सरकार व शिक्षण क्षेत्रातील उदासिनता विद्यार्थ्यांच्या जीवावर विद्यापीठ परीक्षांमध्ये एकसूत्रता नसल्याने पुढील सत्र अंधकारमय

 सरकार व शिक्षण क्षेत्रातील उदासिनता विद्यार्थ्यांच्या जीवावर



विद्यापीठ परीक्षांमध्ये एकसूत्रता नसल्याने पुढील सत्र अंधकारमय





शिक्षणमंत्री आणि राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंमध्ये झालेल्या बैठकीत ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. कुलगुरूंच्या बैठकीमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य विद्यापीठ कुलगुरु ठाम आहेत. परीक्षा घेताना विध्यार्थ्यांना प्रश्न संच विद्यापीठ देणार व दोन पेपरमध्ये 2 दिवसाचे अंतर असणार आहे. परीक्षा मे मध्ये न घेता 1 जून ते 15 जुलैपर्यंत होतील असे मा. कुलगुरूंनी निश्चित केले होते.


त्यानुसार किमान महिन्याभरापूर्वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप विद्यापीठांकडून विद्यार्थ्यांना प्रश्न संच देण्यात आलेले नाहीत. परीक्षा पद्धतीमध्ये असमानता दिसून येत आहे. विद्यापीठाच्या परीक्षा साधारणत: मार्चमध्ये सुरू होवून जूनच्या पहिल्या आठवड्यात संपतात. त्यानुसार विद्यार्थी आणि पालक आपल्या कार्यक्रमांचे नियोजन करीत असतात. 


परीक्षा पद्धत एकसमान ठेवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आहे. सद्यस्थितीत पाहता नागपूर, गोंडवाना युनिव्हर्सिटी ऑफलाईन पध्दतीने परीक्षा घेणार असे परिपत्रक काढले आहे. पण राज्यातील इतर विद्यापीठाने परिक्षेबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. अभ्यासक्रम अपूर्ण आहे. काही विद्यापीठांमध्ये ठराविक शिक्षण ऑनलाईन शिकवल्या गेलं. नवीन शैक्षणिक वर्ष जर वेळेत चालू करायचं असेल तर नागपूर युनिव्हर्सिटीची परीक्षा पध्दत राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये राबवून लवकरात लवकर परीक्षा घेण्यात याव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.


सरकार परीक्षा पद्धत एकसमान ठेवण्यामध्ये उदासीन? राज्यातील विद्यापीठ परीक्षांमध्ये एकसूत्रता यावी यासाठी एकसमान परीक्षापद्धती राबविण्याच्या दृष्टीने विचार करावा, असा आदेश उच्च न्यायालयाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाला दिलेला होता. त्याप्रमाणे याचिकाकर्त्यांची बाजू ऐकण्यासाठी शिक्षण संचालक यांच्या दालनामध्ये बैठक पार पडली. त्यामध्ये याचिकाकर्त्यांनी त्यांची परीक्षा पद्धत एकसमान आणि निकाल वेळेवर लावणे का गरजेचे आहे? याबाबत लेखी निवेदन दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर झालेल्या सुनावणीचा संक्षिप्त अहवाल शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे. पण शासन स्थरावर यावर अद्यापही कोणताही निर्णय झालेला नसल्याने विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत.


विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढत आपले सावट पसरवत आहे. सध्या कोरोनाचे संकट समोर दिसत आहे. झपाट्याने कोरोना वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. यासाठी विद्यार्थी परीक्षा लवकर घ्या अशी विनंती करत आहेत. पण याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाहीत. शिक्षण क्षेत्रातील उदासीनता कुठेतरी विद्यार्थ्यांच्या जीवावर उठत आहे. दोन दिवसांपूर्वीच दोन विद्यार्थ्यांनी परीक्षेतील तणावामुळे आत्महत्या केली. विद्यार्थी टोकाची पावले उचलत आहेत. पण सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.


अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच भविष्य अंधकारमय...अंतिम वर्ष अंतिम सत्राच्या परीक्षा लवकर झाल्यास विद्यार्थ्यांना देश-विदेशातील पुढील उच्च शैक्षिणक संधी खुल्या होतील. अन्यथा त्यांना उच्च शिक्षणापासून मुकावे लागेल. अनेक विद्यार्थ्यांचे कॅम्पस सिलेक्शन झालेले आहे. संबंधित विद्यार्थी जर वेळेत रुजू झाले नाहीत, तर त्यांची झालेली नियुक्ती रद्द होण्याची भीती विद्यार्थी व्यक्त करत आहेत. त्यामुळे परीक्षा लवकर घेऊन निकाल लवकरात लवकर लावण्यात यावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.




       शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे

         कमळवेल्ली,यवतमाळ

      भ्रमणध्वनी-७०५७१८५४७

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.