शांत स्वभावाने सासरच्या सर्वांची मने जिंकली. त्यांना मालेराव व मुक्ताबाई अशी दोन अपत्ये झाली. खरी दूरदृष्टी असणारे अहिल्यादेवी चे सासरे मल्हाररावांनी त्याकाळी पुरुषप्रधान संस्कृती असून सुद्धा आपल्या सुनेला दरबाराची मोडी भाषा मराठीत लिहिणे, वाचणे, गणित शिकवले राज्य कारभारातील बारीक सारीक गोष्टी सांगणे, न्यायनिवाडा करणे असें अनेक प्रशिक्षण त्यांना दिले. 

इ.स.1754 मध्ये कुंभेर येथील लढाईत अहिल्याचा शूरवीर पती खंडेराव यांना वीरमरण आले. लग्नाच्या अवघ्या 21 व्या वर्षी वैधव्य आले असताना रूढी परंपरेनुसार सती जाण्याचे नाकारून त्यांनी आपल्या पुरोगामित्वाचा परिचय सर्वाना सर्वप्रथम त्याकाळी दिला. सती न जाणे म्हणजे संपूर्ण लोकनिंदा आणि चारित्र शिंतोडे हे माहिती असूनही सती जाणे तहकूब करण्यात अहिल्याबाईनी जे मनोधैर्य दाखवले ते अद्वितीय होते. आपण स्वतः जगलो तर लाखो प्रजाजनांना सुख देता येईल असा विचार करून अहिल्याबाईने प्रजेच्या हितासाठी जगायचा निर्णय घेतला. धर्म ,रूढी ,परंपरा यापलीकडे जाऊन  जनतेप्रती आपले कर्तव्य प्रथम मानले.

मल्हारराव होळकरांनी राज्यकारभार सांभाळायची सूचना  अहिल्यादेवी यांना केली त्यानंतर  त्यांनी अत्यंत प्रभावीपणे खऱ्या अर्थाने लोक कल्याणकारी योजना काय असू शकतात आणि त्या दीर्घकाळापर्यंत कश्या टिकतील याचा अभ्यास सर्व प्रथम  केला. काही दिवसांनी  त्यांच्या मागे खंबीरपणे उभे असणारे सासरे मल्हाररावांचे निधन झाले. अशी एकामागून एक दुःख  त्यांना येत असताना त्यांनी अत्यंत धीराने आपली प्रजा सुखी, समाधानी कशी राहील याचाच विचार कायम केला. स्वत:च्या दुःखाचा विचार न करता अहिल्याबाईंनी धर्मनिरपेक्षता, बंधुता, समता व न्याय तत्त्वाप्रमाणे राज्य केले. काही दिवसांनी 

पेशवा रघुनाथराव याला होळकरांच्या राज्याचा व दौलतीचा लोभ सुटला  त्याने  होळकरांचे राज्य हस्तगत करण्यासाठी पन्नास हजारांची फौज घेऊन इंदोर वर चढाई केली हे वृत्त अहिल्याबाईला कळताच त्यांनी रघुनाथरावांना खलिता पाठविला त्यात त्या म्हणतात "आपण माझ्या राज्य हिरावून घेण्यासाठी कपट रचून आला आहात परंतु तुम्ही मला दुबळी समजलात की खुळी?मी महिला  असली तरी स्वतः तुमच्या बरोबर रणांगणात लढेल तुम्ही कितीही युद्धात पारंगत असले तरी मी माघार घेणार नाही जिंकले तर इतिहास व हारले तर कीर्ती करून जाईल 

पण आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही  म्हणून माझ्या नादी नाही लागले तर बर होईल, वेळच पडली तर हत्तीच्या पायी साखळीला बांधून तुमचे स्वागत केले नाही तर होळकरांचे नाव लावणार नाही " मुत्सद्दी असलेली अहिल्या म्हणजे त्यावेळी तळपती समशेर आणि लखलखती वीज झाली होती. त्यांनी आपले जीवन लोककल्याणकारी कार्यासाठी वेचत असताना प्रदेशाची मर्यादा न घालता संपूर्णपणे भारतभर कार्य केले आहे. अनेक विहिरी ,तलाव ,कुंड,मंदिरे, नदी घाट बांधले आहेत. भारतातील सर्व महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगाची मंदिरे अहिल्यादेवी यांनीच बांधली आहेत. त्या काळात देशातील अर्धेहून अधिक मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनीच केलेला आहे जे काम भारताच्या सर्व राज्य शासनाच्या सार्वजनिक विभागामार्फत आज केले जाते. अहिल्यादेवीनी उद्योगधंद्यांना आणि त्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य दिले.

मल्हाररावांच्या निधना नंतर इंदोर संस्थानाची राजधानी महेश्वर या ठिकाणी  आणून कारागीर ,मजूर, विणकर, कलावंत ,साहित्यिक अशा गुणी लोकांच्या विकासासाठी जमीन, पैसा, घर इतर सोयी उपलब्ध करून दिल्या. आजही महेश्वरी साड्या, पैठणी, धोतर प्रसिद्ध आहेत. प्रदेशातील पशुपक्षी यांना चरण्यासाठी त्यांना कुरणे तयार केली.

  दिव्यांग, अनाथ व असहाय्य लोकांचे पुनर्वसन केले. गोरगरीबसाठी अन्नछत्रे व सदावर्ते चालविली. गरिबांना वस्त्रांचे वाटप केले.  अरण्य प्रदेशातही आंबराई, बगीचे, वृक्षारोपण ओटे व धर्मशाळा बांधल्या. धार्मिक ठिकाणी असलेल्या नदीकाठी भक्तांच्या सोयीसाठी घाट बांधून घेतले.

सर्वधर्मसमभावाचा आदर्श राखत मंदिरे, मशिदी, दर्गे व विहार त्यांनी बांधली. तर काही व्यापार व दुकानदारांचे पुनर्वसन त्यांनी केले. त्याकाळच्या राजकीय दरोडेखोरांचा बंदोबस्त त्यांनी केला. स्वतःच्या एकुलत्या एक मुलीचा आंतरजातीय विवाह करून त्यांनी जातीभेदाला तडा दिला. अहिल्याबाई सारख्या खऱ्या समाज सुधारकांनी हिंदू धर्मातील रूढी आणि परंपरांचा आंधळेपणाने कधीही स्वीकार केला नाही त्यांनी एकच धर्म पाळला आणि तो म्हणजे मानवताधर्म, त्यामुळेच त्यांच्या या समतेच्या विचारांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही भारावून गेले होते. प्रजेवर जास्त करांचा बोजा न लादता त्यांनी राज्याचा कोष समृद्ध केला. स्वत:चा खर्च कमी करून राज्याच्या उत्पादन वाढीस प्रोत्साहन दिले. अहिल्यादेवी यांनी राज्यकर्ती म्हणून संपूर्ण मावळ प्रांतावर एकहाती 30 वर्षे राज्य केले. त्यांचा दबदबा संपूर्ण भारतभर होता. महाराष्ट्रात त्यांचे माहेर, जन्मभूमी असल्यामुळे त्यांचे विशेष प्रेम महाराष्ट्रवर राहिले, त्यांची संपूर्ण कारकीर्द मध्य प्रदेश राज्यात गेली आज खऱ्या अर्थाने मध्य प्रदेश हे राज्य विकसित झाले ते फक्त अहिल्यादेवी होळकर व त्यांनी केलेल्या कामामुळेच असं म्हणलं तरी ते वावग ठरणार नाही. आजची मध्य प्रदेश मधील जनतेला अहिल्यादेवी यांच्या बद्दल खूप आदर आहे ते त्यांना अहिल्यामाता म्हणूनच संबोधतात, त्यांना आपल्या आईचा दर्जा  ते देतात,यातच त्यांच्या कार्याची महती कळते. त्यांच्या अशा अनेक समाजाभीमूख कार्यामुळेच त्यांना खऱ्या अर्थाने लोकमाता किंवा राष्ट्रमाता म्हणले जाते.  अहिल्यामाता होळकर यांची आज जयंती मोठ्या उत्सहाने देशभरात साजरी केली जाते. त्या निमित्त त्यांना, त्यांच्या कार्याला व विचाराला विनम्र अभिवादन….!                            

 लेखक-                                      
 प्रा. महेश कुंडलिक चौरे.                 
 आष्टी.                                        
 मो. 9423471324

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.