जागरण गोंधळ आंदोलनासाठी मनसेचे आष्टीतील कार्यकर्ते नागपूरला रवाना शेतकरी शिधापत्रिकाधारकांचे धान्य पुन्हा सुरू करण्याची मागणी

 जागरण गोंधळ आंदोलनासाठी मनसेचे 
आष्टीतील कार्यकर्ते नागपूरला रवाना

शेतकरी शिधापत्रिकाधारकांचे धान्य पुन्हा सुरू करण्याची मागणी



संदिप जाधव/आष्टी 

शेतकऱ्यांच्या रेशन धान्य प्रश्नी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आष्टीतील मनसे कार्यकर्ते नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान जागरण आंदोलन करण्यासाठी आष्टीतून आज, दि. 25 रोजी दुपारी रवाना झाले आहेत. मनसे शेतकरी सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांच्या नेतृत्वाखाली नागपूर विधानभवनासमोर दि. 27 रोजी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

आंदोलनासाठी कैलास दरेकर यांच्यासह मनसे शतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब दिंडे, शिरूर तालुकाध्यक्ष सोपान मोरे, सुनील पाचपुते, जयदीप मिसाळ, लहू भवर, सतीश शिंदे, भरत चव्हाण, अशोक शिंदे आदी रवाना झाले. 

रेशन दुकानावर पूर्वी शेतकरी शिधापत्रिकेवर मिळणार धान्य पाच महिन्यांपासून बंद करण्यात आले आहे. शेतकरी शिधापत्रिकेवर पूर्वी आठ-दहा रुपये किलोने लाभार्थींना धान्य मिळत होते. सन 2015मध्ये फडणवीस सरकारने अन्नसुरक्षा याेजनेअंतर्गत शेतकरी शिधापत्रिकाधारकांना दोन-तीन रुपये किलोने गहू व तांदूळ देण्यास सुरुवात केली. त्यामुळे या शिधापत्रिकाधारकांना दिलासा मिळाला होता. परंतु गेल्या पाच महिन्यांपासून या शिधापत्रिकेवरील धान्य पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. 

बीड जिल्ह्यात शेतकरी शिधापत्रिकेचे 1 लाख 38 हजार लाभार्थी असून, तर मराठवाड्यात ही संख्या सुमारे दहा लाख आहे. राज्यभरातील या लाभार्थींचा आकडा मोठा आहे. 

एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या लाभार्थींचे धान्य अचानक बंद केल्याने अनेकांना फटका बसला आहे. सध्याच्या महागाईच्या व निसर्गाच्या लहरीपणाच्या काळात शेतकर्यांना प्रपंच चालविणे कठीण झाले आहे. अशा काळात सरकारने आधार देणे गरजेचे आहे. परंतु शेतकरी शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद करून सरकारने त्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. याचा निषेध करून सरकारने पुन्हा शेतकरी शिधापत्रिकाधारकांचे धान्य पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी करीत मनसेच्या वतीने या प्रश्नी राज्य सरकारला जाग आणण्यासाठी मंगळवार, दि. 27 रोजी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येणार आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.