तहसिल कार्यालय आष्टी तर्फे जनता दरबार दिन
आष्टी तालुक्यातील सर्व जनतेस वैशाली पाटील, तहसिलदार आष्टी यांनी आवाहन केले आहे की, नागरीकांच्या तक्रारींची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाय योजना म्हणून तहसिल कार्यालय, आष्टी मुख्यालयात प्रत्येक आठवड्यातील सोमवार व गुरुवार या दोन दिवशी दुपारी 12.00 ते 02.00 वाजेपर्यंत जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहे.
जनता दरबार कार्यक्रमांतर्गत प्रामुख्याने शेतरस्ते/पाणंद रस्ते, अकृषीक परवाने देणे, वीटभट्टी परवाना, गौण खनिज उत्खनन परवाना, मग्रारोहयो योजने अंतर्गत वैयक्तिक लाभाची कामे, नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसानीबाबत, 7/12 मधील दुरुस्ती, अन्नधान्य पुरवठा विषयक समस्या, संगायो इंगायो योजने अंतर्गत लाभार्थी यांच्या समस्या, जन्म/मृत्यू नोंदीबाबत व इतर जनतेच्या महत्वाच्या समस्या सोडविण्यात येणार आहेत.
प्रत्येक जनता दरबारामध्ये अर्जदार यांनी येताना त्यांची तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे व अर्जासोबत प्रबळ पुरावे सादर करावेत. जनता दरबार दिनासाठी नागरीकांकडून प्राप्त झालेल्या अर्जाची पोच पावती दिली जाणार असून प्रत्येक अर्जावर/निवेदनावर तहसिल प्रशासनाच्या वतीने परिणामकारक कार्यवाही करण्यात येणार आहे. तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल असे अर्ज जनता दरबारात स्विकारले जाणार नाहीत. जे अर्ज जनता दरबार दिनाकरिता स्वीकृत करता येऊ शकणार नाहीत असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कारवाईसाठी आठ दिवसात पाठविण्यात यावेत व त्याची प्रत अर्जदारास देण्यात येईल.
तरी आष्टी तालुक्यातील नागरीकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी, बीड यांनी दि.27/05/2025 रोजी महसूल आढावा बैठकीमध्ये दिलेल्या सूचनानुसार यापुढे तहसिल कार्यालय आष्टी मुख्यालयामध्ये आठवड्यातील प्रत्येक सोमवार व गुरुवार या दोन दिवशी दुपारी 12.00 ते 02.00 वाजेपर्यंत जनता दरबार आयोजित करण्यात येणार असून ज्या नागरीकांना त्यांचे कामामध्ये अडचणी/समस्या येत असतील त्यांनी त्यांचे वैयक्तिक अर्ज/निवेदनासह सबळ पुराव्यासह जनता दरबारात सहभागी होण्यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने सर्व जनतेस आवाहन करण्यात येते.
stay connected