कोणी रस्ता देता का रस्ता....
डांबरीकरण रस्ता मागणीसाठी नागरिकांचे अर्धनग्न आंदोलन
आष्टी प्रतिनिधी - नगर - जामखेड मार्गापासुन ५ कि.मी अंतरावर १८०० लोकसंख्या असलेल कऱ्हेवडगाव गाव. १९७२ साली गावाच्या हद्दीत साठवण तलाव झाल्याने सिंचनाची सोय होऊन जिरायती क्षेत्र बागायत झाले. हा आनंद जास्त दिवस चेहऱ्यावर टिकला नाही. जमिनी संपादित झाल्याने राहाते घरे सोडून नागरिक विस्थापित होऊन शेतात राहण्यास गेले. सरकार रस्ता उपलब्ध करेल अशी भोळी अपेक्षा होती.परंतु रस्त्या अभावी आजही लोकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. तिसऱ्या पिढीलाही या मधुन मोक्ष मिळाला नाही ... त्याच मरत यातना सहन कराव्या लागत आहे. एकीकडे आपला देश चंद्रावर, मंगळावर मोहिम काढत आहे याचा खूप आनंद होत आहे परंतु आजही या वस्त्या वर तीन चाकी रिक्षा जाऊ शकत नाही हे पण दुर्दैव आहे. शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत, गरोदर महिला, वयोवृद्ध नागरिक, यांना दवाखान्यात घेऊन जायचे असल्यास दोन -तीन कि.मी बैलगाडी किंवा झोळी करून घेऊन जावं लागत. पक्का रस्ता व्हावा यासाठी देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही यास आजी-माजी लोकप्रतिनिधी जबाबदार आहेतच ? पण आमचे मीठ आळणी तर नाही ना असे वाटू लागले आहे... केल्याने होते रे आदि केलेची पाहिजे...... म्हणत नागरिकांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी (दि.१५ ऑगस्ट) सकाळी ११.०० वाजता गावचे माजी सरपंच नवनाथ नागरगोजे, माजी उपसरपंच बाळासाहेब नागरगोजे, इंजिनिअर आप्पासाहेब नागरगोजे, नारायण नागरगोजे (मुकादम) यांनी रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बसून अर्ध नग्न आंदोलन केले. महसूल कर्मचारी छाया मेश्राम यांनी आंदोलकांचे लेखी निवेदन स्वीकारले. पोलिस शिपाई बब्रूवाण वाणी उपस्थित होते.
नगर जामखेड हा महामार्ग गावच्या शिवे पासुन हाकेच्या अंतरावरून गेला आहे परंतु नागरिकांना जाण्या-येण्यासाठी कच्चा अथवा पक्का रस्ता नसल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गांधणवाडी-आंधळेवाडी फाटा (NH 561 ) ते नागरगोजे वस्ती- सांडवावस्ती-आठेगावपुठा, या वस्त्या गाव अथवा इतर कोणत्याही मुख्य रस्त्याला अद्याप पर्यंत कच्च्या अथवा पक्क्या रस्त्याने जोडण्यात आलेल्या नाहीत येथील नागरिकांना गावाकडे अथवा इतरत्र जाण्या येण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे . आमच्या या मागणीची दखल घेत मायबाप सरकारने रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा ही अपेक्षा नागरिकांनी 'तेजवार्ता'शी बोलताना व्यक्त केली. यावेळी सरपंच परिवंत गायकवाड, राम सांगळे, अंबादास नागरगोजे, आत्माराम नागरगोजे, रायचंद पवार ,जालिंदर नागरगोजे, सुभाष नागरगोजे, प्रशांत नागरगोजे , हनुमान नागरगोजे,गहिनीनाथ नागरगोजे, सोमीनाथ नागरगोजे, भास्कर नागरगोजे, अंकुश नागरगोजे, दादासाहेब नागरगोजे,गुलचंद नागरगोजे, कुंडलिक नागरगोजे,आजिनाथ नागरगोजे, गहिनीनाथ नागरगोजे, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected