शाळांची घंटा वाजणार...
पालकांनो तयारीला लागा,
राज्यातील शाळा १३ तारखेला सुरू होणार...!
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.६ मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाच्या भीतीदरम्यान शाळा नेमक्या कधी सुरु होणार असा प्रश्न सर्व पालकांना पडला होता. अशामध्ये राज्यातील शाळा या १३ जूनपासूनच सुरु होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना काल सोमवारी वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.
राज्यात १३ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे. पण कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे त्याबद्दल शंका व्यक्त केली जात होती. पण शाळा बंद करणे चुकीचे असून योग्य ती काळजी घेऊन नियोजनानुसार राज्यातील शाळा सुरु केल्या जातील, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. तसंच, सध्या कोरोनाची वाढती रुग्णसंख्या निश्चितच चिंतेचा विषय आहे. त्यामुळे आम्हाला निश्चितच काही तरी निर्णय घ्यावे लागतील. सध्या शाळा सुरु करणे गरजेचे आहे, असे देखील त्यांनी सांगितले.
शाळेतील विद्यार्थी, शिक्षण आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी मास्कसक्ती केली जाणार का? याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. येत्या काही दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल, असे देखील वर्षा गायकवाड यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सर्वांना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शाळा सुरक्षितपणे करण्याच्या अनुशंगाने सर्व खबरदारी घेत काळजी बाळगली जाईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
तसंच, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी लवकरच नवीन नियमावली जाहीर केली जाईल. सर्व शाळांना ही नियमावली बंधनकारक असणार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू नये यासाठी ही नियमावली जारी केली जाणार असल्याचे देखील त्या म्हणाल्या. सध्या मुलांची कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. सध्या कोणतेही निर्बंध अथवा सक्ती नाही. त्यामुळे शाळांच्या बाबतीत टास्क फोर्सशी चर्चा करुनच निर्णय जाहीर केला जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
stay connected