आदर्श राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब

 आदर्श राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब

*****************************


             आई आणि वडील ही जीवनातील दोन सामर्थ्य आहेत  भारतीय संस्कृती मध्ये राष्ट्र , आचार्य , अथिती , माता व पिता यांना परम आदराचे स्थान आहे . ' राष्ट्र देवो भवं i आचार्य देवो भवं ' या मंत्राप्रमाणे ' मातृ देवो भवं i पितृ देवो भवं ' हि संस्कार सूत्रे शिरोधार्य मानली जातात . कधी राष्ट्राला मातृभूमी तर कधी पितृभूमी म्हंटले जाते . 

           कोणाच्या जीवनावर आईचा तर कोणाच्या जीवनावर वडिलांचा प्रभाव तुलनेने कमी अधिक प्रमाणावर अढळतो . शिवछत्रपतीनां त्यांच्या आईने काय दिले हे आख्खा महाराष्ट्र जाणतो . जिजाऊ या जगात नसत्या तर या मराठ्यांच्या इतिहासाला अंकुर फुटला नसता असे म्हंटले तर ते वावगे ठरणार नाही . अशा या राजमातेचा आदर्श सगळ्या भारतीय संस्कृतीतील स्त्रियांनी घेण्यासारखा आहे . या आदर्श राजमातेचा जन्म सर्व प्रकारच्या सुजलाम सुफलाम भूमीत म्हणजेच विदर्भातील बुलढाणा जिल्हयातील महेकर तालुक्यातील सिंधखेड गावातील लखुजी जाधव व आई म्हाळसाबाई यांच्या पोटी १ २  जानेवारी १ ५ ९ ८  रोजी झाला . जिजाऊनां मोठे चार भाऊ होते. रघुजी , अचलोजि ,बहादूरजी , आणि दत्तोजी यांच्या पाठीवर जिजाऊचा जन्म झाला कदाचित स्वराज्य संकल्पनेचा प्रकाश घेऊनच ही वीज लखुजीरावच्या पोटी लखलखली असावी . साऱ्या महाराष्ट्राला अंधारातून मुक्त करून आशेचा तेजोमय किरण देण्यासाठी या राजमातेचा जन्म झाला असावा .बालपणीच आईतील करारीपण, वडिलांमधील तल्लखता , शौर्य , कुलाभिमान , महत्वकांक्षा , या गुणांना वाव मिळणारे शिक्षण त्या घेत होत्या . घोडेस्वारी , दांडपट्टा , तलवारबाजी , अशा प्रकारचे शिक्षण लहानपणातच त्यांना मिळाले. त्या काळी आजच्या सारखी शिक्षणाची व्यवस्था नव्हती कलम बहाद्दरापेक्षा तानाजी सारखे तलवार बहाद्दर महत्वाचे होते . त्यामुळे अशा प्रकारचे शिक्षण त्यांना मिळाले . राजकुटुंबातील महिलांना राज्यकारभाराचे ही शिक्षण अतिशय महत्वाचे होते त्यामुळे कुटुंबातील सदस्याकडून त्यांना तेही शिक्षण मिळत गेले . रयतेवरील संकटे , शत्रुचा पाठलाग , शत्रूकडून कैद , त्यातून सुटण्याची युक्ती असे अनेक अनुभव त्यांना लहानपणापासुनच मिळाले आणि ते  अनुभव त्या आत्मसात करत गेल्या . 

         त्याकाळी बहुजन महिला संकटसमयी मुळूमुळू रडत बसत नव्हत्या त्या संकटाच्या छातीवर बसत होत्या अनेकदा संकटे ओढून घेण्याचे धाडस ही  त्या करत होत्या कुटुंबातील सर्वाना मोहिमेवर जाण्यासठी त्या प्रेरीत करत असत त्यांच्यात एकप्रकारची उर्मी निर्माण करत असत. या बरोबरच जिजाऊना राज्यरक्षण , राज्यकारभार , राज्यवर्धन यासंबंधीचे शिक्षण बालपणापासूनच मिळत होते. 

कोवळ्या वयात बाल जिजाऊ i तलवार चालवण्या शिकली हो i

रयतेवरचा अन्याय पाहुनी i वाघीण पेटून उठली हो i

अशा प्रकारे जिजाऊंचे वर्णन केले जाते." जिजाऊ " या शब्दाचा अर्थच मुळी ' महान ' आहे. एक दिवशी जिजाउंनी लखोजी राजांना माझ्या नावाचा अर्थ काय आहे ? असे विचारले . तेव्हा लखोजीराजे उत्तरले जिजाऊचा अर्थ जय- विजय  ते जिजाऊना म्हणतात तुमच्याकडून एक यशोगाथा , विजयगाथा रचली जाईल त्यामध्ये तुमच्या कर्तुत्वाचे , पराक्रमाचे , यशाचे , आदर्शाचे , माणुसकीचे , नीतीमत्तेचे , बुद्धिमत्तेचे अध्याय असतील याची प्रचीती घराघरात येईल आणि यातून पुढची पिढी आदर्श घेईल. 

         लखोजीरावानी जिजाऊ बद्दल पाहिलेले स्वप्न , उच्चारलेले शब्द , व्यक्त केलेली भावना आणि प्रकट केलेली आकांक्षा ही शिदोरी घेऊन त्याच्या पूर्तीसाठी जिजाऊ अखंडपणे परीश्रम करत होत्या . अशा महान पराक्रमी मुलीचा विवाह तितक्याच पराक्रमी , खानदानी , सुसंस्कृत , मर्यादशील मुलाशी म्हणजेच शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला . 

जीजाउंचा अंगार फुलला ! शहाजीसवे विवाह घडला 

सून लाभली भोसले कुळाला ! राष्ट्र घडवायाला!

           जिजाऊ म्हणजे लाखमोलाचा हिरा होती आणि त्यासाठी शहाजीराजांसारख कोंदण योग्यच होतं .त्यांचा विवाह इ . स १६१० साली झाला . जाधव घराण्याची मुलगी आता भोसले घराण्याची सून झाली . सिंदखेड पासून दौलताबाद ते पुण्यापर्यंतचा प्रवास जिजाऊना खूप काही सांगत होता . रयतेची दु:ख  संकट , अन्याय , अत्याचार , कोंडमारा त्याना दिसत होता आणि हे सर्व थांबवावे म्हणून त्यांनी पाउलं उचलण्यास सुरवात केली . शहाजीराजे जिजाउना राजकारणातील गुंतागुंत समजाऊन सांगत असत आणि त्याही त्यामध्ये समरस होत असत . जिजाऊनी  स्वराज्यामध्ये शहाजीराजांना मोठं पाठबळ दिलं  रयतेला एकत्र आणून त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करण्याचं कार्य त्यांनी केलं .सर्वाना एकत्र आणण्याचे संघटन कौशल्य मुळातच जिजाऊमध्ये होते आणि त्या संघटन कौशल्याच्या आधारे अडचणीत असलेल्या रयतेला एकत्र आणण्याचे महान कार्य त्यांनी केले . अशातच त्यांच्या पोटी एक नवा जीव अंकुरला आणि या जीवाची आणखी एक जबाबदारी त्यांच्यावर पडली . त्याकाळी गर्भसंस्कार घेण्याची सोय नव्हती  पण स्वतः माता म्हणून त्यांनी स्वतःचे  विचार, भावना , आणि वर्तनातून त्यांनी गर्भसंस्कार केले . त्या गरोदरपनात तुळजाभवानी देवीशी त्या हितगुज करायच्या , मागण्या मागायच्या  असा पुत्र पोटी दे ज्याचा या मातीला अभिमान वाटेल , कुळाला अभिमान वाटेल , लोकांना अभिमान वाटेल , देशाला धर्माला अभिमान वाटेल . 

         पुत्र असा दे जो अन्यायाविरुद्ध खडा होईल,गुलामीच्या शरण शृंखला तोडेल, जो न्याय नीतीच राज्य स्थापन करेल आणि  स्वधर्माचा ध्वज त्रिलोकी उंचावेल माझा पुत्र असाच जन्माला यावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती.असाच गर्भसंस्कार झाला तर पुत्र सुद्धा तसाच आदर्शवत होतो यात तिळमात्र शंका नाही आणि अशा आदर्शवत राजमातेच्या पोटी तितकाच आदर्शवत पुत्र जन्माला आला .               

"वाघिणीच्या पोटी पराक्रमी छावा जन्मला गुलामीच्या शृंखला तोडूनी मुक्त केले मानवाला"

           १ ९ फेब्रुवारी १ ६ ३ ० रोजी फाल्गुन वध्य तृतीयेस सायंकाळी एका कर्तुत्ववान आपत्यास जिजाऊनी जन्म दिला हा पुत्र म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज होय.        

          शिवबांना असामान्य व्यक्तिमत्वाचे बनविण्याचे जिजाऊनी ठरविले . जिजाऊंची खात्री होती की शहाजी राजांचे शौर्य ,ध्येर्य ,पराक्रम , यांचा वसा शिवबा घेतीलच परंतु बाळ राजांना आम्ही वेगळ्या कुशीत घडवू  ती कूस आमच्या विचारांची , संस्काराची , शिकवणुकीची असेल बाळराजाच्या प्रत्येक कृतीवर , विचारावर आमच्या कृतीचा ठसा असेल .जिजाऊच्या विचारांची उंची , व्यापकता , दूरदृष्टी , तडफ , जिद्द , चिकाटी , अन्यायाविरोधातील चीड स्वाभिमानी वृत्ती , स्वतंत्र बाणा आणि स्वातंत्र्याची आस यामुळे शिवरायांवर तेच संस्कार करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आणि त्यांनी होम स्कूलिंग पद्धत राबवली घरामध्येच त्यांनी त्याना शिक्षणाचे धडे दिले . पुण्याच्या लाल महालातून त्यांच्या न्याय कारभारास सुरवात झाली याच पुण्याच्या कसबा वस्तीतून गाढवाचा नांगर फिरवला जात होता अशा जमिनीवर जर शेती केली तर निर्वंश होईल ही भीती जनतेत होती याच जमिनीवरून जिजाऊनी सोन्याचा नांगर फिरविला आणि अंधश्रदधा  मोडून काढली.अशा अनेक अंधश्रद्धा न मानणाऱ्या जिजाऊंचा आजच्या माता बोध घेतील काय ? 

        प्रतिकूल परिस्थितीवर मात करून  ती परिस्थिती स्वसामर्थ्यच्या बळावर बदलवायला त्यांनी शिवबाना शिकवलं, आरोग्यसंपन्न , बहुश्रुत , चतुर , शिस्तप्रिय , कुशल संघटक , प्रभावी व्यवस्थापक ,समताप्रेमी , स्वातंत्र्य व न्यायबुद्धी असलेला एक सर्वगुणसंपन्न महानायक छत्रपती त्यांनी शिवाजी महाराजांना बनवल, जिजाऊ विवेकी माता होत्या त्यांची कार्यशैली जवळून बघणारे शिवबा त्या तालमीत घडत गेले त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये त्यागी वृत्ती , प्रामाणीकपणा , निस्वार्थीपणा , साहस , शौर्य ,मानुसकीचे गुण विकसित झाले . 

            खेडेबारया नजीकच्या रांझे गावातील एक घटना ,या गावातील बाबाजी भिकाजी गुजर पाटलांन गावातील शेतकऱ्याच्या बायकोची आब्रूं लुटली यामुळे तिने आत्महत्या केली ,त्या घटनेमुळे जिजाऊ संतापल्या म्हणाल्या ; ' रांझ्याच्या पाटलाच्या मुसक्या बांधून इथ आणा आणि चौकशी करा  त्याला आणलं चौकशी झाली

गुन्हा सिद्धही झाला  शिवरायांनी शिक्षा फर्मावली 

 पाटलाचे हातपाय कलम करा याच वतन अमानत करा शिक्षेची अमलबजावणी ताबडतोब झाली तिथेच खऱ्या अर्थाने जिजाऊच्या ही संस्काराची अमलबजावणी झाली ही घटना आजच्या समाज मनाला विचार करावयास लावणारी आहे  जोपर्यंत शिवरायांसारखे व्यक्तिमत्व घडवणाऱ्या जिजाउसारख्या मातांची संख्या वाढत नाही तोपर्यंत स्त्रियांवरील अत्याचारांची संख्या कशी कमी होईल ? शिवछत्रपतींना जिजाऊनी जशी युद्धनीती शिकविली तसाच श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरकही शिकविला कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा त्यांच्यामध्ये निर्माण होऊ दिली नाही .                    

   लढाया केल्या अंधाऱ्या राती ! पाहिली नाही पंचांग पोथी !

                         अशी होती शिवनिती ! जिजाऊ पुत्राची !

अशा पद्धतीने कार्य करण्याची प्रेरणा जिजाऊ साहेबांनी राजांना दिली आणि त्यांच्या विचाराच्या जोरावरच शिवबा आयुष्यभर लढले . अशा राजमातेने १ ७ जून १ ६ ७ ४ रोजी रात्री आपले डोळे मिटले .स्वामी स्वराज्याचा आईवीना पोरका झाला.शिवरायांना प्रत्येक महत्वाच्या प्रसंगात जीजामातेचे मार्गदर्शन असे खरे म्हणजे जिजामाता या स्वराज्यातील संसद,सुप्रीम कोर्ट किंबहुना शिवाजी महाराजांसाठी एक चालते बोलते विद्यापीठ होत्या. शिवरायांचा निर्णय बदलण्याची शक्ती फक्त जिजाऊ नावाच्या मातृशक्तीचीच होती जिजाऊ जास्त जगल्या असत्या तर शिवरायांचे निधन  कदाचीत एवढ्या लवकर झालेही नसते . एखादा कुशल प्रशिक्षक आणि वस्ताद जसा आपल्या विजयी शिष्याची पाठ थोपटतो तशीच पाठ थोपटून शिवराय व त्यांच्या सहकाऱ्यांना उत्तेजन देण्याचे कार्य जिजाऊनी केले . केवळ माता नव्हे तर राजमाता,राष्ट्रमाता म्हणून त्यांचा आदर्श जगातील मातांनी ठेवावा असाच आहे . 

               जिजामाता स्वराज्याची स्फूर्ती होत्या , महाशक्ती होत्या , मातृशक्ती होत्या ,आदर्श राजमाता होत्या , प्रखर परिवर्तनवादी आणि रंजल्या गांजलेल्यांच्या पालनकर्त्या राजमाता होत्या अश्या या संपूर्ण  राष्ट्राच्या राष्ट्रमाता असणाऱ्या जिजाऊ माँ साहेबांना त्यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार वंदन....!!

आदर्श राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब

लेखक-

प्रा.महेश कुंडलिक चौरे,

आष्टी.

मो.9423471324



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.