आष्टी तालुक्यातील चोरीस गेलेल्या जनावरांचा शोध लागणार तरी कधी?
कडा/ प्रतिनिधी ..
आष्टी तालुक्यातील कडा आष्टी, अंभोरा पोलिस ठाणे हद्दीत घरफोडी, चारचाकी, दुचाकी, मोबाइल यासह अन्य भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आता चोरट्यांनी आपला मोर्चा दावणीला बांधलेल्या जनावरांकडे वळवला असल्याचे दिसून येत आहे. गोठ्यात किंवा घरासमोर बांधलेली लाखमोलाची बैलजोड, गायी चोरीला जाऊ लागल्या आहेत. यंदा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला असून, आता पशुधनही अडचणीत सापडले आहे. त्यामुळे साहेब ... चोरीस गेलेल्या जनावरांचा शोध लागणार तरी कधी ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या ठिकाणांहून जनावरे गेली चोरीला
११ एप्रिल : देवीनिमगाव येथील लक्ष्मण अनारसे यांनी गोठ्यात बांधलेल्या दोन गायी तर लक्ष्मण साळवे यांची एक गाय चोरीला गेली आहे.
१४ एप्रिल : पारगाव जोगेश्वरी येथील संदीप खंडू भोसले यांच्या मालकीच्या दोन विदेशी गायी चोरीला गेल्या आहेत. २० एप्रिल रोजी आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
२२ एप्रिल : धानोरा येथील ज्ञानदेव साहेबराव शेळके यांची बैलजोडी खुंटेफळ फाट्याजवळील खडकपट्टी शेतातून चोरीस गेली. अज्ञात चोरट्यांविरुद्ध २३ एप्रिल रोजी अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
२४ जुलै : कडा येथील विजय कर्डिले यांच्या घरासमोरील बैलजोडी चोरीला गेली असून, आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध २६ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
१९ सप्टेंबर : शिरापूर येथील विशाल गहिनीनाथ ओव्हाळ यांचा बैल व पोपट विष्णू दातीर यांची गाय गोठ्यातून चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस तक्रार घेतात. पण, जनावरे चोरीचा तपास लागत नसल्याने तपास कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. ठाणे हद्दीत जनावरे चोरी आहे.
जनावरे चोरीला गेली की, मालक शेजारील आठवडी बाजार किंवा इतर ठिकाणी जाऊन पाहणी करतो. पण, पदरी निराशा पडताच पोलिस ठाणे गाठून तक्रार करतो.
stay connected