मराठ्यांनी ठरवलं तर पाच मिनिटांत .... मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
मराठ्यांचा आवाज कुणीही दाबू शकत नाही - मनोज जरांगे पाटील
जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले? -
मराठ्यांचा आणि माझा आवाज कुणीही दाबू शकत नाही. आम्ही अटकेपार झेंडे लावणारे मावळे आहोत. आम्ही जर मनावर घेतलं तर यांचा आवाज पाच मिनिटात बंद होईल असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थळावरुन देवेंद्र फडणवीस यांना इशाराच दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे. तसंच कायदा-सुव्यवस्था बिघडू न देता तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
सरकारने चर्चेसाठी यावं -
सरकार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण किती दिवसात देणार? कसं देणार? किती दिवसांत देणार?, तुमच्या अडचणी काय आहेत? हे एकदा सरकारने सांगावं. आमची दिशाभूल करण्यासाठी हे चाललंय का? एकदा तुम्ही चर्चेला या. आम्हाला जर वाटलं की मुदत द्यायची आहे तर देऊ. वेळकाढू पणा करत आहेत असं वाटलं तर आम्ही वेळ देणार नाही. मुदत दिली तरीही आंदोलन मागे घेणार नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा समाज कुणालाही त्रास देणार नाही चर्चेसाठी या असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
आम्ही आता कुणाच्याही धमक्यांना भिणार नाही. ४० वर्षे आमचं आरक्षण फुकट खाता का? तू ये बरं रस्त्यावर.. आम्ही शांततेने तुला उत्तर देतो. फुकट आमचं आरक्षण खाता आणि सांगायचं लोक रस्त्यावर उतरतील. उतर रस्त्यावर जे काही होईल त्याची जबाबदारी सरकारची असेल. त्यातला एका उपमुख्यमंत्र्याची तर नक्की जबाबदारी असणार आहे. किती दिवसात आरक्षण देणार याची घोषणा करा. आपल्या गावात नेत्यांना येऊ देणार नाही म्हणजे नाही. आपल्याला यांना भिडायचं आहे. लढून मरायचं आहे भेकडासारखं मरणार नाही. कुणीही आत्महत्या करायची नाही असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.


stay connected