सरकारी अनुदान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना सहजपणे मिळावा यासाठी कृषी विभागाने ई पीक पाहणी ही अट रद्द करावी - भिमराव धोंडे
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध पिकांचे अनुदान मिळण्यासाठी इ. के. वाय. सी. ( ई पीक पाहणी ) ही अट रद्द करुन सरसकट अनुदान द्यावे, याबाबत जिल्हाधिकारी बीड यांची भेट घेणार आहे असे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की,
माजी आमदार भीमराव धोंडे यांनी गेल्या एक महिन्यापासून आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघात जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. गाव, वाड्या, वस्त्यांना भेटी देऊन सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत. प्रत्येक गावांमध्ये शेतकरी फक्त पिक विमा आणि अनुदान मिळाले नाही अशा तक्रारी करीत आहेत.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळाशी सामना करावा लागतो त्यामुळे अनुदान व पिक विमा सहज मिळणे हे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी पिक नुकसानीच्या तक्रारी केल्या फक्त त्यांनाच पिक विमा मिळाला आहे. पिक विमा देखील पुर्वी प्रमाणे सरसकट मिळावा. तसेच वेगवेगळे अनुदान मिळण्यासाठी कृषी विभागाने ई पिक पाहणी ही अनिवार्य केल्याने मतदारसंघातील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. तसेच
अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसतात त्यामुळे ते ई पीक पाहणी करू शकत नाहीत, तसेच खेड्यापाड्यात मोबाईलला रेंज नसते तसेच सर्वर डाऊनचा प्रश्न अनेक ठिकाणी निर्माण झाल्याने शेतकरी ई पिक पाहणी करू शकले नाहीत. सरकारी अनुदान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना सहजपणे मिळावा यासाठी कृषी विभागाने ई पीक पाहणी ही अट रद्द करावी.
stay connected