नवाज शरीफचा केक खाणाऱ्या औलादीकडून हिंदुत्व शिकायचं का ? उद्धव ठाकरे यांनी अमीत शहाला फटकारले
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफचा केक खाणाऱ्या औलादीकडून हिंदुत्व शिकायचं का? असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घातला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पण यावेळी निशाणा साधला. यापूर्वी गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातून विधानसभेचा शंखनाद केला होता. आज उद्धव ठाकरे यांनी पुण्यात पक्षाच्या मेळाव्यात महायुती आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर आसूड ओढले. त्यांच्या जहाल भाषणाने आता रान पेटवले आहे.
यावेळी त्यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. ते अफगाणिस्तानचे वंशज असल्याचा टोला त्यांनी लगावला. विधानसभेपूर्वी राज्यातील राजकारणात जहाल भाषा वापरली जात आहे. दोन्ही गोटातून एकमेकांवर जहाल टीका सुरु आहे. जस-जशी ही निवडणूक जवळ येत आहे, राजकीय नेत्यांच्या भाषेला धार येत आहे. महाराष्ट्र कायम अन्यायाच्या विरोधात आहे. लोकसभा निवडणूकीपूर्वी शाह-मोदींच्या हुकूमशाहीविरोधात कोणी बोलत नव्हते. ते काम महाराष्ट्राने केले. आपला पक्ष हा राज्याच्या असंतोषाचा जनक असल्याचे ते म्हणाले.
तुमच्याकडून हिंदुत्व शिकायचं का?
शाहिस्तेखान हुशार होता. त्याचं बोटावर निभावलं. पुन्हा महाराष्ट्रात आला नाही. हे परत आले. त्यांनी शहाणपण घेतला नाही. महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचे वळ कुठे कुठे उठले ते पाहण्यासाठी आले होते. त्यांचे म्होरके आले, त्यांनी अमित शाह यांच्यावर यावेळी आसूड ओढला. आम्हाला हिंदुत्व शिकवता. तुम्ही नवाज शरीफची केक खाणारी औलाद तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं, का असा सवाल त्यांनी केला.
आमचे हिंदुत्व त्यांच्यासारखे नाही. आमचे हिंदुत्व हे शिवाजी महाराज यांचे हिंदुत्व आहे. शंकराचार्यांनी जे हिंदुत्व सांगितले ते हिंदुत्व आहे, असे त्यांनी सांगितले. मुस्लिमांनी आम्हाला मतदान केले की आम्ही औरंगजेब फॅन क्लबवाले ठरतो. ज्यांच्या घोषणापत्रात मुस्लिमांच्या हिताचे निर्णय जाहीर करण्यात येतात, ते पण मुस्लिमधार्जिणे होतात. मग नितीश कुमार हे कोणते हिंदुत्ववादी आहेत, चंद्रबाबू नायडू हे कसे हिंदूंचे नेते ठरतात, असा सवाल ठाकरे यांनी विचारला. त्यांनी भाजप सत्ता जिहाद करणारा पक्ष असल्याचा हल्लाबोल चढवला.
देवेंद्र फडणवीसांवर टीका
“दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या सभेत बोललो की, एक तर तू राहशील किंवा मी राहिल. माझ्या पायाशी कलिंगड ठेवलेलं होतं. त्यामुळे काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण? याची संकल्पना उद्धव ठाकरे यांनी सांगितली. मी म्हणजे माझा संस्कारी महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांचा पक्ष. ढेकणाला कधी आव्हान दिलं जात नाही, ढेकणं चिरडायची असतात. कुणीतरी हे आव्हान स्वतःवर घेतलं. त्यानं सांगितलं माझ्या नादाला लागू नका. मी म्हणतो, तुझ्या नादाला लागण्याएवढ्या किंमतीचा तू नाहीच आहेस”, अशी टीका शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
आज पुण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी त्यांनी भाजपावर पुन्हा एकदा टीकास्र सोडले. “बऱ्याच वर्षांनंतर मी पुण्यात येत आहे. यापुढे लढाई मैदानात होणार, हॉलमध्ये होणार नाही”, असेही आव्हान त्यांनी यावेळी दिले.
stay connected