महादेवाला अभिषेक घालून शिखर शिंगणापूर यात्रेची सांगता, हजारो भाविकांनी अनुभवला कावडी वर चढवितानाचा थरार
‘म्हाद्या धाव रं… म्हाद्या पाव रं…’ असा धावा करीत, ‘हर हर महादेव’च्या जयघोषात आज हजारो भाविकांनी शिखर शिंगणापूरचा अवघड मुंगी घाट कावडींसह सर केला. यानंतर मानाच्या कावडींमधील पाण्याने शिवलिंगाला अभिषेक घातल्यानंतर यात्रेची सांगता झाली. दरम्यान, मुंगी घाट सर करतानाचा थरार आणि नेत्रदीपक सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते.
शिखर शिंगणापूरचा डोंगर हा सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये आहे. अत्यंत उंच असलेला मुंगी घाट या डोंगरात आहे. खळद, एकतपूर, शिवरी, बेलसर, सासवड, मावळ या पंचक्रोशीतून मोठय़ा प्रमाणात कावडी शिखर शिंगणापूरला येतात. घाटाच्या पायथ्याशी असलेल्या कोथळे गावात आज दुपारी कावडी पोहोचल्या. यावेळी भाविकांकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. ठिकठिकाणी कावडींचे औक्षण करण्यात येत होते.
तांब्याचे दोन हंडे, त्यावर उंच झेंडा, त्याला विविध रंगांचे कपडे लावून कावडी सजविण्यात आल्या होत्या. कावड समांतर राहण्यासाठी त्याला सर्व बाजूंनी दोऱयाही लावण्यात आल्या होत्या. हळूहळू कावडी पुढे सरकत होत्या. लहान-लहान कावडींनी घाटात चढाई सुरू केली होती. पहिला टप्पा पार केल्यानंतर भाविकांनी मोठा जल्लोष केला. भरउन्हातही दुसरा टप्पा पार झाला. हे दोन टप्पे थोडे कमी उंचीचे असल्याने लवकर सर झाले. भाविक कावडी घेऊन कडय़ाकपारींत पाय अडकवीत महादेवाचा धावा करीत घाटातून वर येत होते. सगळे कष्ट विसरून भाविक देवाच्या भेटीसाठी आसुसलेले होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संत तेली भुतोजीबुवा यांची कावड मुख्य मार्गावर दाखल झाली. त्या कावडीने मुंगी घाटाचा प्रवास सुरू केला. यावेळी ‘हर हर महादेव’चा गजर सुरू होता. हा थरार पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती .
stay connected