एसटी कामगारांचा संप बेकायदेशीर...?
कामगार न्यायालयाचा निर्णय...!
प्रतीनिधी : संजय पंडित
दि.१७ मुंबई : मागील अडीच महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा मुंबईतील कामगार न्यायालयाने दिला आहे.कामगार न्यायालयाने आज हा निर्णय जाहीर केला आहे. एसटी महामंडळाकडून दाखल केलेल्या तक्रार अर्जावर न्यायालयाने हा निकाल दिला आहे. एसटी ही लोकोपयोगी सेवा असताना देखील सहा आठवडे अगोदर संपाची नोटीस न दिल्याने कोर्टाचा निर्वाळा दिला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हा संप बेकायदेशीर आहे. याकरता राज्यभरातील कामगार न्यायालयात जवळपास दीड महिन्यांपासून वेगवेगळ्या ठिकाणी तक्रार अर्ज दाखल केले आहेत. औद्योगिक विवाद कायद्यानुसार लोकोपयोगी सेवा असल्यास सहा आठवडे अगोदर संपाची नोटीस देणं बंधनकारक आहे. परंतु एसटी महामंडळातील सध्या सुरू असलेल्या संपात कोणतीही कायदेशीर नोटीस देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी आज मुंबईतील वांद्रे येथील कामगार न्यायालयात एमआरटीयु अँड पीयुएलपी १९७१ कायद्यातील २५ कलमानव्ये संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन हा संप बेकायदेशीर संप असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. या संदर्भातील अंतिम आदेश पारित करण्यात आला आहे. त्याचा परिणाम कामगारांवर होणाऱ्या कारवाया आणि संपावर होणार आहे.
मागील अडीच महिन्यापासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरू असून अनेक कर्मचारी संपावर ठाम आहे.अनेक आगारात अजूनही एसटी कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळे प्रवासी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतोय. एसटी विलिनीकरणाबाबतची भूमिका सरकारने स्पष्ट सांगितले आहे की विलिनीकरण शक्य नाही. आता त्यामध्ये सुधारणा अशी आहे न्यायालयातून त्याबाबत समिती नेमून त्या समितीची भूमिका आम्ही मान्य करु असे सरकारने सांगितलं आहे. त्यामुळे विलिनीकरणाबाबतचा प्रश्न आता न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही असे जेष्ठ नेते खासदार शरद पवारांनीही स्पष्ट केलं.
stay connected