ग्रामीण जीवनातील वेदनेचा हुंकार
विलास गभालेंचा कथासंग्रह
===============
राष्ट्रकवी रामधारीसिंह दिनकर यांचा 'हुंकार' हा काव्यसंग्रह हिंदी साहित्यातील मानबिंदू मानला जातो तसेच ग्रामीण मराठी साहित्यात अलिकडच्या काळात युवा लेखक आणि प्रत्यक्ष ग्रामीण जीवनाचा अनुभव घेतलेले विलास गभालेंचा "हुंकार" हा कथासंग्रह संग्रह म्हणजे खरोखरच ग्रामीण जीवनातील वेदनेचा 'हुंकार' मानावा लागेल.
विलास गभाले पेशाने शिक्षक असले तरी रूचीने साहित्यात रमतात वर्तमानपत्रात सातत्याने कथा लेखन सुरू असते.या आधी त्यांचे "शेवटचा श्वास" हा कथासंग्रह तर "चुरगळलेली अक्षरं" हा काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत.
या सर्व साहित्यात एक समान धागा आहे तो म्हणजे "ग्रामीण जीवन दर्शन....!" कधी दु:ख तर कष्टातून कमावलेले क्षणिक सुख याच वेध त्यांनी घेतलेला आहे.
'हुंकार' या शब्दाचा अर्थ असा की अशा प्रकारची साद की जिच्यामध्ये आर्तता आहे...दु:ख आहे खंत आहे...वेदना आहे.
महामानव बाबा आमटे नेहमी म्हणायचे वेदनेशी नातं जोडा...तसं विलास गभालेंनी या कथांमधून वेदनेशी नातं जोडलं आहे.गरीब कष्टकरी शेतकरी यांच्या जीवनावर आधारित छोट्या छोट्या कथा गुंफल्या आहे.
यात कुठेही रोचकता, अतिरंजित किंवा मनोरंजन यांचा लवलेशही नाही अत्यंत वास्तववादी आणि प्रत्ययकारी चित्रण त्यांनी आपल्या कथांतून केले आहे.
फरफट,फाटलेलं आभाळ,होरपळ...हे शीर्षक असलेल्या कथा नावातच व्यथा मांडतात.
तो एक वाडा, घरट्याबाहेर...समाजभान जपतात तर "सलाम अनाम वीरा" हि कथा ग्रामीण भागातील देशभक्ती आणि समर्पण यांचा मिलाप दर्शवितात.
'हुंकार' या कथासंग्रहात एकूण १३ कथा आहेत.
सर्व कथांमधून ग्रामीण भागातील कष्टकरी लोकांच्या डोळ्यातील जणू अश्रू गिळणारा हुंदकाआहे. कथासंग्रहाला जेष्ठ साहित्यिक योगिराज वाघमारे यांनी प्रस्तावना लिहिली आहे तर गवळी प्रकाशन ने हा कथासंग्रह प्रकाशित केला आहे.
निश्चित अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा हा कथासंग्रह वाचकांनी वाचायला हवा असाच आहे....!
-आदिनाथ जोशी
९८२२५२७६७६


stay connected