लोकशाहीचा चौथा स्तंभ...!!

 " लोकशाहीचा चौथा स्तंभ...!! "
**************************


6 जानेवारी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या उतुंग कार्याला मानवंदना देण्याचा दिवस,20 डिसेंबर 1810 रोजी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंगुर्ले या गावी बाळशास्त्री चा जन्म झाला,कट्टर देशभक्त असलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांनी खऱ्या अर्थाने मराठी पत्रकारितेचा पाया घातला,6 जानेवारी 1832 मध्ये मुंबईत त्यांनी पाहिले मराठी वृत्तपत्र दर्पण या नावाने सुरू केले.लोकजागृती व ज्ञानप्रसार हा प्रमुख हेतू वृत्तपत्र काढण्यामागे त्यांनी ठेवला.दर्पण या शब्दाचा अर्थ आरसा,सद्यस्थितीचे दर्शन,झोपलेल्या समाजाला जागे करणे हा उदात्त उद्देश त्यांनी वृत्तपत्र काढण्यामागे त्यांनी ठेवला.त्याकाळातील जनतेच्या समस्या,विशिष्ट प्रश्न सरकारला कळावेत,सरकारी उपाययोजना व उपक्रम हे जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य त्यांनी त्याद्वारे केले.दर्पण हे वृत्तपत्र एकाच वेळी मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत प्रसिद्ध होत होते कारण मराठी सर्वसमान्य माणसांना समजण्यासाठी व इंग्रजी भाषा ब्रिटिश सरकारला समजण्यासाठी होती.समाजपरिवर्तन व ब्रिटिश राजवट उलथवून टाकण्यासाठी बाळशास्त्रीनी प्रामुख्याने वृत्तपत्र काढले.इ.स.1840 ला दर्पण चा शेवटचा अंक प्रसिद्ध झाला,खऱ्या अर्थाने बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण या वृत्तपत्रद्वारे समाजाला परिवर्तनाचा आरसा दिला म्हणून मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून बाळशास्त्रीचा उल्लेख केला जातो व त्यामुळेच 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून ही साजरा केला जातो.

शिव,शाहू,फुले,आंबेडकरांच्या विचारांचा समृद्ध वारसा सांगणारी महाराष्ट्रची ही मराठी पत्रकारिता आहे.मागील 187 वर्षांपासून ज्ञानाच्या नव्या शाखा धुंडाळण्याचे काम पत्रकारितेतून आजतागायत अखंड, अविरत चालू आहे.समाजाचे खरे स्वरूप व गरज सरकारपुढे सादर करणे हेच पत्रकार व वृत्तपत्राचे काम आहे,पत्रकारिता ही निरपेक्ष असली पाहिजे,जांभेकर,

आगरकर,लोकमान्य टिळक,आचर्य अत्र्यांनी दर्पण,केसरी,नवाकाळ,मराठा या वृत्तपत्राद्वारे ही निरपेक्षता त्याकाळी सिद्ध केली किंबहुना मी तर असे म्हणेल की निरपेक्षतेचा वसाच आजच्या पत्रकारांना त्यांनी घालून दिला आहे.भारतीय स्वातंत्र्य लढ्यातही पत्रकार व वृत्तपत्र यांचे फार मोठे योगदान लाभले होते.

सत्यघटनेवर लेखन करणे हे पत्रकाराचे आद्यकर्तव्य आहे,जे चांगले ते समाजासमोर मांडणे ही त्याची कायमच जबाबदारी आहे.आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ लिखाण हा आहे व हे लिखाण पत्रकारांनी वेळोवेळी करून लोकशाहीचा हा चौथा स्तंभ बळकट करण्याचे काम अतिशय प्रभावीपणे केले आहे.

वृत्तपत्र हे समाजातील सर्वच घटकासाठी आवश्यक आहेत,सर्वसमान्यांचा आधारच हे पत्रकार व वृत्तपत्र आहेत.कायम वृत्तपत्र वाचण्याने ज्ञानात भर व विविध विषयांची माहिती समाजला मिळते त्यात आरोग्यविषयक,शेतीविषयक माहिती सदर, राजकीय,आर्थिक, धार्मिक व सांस्कृतिक समस्यांची माहिती व त्यावरील उपाययोजना वा त्यावर वाचा फोडण्याचे काम वृत्तपत्राद्वारे केले जाते. समाजातील वाईट प्रथा परंपरा,अंधश्रद्धा,समाजातील दुजाभाव,जातिभेदावर पत्रकारानी कायमच आपल्या लेखणीद्वारे आवाज उठवलेला आपल्यास पहायला मिळतो.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य व आपले मत मांडण्याचे प्रभावी साधन म्हणून जुन्या काळापासूनच वृत्तपत्राकडे पाहिले जाते.वृत्तपत्र हे प्रशासनावर,सरकारवर फक्त वचकच ठेवत नाही तर त्याकडे समाजविकासाचे एक साधन म्हणूनही पाहिले जाते म्हणून पत्रकारिता हा व्यवसाय नाही तर एक समाजसेवा आहे असे म्हंटल तरी ते वावगे ठरणार नाही.पत्रकारिता ही विधायक गोष्टीसाठी वापरली तर ती देश विकासात मोठी ताकत ठरते हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.

भारतीय तरुणांमध्ये भारतीयत्व चा अभिमान व संविधानाचा  सन्मान जागविण्याचे खरे काम हे वृत्तपत्राचे आहे.पत्रकारात नेहमी कल्पकता असावी,नावीन्य असायला हवे,समाजपरिवर्तनचा खरा दूत म्हणूनच पत्रकाराने काम केले पाहिजे.उत्तम पत्रकाराला विविध बाबीसंबंधी ज्ञान व कौशल्य लेखनही आवश्यक आहे,आपल्या लेखनाद्वारे समाजाला त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणे हीच खरी पत्रकारांची जबाबदारी आहे,म्हणूनच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे पवित्र कार्य करणाऱ्यालाच पत्रकार असे संबोधले पाहिजे असे माझे मत आहे.

पूर्वीची पत्रकारिता ही समाजप्रबोधनची होती आजची पत्रकारिता ही रंजनाची आहे असे दिसून येत आहे,माध्यमांची संख्या खूप वाढल्यामुळे समाजात घडणाऱ्या प्रत्येक बाबीची दखल मोठ्या प्रमाणात घेतली जाते.माध्यमात स्पर्धाही वाढली आहे,विविध वृत्तवाहिन्या व वृत्तपत्र या क्षेत्रात काम करत आहेत,दोघांचाही उद्देश एकच आहे लोकांना बातम्या देने,आपल्या आजूबाजूला काय घडते आहे यासंबंधी जनजागृती व समाजप्रबोधन करणे व पत्रकार म्हणून समाजाला एका अर्थाने न्याय देणे.

पत्रकारिता हे खरे म्हणजे आव्हानात्मक काम आहे,पत्रकारितेत सत्य मांडण्याची व समाजाला घडविण्याची ताकत असल्यामुळे पत्रकाराला आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचे ज्ञान असले पाहिजे व प्रत्येक घटनेचा इतिहासही माहिती असला पाहिजे.आजच्या आधुनिक काळात वाचन संस्कृती कमी होत चालली आहे पण प्रत्येकाचे आपल्या प्रादेशिक भाषेवर प्रेम असल्यामुळे व ती भाषा मनाला पटणारी व भिडणारी असल्यामुळे मराठी वृत्तपत्र वाचणाऱ्यांची संख्या आज ही दिवसेंदिवस वाढत आहे ही समाधानाची बाब दिसून येते.

त्यामुळेच आज अनेक तरुण तरुणी विध्यार्थी पत्रकारिता शिकण्यासाठी वेगवेगळे पत्रकारिता कोर्ससाठी प्रवेश घेत आहेत,त्यात आजच्या महिला त्यांच्यात उपजतच असलेल्या सर्जनशीलता या गुणांचा फार प्रभावी वापर महिला पत्रकार म्हणून विविध वृत्तवाहिन्यात करताना दिसून येत आहेत.आपल्या लेखनामुळे व बातम्यामुळे समाजमनात वा समाजात कुठल्याही प्रकारचा 

तेढ निर्माण होऊ नये याची ही काळजी पत्रकारांनी घेतलेली आज निदर्शनास येत आहे व ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी आहे.

परंतु हे सर्व असताना आज खेदाने काही गोष्टी आज नमूद कराव्या लागतात की, समाजपरिवर्तनचे प्रभावी माध्यम असलेले हे वृत्तपत्र आजही अगदी अल्पदरात उपलब्द होत आहे त्यामुळे पत्रकारना व वृत्तपत्र संपादकांना आर्थिक परिस्थिती अभावी वृत्तपत्र नियमित चालविणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे त्यामुळे त्यांना आश्रयासाठी कुठल्यातरी पक्षाच्या किंवा नेत्यांशी जोडले जाणे भाग पडत आहे त्यांच्याकडून वा इतर घटकांकडून मिळणाऱ्या जाहिरातीसाठी किंवा सरकारी जाहिरातीसाठी व त्यातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पनासाठी पत्रकारांना राजकारण्याशी जवळचे संबंध प्रस्थापित करावे लागत आहेत,दैनिकांच्या मॅनेजमेंट साठी त्यांना राजकारण्याबरोबर जावे लागत आहे म्हणून त्यांच्याकडून निरपेक्ष लिखाण होताना दिसून येत नाही व त्यामुळेच सरकारकडून होणारी माध्यमांची मुस्काटदाबी हा ही चिंतनाचा विषय होतो आहे व ही निश्चितच भारतीय लोकशाही साठी भूषणाव गोष्ट नाही.

पत्रकारितेला भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ जरी म्हटले जात असले तरी पत्रकार व वृत्तपत्रणा सवलती देताना याचा मात्र विचार केला जात नाही, आयुष्यभर समाजप्रबोधन करून समाजाच्या समस्या सोडविण्याचे काम जरी पत्रकार करत असले तरी त्यांच्या वयक्तिक आर्थिक समस्या व इतर समस्या सोडविण्याचा कुठलाही प्रयत्न कुठल्याही व्यवस्थेकडून आजपर्यंत आग्रहाने केला 

जाताना कुठे दिसून येत नाही.

मध्यंतरी पत्रकार सरंक्षण कायदा मंजूर झाला आहे परंतु त्याची अंमलबजावणी ही काटेकोरपणे प्रशासनाकडून केली गेली पाहिजे तरच त्या कायद्याला काही अर्थ आहे.जेष्ठ पत्रकारांचे पत्रकारितेतील योगदान बगून त्यांना सरकारने मानधन सुरू केले पाहिजे,वयोमानपरत्वे निवृत्त झालेल्या पत्रकारांना पेन्शन योजना सुरू केली पाहिजे,मागे शासनाने जाहीर केलेल्या बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेअंतर्गत दरमहा दहा हजार रुपये मानधन जेष्ठ पत्रकारांना मिळणार ते लवकरात लवकर मिळावे हीच आजच्या सरकारकडून प्रामाणिक अपेक्षा.

आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात माध्यम आपल्यासाठी का आपण माध्यमा साठी हे ही खऱ्या अर्थाने तपासण्याची वेळ समाजातील एक सुजाण नागरिक म्हणून आपल्या सर्वांचीच आहे.

भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या गेलेल्या या वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या,ऑनलाइन पेपर या सर्वच प्रकारातील पत्रकारांनी घेतलेला समाजविकास व समाज प्रबोधनाचा वसा व त्यासाठी त्याप्रती त्यांच असलेलं भान कायमच जाग असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यानं जात राहिलं पाहिजे कायमच पुढं....नेमाण !!

**************************


प्रा.महेश चौरे,

आष्टी.

मो.न. 9423471324





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.