शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महेश (कडा) सहकारी कारखाना लवकरच सुरू करणार- राम खाडे
आष्टी प्रतिनिधी- आष्टी मतदार संघातील शेतकऱ्यांची कामधेनु असलेला महेश (कडा) सहकारी साखर कारखाना २०११ पासून राजकीय पूढारी तथा माजी आमदाराच्या उदासीनतेमुळे बंद आहे. कारखाना बंद असल्यामुळे आष्टी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर दुसऱ्या ठिकाणच्या कारखान्यावर दुजाभाव केला जातो. कडा कारखाना हा शेतकरी, कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद यांच्यासाठी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. कारखाना बंद असल्याने मतदार संघातील ऊस उत्पादक शेतकरी मागील अनेक वर्षापासून अडचणीत सापडलेला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महेश (कडा) सहकारी साखर कारखाना लवकरच सुरू करणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा आष्टी विधानसभा अध्यक्ष राम खाडे यांनी गुरुवार दि. ८ ऑगस्ट रोजी कडा कारखाना येथे उपोषणा दरम्यान केले. कडा कारखाना सुरू करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी कारखान्या समोरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणात एडवोकेट एन एल जाधव, कामगार युनियनचे अध्यक्ष नवनाथ साबळे, गंगाधर आबा आजबे, कॉम्रेड महादेवराव नागरगोजे, भाई विष्णुपंत घोलप, नवनाथराव आटोळे, कामगार संघटनेचे बाजीराव थोरात, रावसाहेब जाधव, माजी सरपंच राहुल काकडे, बाळासाहेब मिसाळ, पंचायत समिती सदस्य दादासाहेब झांजे, दिनकरराव खिळे, राजेश कराड, शैलेश थोरवे, अहमद पठाण, अशोक पोकळे, बाबा म्हस्के, अशोक मस्के, तात्यासाहेब जेवे, परमेश्वर नागरगोजे, दादा निंबाळकर, किसन जाधव, शेख गणीभाई तांबोळी, माऊली आस्वर यांच्यासह तालुक्यातील शेतकरी, कामगार, विविध संघटनेचे नेते आदी या उपोषणात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आपल्या भाषणात राम खाडे पुढे म्हणाले की, कधी आसमानी कधी दुष्काळी अशा अनेक संकटाचा सामना करीत असलेला शेतकरी कारखाना सुरू झाला तर त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. आष्टी मतदार संघाचे माजी आमदार यांना कारखाना चालू होऊ द्यायचा नाही. कारखान्याचा प्रश्न सतत झुलवत ठेवायचा, कामगाराला थकीत वेतन मिळू द्यायचे नाही, कारखाना चालू करण्यासाठी कोणी आंदोलन करत असेल तर त्याला आंदोलन करू द्यायचे नाही असे अनेक प्रकार माजी आमदारांकडून आष्टी तालुक्यात सुरू आहेत. यामुळे मतदार संघातील सर्व सामान्य शेतकरी, ऊस उत्पादक शेतकऱ्यावर जाणून बुजून अन्याय करण्याचे काम माजी आमदाराकडून सुरू आहेत. सदरील कारखाना सुरू झाला तर मतदार संघातील अनेक गोरगरीब कामगारांचे उध्वस्त झालेले संसार पुन्हा फुलतील. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घेऊन लवकरच महेश (कडा) सहकारी साखर कारखाना सुरू करणार असल्याचे प्रतिपादन राम खाडे यांनी यावेळी केले.
यावेळी विष्णुपंत घोलप आपल्या भाषणात म्हणाले की, कारखान्याच्या प्रश्नावर मी पक्षाचा जबाबदार म्हणून आपल्या सोबत राहील. कारण संघर्षाशिवाय काहीच मिळणार नाही. आष्टी विधानसभेतील लोकप्रतिनिधी बेजबाबदार आहेत. तज्ञांच्या सहकार्याने कारखाना सुरू करण्यासाठी ताकदीने काम करू असे सांगितले. यावेळी नवनाथ आटोळे यांनी कामगारांच्या पाठीमागे खाडे साहेब तुम्ही उभे आहात, शिवसेना (उ बा ठा) कायम कारखान्याच्या प्रश्नावर आपल्या बरोबर राहील असे प्रतिपादन नवनाथ आटोळे यांनी यावेळी केले. तर कॉम्रेड महादेव नागरगोजे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, या कारखान्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान फार मोठे आहे. कारखाना सुरू करण्यासाठी आपल्याला खूप मोठे आंदोलन करावे लागणार आहे. शेतकरी व कामगारांची चळवळ उभी करावी लागणार असल्याचे मत कॉ. नागरगोजे यांनी केले. या आंदोलनाला आष्टी तालुक्यातील कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected