भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर;एक थोर विभूती

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर;एक थोर विभूती






          दलितांचे कैवारी,दलितांचा स्वाभिमान असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खरोखरच पुजणीय आहेत.पण ते पुजनीय असले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरावर आजही ताशेरे ओढणारी मंडळी भरपूर आहे.विचार येतो की ही मंडळी आमच्या बापाला जिथे सोडत नाहीत,तिथे आम्ही तर मुख्य निशाण्यावर.

        डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरीनिर्वाण ०६ डिसेंबर १९५६ ला झालं.पुर्ण जनता शोकसागरात बुडाली.प्रत्येक जनमाणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चर्चगेटला आला.कधी पाहिली नव्हती एवढी प्रचंड गर्दी मुंबईच्या लोकांनी त्या वेळी अनुभवली.त्यानंतर त्या खालोखाल गर्दी शिवसेना प्रमुखाच्या मृत्यूवेळी अनुभवली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बाळासाहेब ठाकरे ही दोन मंडळी अशी होवून गेलीत की ज्यांनी मृत्यूवेळीही अशी गर्दी खेचली. पण आजही मृत्यूनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काही मंडळी घोर अपमान करतात.नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब हे नवविचारांचे जनक जरी असले तरी आजही त्यांना शिव्या हासडणारे भरपूर आहेत.मात्र त्यांनी केलेल्या कार्याचा लाभ सर्वजण सहखुशीनं घेतात.मग ते कोणत्याही धर्माचे जातीचे का असेना.

        डॉक्टर बाबासाहेबांनी केवळ दलितच समाजासाठी कार्य केले नाही तर त्यांनी इतरही समाजासाठी बरंच काही केलं.कलमा लिहितांना ते जरी दलित समाजाचे असले तरी त्यांनी ते न मानता प्रथम ओबीसी समाजाला प्राधान्य देवून त्यांच्यासाठी प्रथम कलम लिहिली.त्यांनीच केलेल्या कार्यामुळे आज निव्वळ दलितच नाही तर महिलावर्गांनाही फार मोठं स्थान मिळालं आहे.महिलांचा विचार केल्यास पुर्वी महिलांना स्वतंत्र्य स्थान नव्हतं.म.फुलेंनी कार्य केले होते.पण पाहिजे त्या प्रमाणात स्रिया सुखी झाल्या नव्हत्या.पण आज त्याही सुखी झालेल्या दिसत आहेत.हे घटनेने घडविलेले आहे.घटनेत स्पष्ट कलमांतर्गत प्रत्येकाला अधिकार देवून बांधुनच ठेवले आहे.

         देव देव करुन त्या देवासाठी झिजण्यापेक्षा माणसानं शिक्षण शिकावं.शिक्षणातूनच माणूस मोठा होत असतो.हे डॉक्टर बाबासाहेबांनीच आपल्याला शिकवलं नव्हे तर या देवाच्या नावाने कोंबड्या बक-याचा बळी देवून जे काही पातक होत होतं.ते होवू नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते पोषण्यावरच बंदी घातली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पाप पुण्य,नशीब मानत नव्हते.तसेच ते अंधश्रद्धा ही मानत नव्हते.त्यांनी घेतलेल्या बावीस प्रतिज्ञेमध्ये याच गोष्टीचा उल्लेख आहे.ते सुरुवातीलाच म्हणतात.मी देव धर्म मानणार नाही.राम क्रिष्ण मानणार नाही.हे का म्हटलं असेल त्यांनी.यात महत्वाचं कारण आहे विटाळ आणि हिंदू धर्माने दलित समाजाला दिलेली वागणूक.विटाळाच्या दृष्टचक्रात एवढा अत्याचार दलित समाजावर होत असतांना या समाजातील माणसेही त्याचीच मनोभावे पुजाअर्चना करीत असतांना तो देव का धावला नाही?या प्रश्नांचे उत्तर डॉक्टर बाबासाहेबांना न सापडल्याने त्यांनी या देवी देवतांना त्यागलं आणि विटाळावर सर्वोत्तम उपाय शोधून काढला व तो अंमलातही आणला.

         हिंदू धर्मात विटाळ मानण्याची प्रथा होती.दलितांना मंदीर प्रवेश नव्हता.मंदीरप्रवेश तर सोडा,साधे सकाळी दहा वाजेपुर्वी सवर्ण वस्तीत जाण्याची परवानगी नव्हती.मग असे असतांना डॉक्टर बाबासाहेबांनी धर्मच बदलविला.तुमचा धर्मही नको आणि तुमचं मंदीरही नको आम्हाला प्रवेशाला.मीच नाही तर माझी जातवाली मंडळी देखील तुमच्या मंदीरात पुजेला येणार नाही.असा विचार करीत धर्म सोडला व पवित्र असा बौद्ध धम्म स्विकारला.धम्म स्विकारतांनाही डॉक्टर बाबासाहेब यांनी इतर धर्माचा अभ्यास केला.कोणी तर आपला धर्म कसा श्रेष्ठ हे पटवून सांगत आपला धर्म डॉक्टर बाबासाहेबांना स्विकारायला लावला.पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तो धम्म न स्विकारता बौद्ध धम्म स्विकारला.कारण हा धम्म वास्तववादावर होता.अंधश्रद्धा वा चमत्कार या धम्मात नव्हते.

          आता मात्र लोकं डॉक्टर बाबासाहेबांनाच नाही तर धम्मालाही नावे ठेवतात.म्हणतात.बोधिसत्व तथागतांना ज्ञानप्राप्ती कशी झाली?हा तर चमत्कार नाही का?मी तयांना सांगू इच्छितो की ज्ञानप्राप्ती होणे ही काही एक वस्तू नव्हती.तो एक विचार होता.माणसाच्या मनात चांगले वाईट असंख्य विचार येत असतात.त्यातील दुःखावर विजय मिळविणारा एक चांगला विचार तथागत गौतम बुद्धाच्या मनात आला.म्हणून तो चमत्कार नाही.

           आजही धम्म चांगला आहे.धम्म वाईट नाही.पण काही समाजकंटक या धम्मालाही बदनाम करण्याचे षडयंत्र करतात.यात चमत्कार,पुजाविधी,अंधश्रद्धा नसली तरी काही समाजकंटक आजही धम्मातही चमत्कार,अंधश्रद्धा व पुजाविधी मानतात नव्हे तर डॉक्टर बाबासाहेबांनी घेतलेल्या बावीस प्रतिज्ञेत कोंबडे बकरे पाळणार नाही असे असून देखील कोंबड्यांचं पालन होतं.बकरेही पाळले जातात.शिवाय मांसही भक्षण केलं जातं.बौद्ध धम्मात जी पंचशीलं आहेत,त्याचे पालन होत नाही.दारु पिणे वज्र असतांना तसेच धनसंचय करणे वज्र असतांना आम्ही ते करतोच.खोटे बोलणेही वज्र असतांना आम्ही खोटे बोलतो.नव्हे तर आपलेच बांधव यशाच्या शिखरावर जात असतांना त्यांचे पाय ओढतो.सत्ताप्राप्तीसाठी वेगवेगळे गट नव्हे तर पक्ष स्थापन करतो आणि आपल्याच बांधवांच्या विरोधात लढतो.आपल्याच बांधवाला निवडणुकीत पाडतो नव्हे तर पाडण्याचा प्रयत्न करतो.हे भीमा, तू धम्मपरीवर्तन सांगीतलं होतं नव्हे तर केलं होतं.पण ते करीत असतांना तू हेच सांगीतलं होतं का?पुजाविधीला वज्र मानणारा तू आज धम्मात चक्क नारळ वाहतांना दिसतात तुला.तुझं भगवंकरण होतांना दिसत आहे.तू हार, बेल,फुल या गोष्टीला थारा दिला नाही.आज तेच घडत आहे धम्मात आणि याच गोष्टीचा फायदा ते घेत आहेत.आज मंदीरप्रवेशाला विटाळ नाही.म्हणूनच की काय,आज तुझेच बांधव मंदीरप्रवेशही करतात.कालचे ते जुने दिवसं विसरुन.हे भीमा,हेच सांगीतलं का आम्हा.नाही ना.मग आम्ही बिघडायला हवं की सुधरायला हवं.तू आम्हाला शांतीचा मार्ग दाखवलाय.खरं आहे.मग आम्ही शांती मानायला नको का?आपसी भांडणं बंद करायला नको का?होय तुझं म्हणणं बरोबर होतं.पण कोण ऐकणार आमचं.तुझेच ऐकतात सगळं.कारण तू बाप आहेस आमचा.त्यांचा आणि सर्वांचाच.तेव्हा एकतर तू मरायला नको होतास.पण आतातरी एक काम कर.हे भीमा,तू इकडे तिकडे न पाहता,आढेवेढे न घेता पुन्हा जन्म घे.जन्म घेवून ये आणि आम्हाला पुन्हा एकदा नीट समजावून सांग.आमचे काय चुकले ते.पुन्हा कधीही न विसरण्यासाठी.महापरीनिर्वाणाच्या दिवशी.त्याच दिवशी त्याच तारखेला आणि त्याच वेळेला.आम्ही तुमचं कालचं ऋण विसरलो असलो तरी पुन्हा केलेलं दुसरं ऋण कधीच विसरणार नाही. बाबासाहेबांचा कोणीही अपमान करु नये

                या महामानवानं चवदार तळ्याचं आंदोलन केलं.चवदार तळे......इतिहास साक्षीचा पुरावा.त्यापुर्वी या देशात विश्वकोटीचा विटाळ होता.भेटीबंदी,व्यवहारबंदी,बेटीबंदी रोटीबंदीने कळश गाठला होता.सारा देशच पोखरला होता.स्पर्शाचा विटाळ तर सार्वजनिक होता.

      सकाळी दहा वाजेपर्यंत तसेच रात्री अंधार पडल्यावर गावात जायला मनाई होती.सकाळी यासाठी गावात जायचे नाही कारण स्पृश्य स्रीया अंगणात शेणाचा सडा टाकतात.सडा टाकतांना त्यात पाणी असते.अंगण ओलं असते.त्यात पाय उमटतात.सावली पडते त्यामुळे विटाळ होतो तसेच दिवस मावळल्यावर दिसत नसल्याने अंगणात अस्पृश्य माणुस जाणुनबुजून एखाद्या अस्पृश्य माणसाला हात लावु शकतो हा धोका.त्यापेक्षा बंदी घातलेली बरी याचा विचार करुन दिवस मावळल्यावर बंदी.

      पाण्याला स्पर्श करणे हा विटाळ समजण्यात येई.त्यामुळे साहजिकच सर्व प्रकारच्या गोष्टीपासुन ही दलित मंडळी वंचित होती.जणु हा परिसर विटाळ परिसर व प्रत्यक्ष गाव विटाळ गाव बनलं होतं.मात्र गावातील काही लोकांना वाटायचं की हा विटाळ बंद व्हावा.पण ते काही करु शकत नसत कारण तसा प्रयत्न करणा-यांना गाव समाजात व्यवहारबंदी करीत असे.वाळीत टाकत असे.वाळीच्या वेदना भयंकर होत्या.त्यामुळे चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला नसता तर भेदभाव कधीही मिटला नसता.असे म्हणणे खरे ठरते.

      चवदार तळ्याच्या सत्याग्रहात इतर समाज साथ देवो अगर न देवो,पण महार जातीने कंबर कसली होती.याचा परिणाम चवदार तळ्याच्या आंदोलन वेळी दिसला.दि.१२/१२/१९२७ ला सनातन समाजाने चवदार तळे चौधरी कुटुंबाचे असल्याने हे तळे निर्णय होईपर्यंत चवदार तळ्याचे पाणी पिण्यास दलितांना बंदी असावी.असे जे म्हणणे मांडले.त्याला सबब न्यायालयाने स्थगिती देत म्हटले की निर्णय होईपर्यंत अस्पृश्य माणसाला चवदार तळ्याच्या भागात जाता येवु नये.तरीही असंख्य संख्येने ही महार मंडळी प्रसंगी कैद भोगु पण चवदार तळ्यावर जावु यासाठी स्वतः मंजुरी फामवर सही करण्यासाठी रांगेने प्रतिज्ञापत्र भरण्यासाठी उभी होती.चवदार तळ्याचा मुकदमा तारीख पे तारीख करत तब्बल दहा वर्ष चालला.यात बाबासाहेबांना अपार त्रास सहन करावा लागला घरदार स्वतःची पोरं बारं प्रकृती संसार याकडे लक्ष न देता बाबासाहेबांनी या मुकदम्यासाठी सर्वस्व पणाला लावले.ते येथील तमाम अस्पृश्य समाजाने कधीच विसरु नये.कधीकधी त्यांच्या जवळ पैसेही नसायचे.तरीही मुंबईला जावुन हा खटला लढला गेला.केवळ चवदार तळ्यावर जावुन पाण्याला स्पर्श करुन चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला नाही.

        खालच्या न्यायालयात खटल्याचा फैसला १९३४ ला लागल्यानंतरही सनातन्यांनी अाणखी पिटीशन हायकोर्टात टाकली.पण बाबासाहेब नरमले नाहीत.एरवी त्यांच्यासोबत लढायला प्रति वादी म्हणुन शिवतरकर मास्तर, कृष्णा सायनाक, गण्या मालु ,कानु विठ्ठल इत्यादी मंडळी होती.हा खटला १९३७ ला जींकला जींकणे भागच होते.जर हा खटला बाबा हारले असते तर आजही पाणी पिण्यास दलितांना बंदी राहिली असती.आजही विटाळ राहिला असता.

        महत्वाचे म्हणजे बाबासाहेब चवदार तळ्याचा खटला जींकले.त्यानुसार पाणी पिणे स्पर्श करणे.ह्या बाबत विटाळ पाळणे बंद झाले.महाडात पिण्याच्या पाण्यासाठी दुसरी स्वतंत्र्य व्यवस्था नसल्याने सनातन्यांना अस्पृश्यांना पाणी पिवु देणे भागच होते.नाहीतर न्यायालयाचा अवमान म्हणुन स्पश्यांना किती संकटाला सामोरे जावे लागले असते याचा अंदाज लावणे कठीण.२५ डिसेंबर १९२७ ला मनुस्मृती जाळुन दलितांवर लादण्यात येणा-या शिक्षेची अक्षरशः बाबासाहेबांनी होळीच केली होती.त्यामुळे मनुच्या नियमांना कात्रीच लावता आली.तसेच पोशाख बदलल्याने अस्पृश्य ओळखु न आल्याने विटाळ संपुष्टात आला.

        आज बाबासाहेब हयात नाही.पण त्यांनी दलिंतांसाठी व इतरही समाजासाठी आयुष्य वेचलं.म्हणुन त्यांचे जागोजागी पुतळे बांधले आहेत.हे पुतळे म्हणजे दलित व इतर समाजाची प्रेरणा तसेच त्यागाचं प्रतिक.केवळ त्यांनी अस्पृश्यांसाठीच केलं नाही तर ती मनुस्मृती जाळुन स्रीयांनाही दास्यत्वातुन सोडवले.मग ती कोणत्याही जातीची असो.एवढेच नाही तर संविधान लिहितांना देशातील सर्व नागरिकांना न्याय स्वातंत्र्य समतेचा अधिकार मिळवुन दिला.यानुसार नोक-या पदोन्नति मधुन कोणावर अन्याय झाल्यास त्याला न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार ही देशातील सर्वच जातीधर्माच्या लोकांस प्राप्त झाला.त्यामुळे खरं तर या देशातील नागरिकांनी बाबासाहेबांचे उपकार मानले पाहिजे.पण तसे घडत नाही.आजही बाबासाहेबास त्यांच्या मृत्युपरांत छळले जाते.शेणाचा पुतळ्यावर मारा केला जातो.राग कोणता तर चवदार तळ्याचा.....कदाचित या समाजकंटकांना चवदार तळ्याच्या घटनाक्रम ही माहित नसेल.

        बाबांनो हे लक्षात घ्या की चवदार तळ्याच्या आंदोलनाच्या वेळी आम्हाला तुमच्याच समाजातील काही आजोबा पणजोबांनी माणुसकीच्या नात्याने मदत केली होती.तुम्ही का माणुसकी सोडताय?बाबासाहेबांनी केवळ अस्पृश्यच लोकांसाठी केलं नाही तर तुमच्याही जातीसाठी केलं ओबीसी साठी ३४९ वी कलम जेव्हा लिहीली तेव्हा तुमच्याच समाजातील संसदेतील लोकांनी विरोध केला होता.त्यावेळी याच बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.केवळ तुमच्यासाठी.हे विसरु नका.हे माहित आहे का तुम्हाला.

         संविधान बनवितांना समिती बनवली खरी.पण ती कुचकामी ठरली.सगळं बाबासाहेबांना करावं लागलं.शिवाय संसदेत विधेयकं पुराव्यासह मांडावी लागली.सरतेशेवटी डाँ.राजेंद्रप्रसांदानी बाबासाहेबांची पाठ थोपटली.हे किती जणांना माहित आहे.हे संविधान अठरापगड जातीतील कोणत्याच माणसाला बनवता आले नाही.ही शोकांतिका या भारताची.तरीही तुम्ही या बाबासाहेबांचा अपमान करता.त्यांच्या लेकरांचा अपमान करता.

       कुणीही बाबासाहेबांचा अपमान करु नये.आपण सगळे एक आहोत.बाबासाहेब प्रेरणास्रोत आहेत सर्वांचे.मग ते कोणत्याही जातीतील का असेना.


         अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.